शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
4
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
5
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
6
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
7
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
8
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
9
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
10
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
11
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
12
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
13
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
14
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
15
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
16
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
17
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
18
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
19
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
20
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स

विशेष लेख: लंगड्या घोड्यांचे तोबरे कोण भरतो आहे?

By विजय दर्डा | Updated: June 9, 2025 08:26 IST

लंगड्या घोड्याने लाथ मारली, तर त्यात किती ताकद असते? आणि वरातीतल्या घोड्याला शर्यतीतला घोडा असल्याचा भ्रम झाला असेल; तर काय करावे?

- डाॅ. विजय दर्डा (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

एक जुनी हिंदी ‘कहावत’ सांगते, की गाढवे गुलाबजाम खात आहेत..  आता ही असली म्हण का तयार केली? केव्हा आणि कोणी केली?  आणि गाढवे गुलाबजामच का खात आहेत? एखादे गाढव एकावेळी किती गुलाबजाम खाऊ शकते? गाढवे दुसरी मिठाई का खात नाहीत? ..असले प्रश्न तुम्ही विचारू नका, कारण त्यांनी आधीच माझे डोके चक्करले आहे. हे असले गहन प्रश्न घेऊन चर्चा करण्यात काही अर्थ नाही; तर आपण आता घोड्यांविषयी बोलू.

गाढवांच्या गुलाबजाम खाण्यासंबंधीची ही म्हण अचानक मला आठवली, त्याचे ताजे कारण म्हणजे एक बातमी. भोपाळमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलताना राहुल गांधी म्हणाले, ‘शर्यतीतले घोडे, वरातीतले घोडे आणि लंगडे घोडे यांच्यात आता फरक करण्याची वेळ आली आहे!’  घोडे तीन प्रकारचे असतात असे त्यांनी सांगितले. एक असतो वरातीतला घोडा. दुसरा असतो शर्यतीतला आणि तिसरा असतो लंगडा. आपल्याला वरातीतल्या घोड्याला वरातीत, शर्यतीच्या घोड्याला शर्यतीत ठेवावे लागेल; आणि लंगड्या घोड्याला निवृत्त करावे लागेल. लंगड्या घोड्यांनी इतर घोड्यांसाठी उगीच डोकेदुखी होऊ नये. जर त्यांनी अशी कटकट केली; तर पक्ष त्यांच्यावर कारवाई करेल; असेही राहुल गांधी यांनी बजावले. राहुलजींच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण योजनेविषयी वाचून मजा आली... काँग्रेसने पाळलेल्या घोड्यांपैकी काही लंगडे आहेत, असे म्हणण्याची हिंंमत कुणीतरी करते आहे; आणि तेही भरसभेत, हे फारच धाडसाचे आहे!

ही बातमी वाचता वाचता मला आणखी एक म्हण आठवली - ‘समुद्रात राहून माशाशी वैर?’ आता मला अशा म्हणी आठवतात; त्याला मी तरी काय करू? उगीच भलते अर्थ काढू नका. समुद्रात जर मासे असतील; त्यात राहणारा त्यांच्याशी शत्रुत्व कसे घेऊ शकेल? असाच अर्थ आपण सामान्य भाषेत काढाल. पण जरा वेगळ्या नजरेने याकडे पाहा. ज्याला राहुलजी  लंगडा घोडा म्हणत आहेत तो आपल्या पायाने लाथा मारू शकतो का? जर मारील तर कुणाला? त्याच्या पायात शर्यतीच्या घोड्यापेक्षा जास्त हॉर्स पॉवर असेल काय? शास्त्राचा आधार घेऊन सांगायचे तर एक निरोगी घोडा जवळजवळ २०००  पाऊंड इतक्या ताकदीने लाथ मारतो. ही लाथ ज्याला बसेल  त्याचे हाड मोडू शकते आणि हृदयविकाराचा झटका येऊन तो माणूस मरूही शकतो. 

लंगडा घोडा भले पळू शकणार नाही; पण दुसऱ्या घोड्यांना लाथ तर नक्कीच मारू शकतो. समजा, त्याला लाथ नाहीच मारता आली तरी तो पायात पाय घालून दुसऱ्या घोड्यांना पाडू शकतो. आता या पायात पाय घालण्यावरून काही आठवते का? - लहानपणी पळण्याच्या शर्यतीत अव्वल येण्याची क्षमता नसलेला एखादा दुष्ट मुलगा त्याच्या पुढे पळणाऱ्याच्या पायात पाय अडकवून त्याला पाडायचा.... पुढे धावणारा मुलगा पडला की पायात पाय घालणाऱ्या मुलाची शर्यत जिंकण्याची शक्यता वाढायची, आठवते?... काँग्रेस पक्षात असेच काहीतरी होताना नाही दिसत तुम्हाला? या आडमुठ्या लंगड्या घोड्यांनी काँग्रेसचा विनाश केला, असे नाही वाटत? शर्यतीत धावण्याची ताकद असलेल्या दमदार घोड्यांची प्रतिष्ठा राखली गेली असती, त्यांना काय हवे आहे त्याकडे लक्ष दिले गेले असते, त्यांच्या क्षमतांचा सदुपयोग केला गेला असता तर काँग्रेस पक्षावर शर्यत हरण्याची वेळ कदाचित आलीच नसती! काँग्रेसने स्वातंत्र्यलढ्यात अग्रभागी राहून भूमिका निभावली. पक्षाचा प्रत्येक शिपाई शर्यत जिंकण्याची जिद्द राखत मैदानात उतरत असे. आणि आज?  वेगवेगळ्या राज्यांत पाहा. किती राज्यात वजनदार असे काँग्रेस नेते उरले आहेत? खऱ्या  अर्थाने मातब्बर असलेल्या कितीतरी नेत्यांना लंगड्या घोड्यांनी पायात पाय घालून पाडलेले दिसते!

- तरी, तूर्त मी वरातीतल्या घोड्यांबद्दल बोलत नाही. मी फक्त लंगड्या घोड्यांबद्दल बोलतो आहे. लंगड्या घोड्यांची संख्या जास्त होऊन तबेल्यावर त्यांचाच कब्जा झाला असेल, तर अशावेळी काय केले पाहिजे? राहुलजींना मी सल्ला देणार नाही; पण एक नक्की सांगेन, शेफारलेल्या बहुसंख्य लंगड्या घोड्यांनी उच्छाद मांडला आहे; त्यांना तबेल्यातून कसे हटवावे, यातच तुमची खरी परीक्षा आहे. अन्यथा तबेल्यात उरल्यासुरल्या शर्यतीच्या घोड्यांना दुसरे तबेलेवाले हातोहात पळवतील. ‘लंगड्या घोड्यांनी शर्यतीच्या घोड्यांसाठी अडचणी उत्पन्न करता कामा नयेत, अन्यथा पक्ष कारवाई करेल’ हे बाकी राहुलजींनी बरोबरच म्हटले. पण नुसता इशारा देऊन काय होणार? लंगडे घोडे कोण हे समजले आहे तर ती ब्याद झटकून का टाकत नाही? जितका जास्त उशीर, तितके हे लंगडे घोडे शर्यतीची वाट अडवून तबेल्यात बसतील! ..पण जाऊ द्या, मीसुद्धा उगीचच सल्ला देण्याच्या मूडमध्ये आलो. राहुलजी समजदार नेते आहेत. लंगड्या घोड्यांचे काय करावे, याबद्दल त्यांनी काही ना काही ठरवले असेलच! अर्थात काँग्रेसचे लंगडे घोडे फार तरबेज आहेत. इतक्या सहज  हार मानणार नाहीत.

एवढे झाल्यावर वरातीतल्या घोड्यांची चर्चा  केली नाही तर हे घोडेपुराण अपुरे राहून जाईल. हे घोडे पायात घुंगरू बांधून आपल्या मालकाच्या इशाऱ्यांवर थिरकतात, नवरदेवाला आपल्या पाठीवर बसवून नवरीच्या दरवाजापर्यंत घेऊन जातात. या घोड्यांच्या थिरकत्या नाचकामाशिवाय लग्नाची शोभा अधुरी राहते. पण अचानक त्यांचाही मूड बिघडला तर बेटे लाथ मारायला मागेपुढे पाहात नाहीत. त्यांनी लाथ मारली तर वऱ्हाडी जखमी होतात; पण मालकाचे नुकसान होत नाही. मस्त चारा खात मालकाच्या इशाऱ्यांवर थिरकणारे हे घोडे बहुतेकांना प्यारे असतात. पण त्यातले काही बिलंदर पहिल्या मालकाला चकवून दुसऱ्यांच्या वरातीत नाचायला जातात आणि त्यांना चारा खाऊ घालणारा मालक बिचारा पाहातच राहतो.

तूर्तास राहुलजींनी एक गोष्ट चांगली सांगितली. ते म्हणाले, वरातीतल्या घोड्याने वरातीतच राहिले पाहिजे... पण काय करणार? वरातीतल्या काही घोड्यांना आपण शर्यतीतले घोडे आहोत असा भ्रम होतो.

आता शेवटी काही साधे प्रश्न : काँग्रेसच्या तबेल्यातील शर्यतीच्या घोड्यांचा लगाम शेवटी कुणी खेचून धरलेला आहे? लंगड्या घोड्यांचे तोबरे कोण कोण भरतो आहे? आणि वरातीतले घोडे कोणाच्या इशाऱ्यांवर थिरकत आहेत? इति घोडापुराण समाप्त!

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी