शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: सार्वजनिक बँकांचे विलीनीकरण - बड्यांसाठी मोठ्या बँका; पण सर्वसामान्य जनतेचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 10:16 IST

सार्वजनिक क्षेत्रातील १२ बँकांचे विलीनीकरणाद्वारे तीन ते चार बँकांमध्ये रूपांतर करण्याच्या दृष्टीने सरकारने वाटचाल सुरू केली आहे, त्याचा योग्य विचार व्हावा.

ॲड. कांतीलाल तातेड, अर्थशास्त्राचे अभ्यासक

जागतिक पातळीवरील बँकिंग प्रणाली व तंत्रज्ञानात होणारे बदल आत्मसात करून त्याद्वारे बँकांची कार्यक्षमता वाढविणे, त्यांच्या कर्ज देण्याच्या व गुंतवणुकीच्या क्षमतेत वाढ करणे, राष्ट्रीय व जागतिक पातळीवर इतर मोठ्या बँकांशी स्पर्धा करण्यासाठी त्यांना सक्षम करणे तसेच देशाचे २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी देशातील सार्वजनिक क्षेत्रातील १२ बँकांचे विलीनीकरणाद्वारे तीन ते चार बँकांमध्ये रूपांतर करणे आवश्यक आहे, असे सरकारचे मत असून त्या दृष्टीने सरकारने वाटचाल सुरू केलेली आहे. 

याचाच एक भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने १२ व १३ सप्टेंबर रोजी दोनदिवसीय शिखर परिषदेचे आयोजन केले होते. या बैठकीत बँकिंग क्षेत्रात आगामी काळात करावयाच्या सुधारणा तसेच सार्वजनिक क्षेत्रातील १२ बँकांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर व्यापक प्रमाणात चर्चा करण्यात आली. भारताला २०४७ पर्यंत देशाच्या विकासदरात वाढ करण्यासाठी जवळपास साडेचार लाख कोटी डॉलर्स इतक्या रकमेच्या पायाभूत गुंतवणुकीची गरज असून, त्यासाठी डिजिटल तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशात व जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकणाऱ्या तसेच देशातील मोठ्या प्रकल्पांना व उद्योगांना सहजगत्या मोठी कर्ज देऊ शकणाऱ्या मोठ्या व मजबूत बँकांची आवश्यकता आहे. जगातील पहिल्या १०० बँकांमध्ये भारताची केवळ स्टेट बँक असून, तीही मालमत्तेच्या आधारावर ४३व्या क्रमांकावर आहे. 

सन २०४७ पर्यंत भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील किमान एक-दोन बँकांनी तरी जगातील पहिल्या २० बँकांमध्ये स्थान मिळवावे असे सरकारला वाटते. सरकारी मालकीच्या बँकांचे खासगीकरण करणे सोपे जावे म्हणून २०२० मध्ये केंद्र सरकारने २७ राष्ट्रीयीकृत बँकांच्या विलीनीकरणाद्वारे १२ बँका करून बँकांच्या खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू केली होती. २०२१-२२ सालासाठीचा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन सरकारी मालकीच्या बँका, एक सर्वसाधारण विमा कंपनी यांचे खासगीकरण करण्याची तसेच ‘आयडीबीआय’ बँकेची विक्री करण्याची घोषणा केली होती; परंतु विविध राज्यांच्या विधानसभांच्या तसेच लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने बँकांच्या खासगीकरणाचे धोरण काही काळ स्थगित ठेवले होते. आता सरकारने ‘आयडीबीआय’ बँकेच्या विक्रीची प्रक्रिया सुरू केली असून, सरकारी बँकांचे खासगीकरण करणे सोपे जावे म्हणून १२ बँकांचे विलीनीकरण करून, तीन ते चार बँका करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

‘भारतातील विमा व बँकिंग क्षेत्र आमच्यासाठी खुले करा,’ ही अमेरिकेसह अन्य बड्या राष्ट्रांची गेल्या ४० वर्षांपासूनची सातत्याची मागणी आहे. या दडपणाखालीच सरकारने विमा क्षेत्र देशी व विदेशी कंपन्यांसाठी खुले केले असून आता विमाक्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा १०० टक्के करण्यासंबंधीचे विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्याची शक्यता आहे. 

वास्तविक आयुर्विमा महामंडळ ही प्रचंड वित्तीय ताकद असलेली देशातील सर्वांत मोठी व जगातील चौथी सर्वांत मोठी विमा कंपनी आहे. आयुर्विमा महामंडळ जगातील तिसरा सगळ्यांत मजबूत विमा ब्रँड म्हणून ओळखला जातो. असे असताना सरकारने आयुर्विमा महामंडळाची निर्गुंतवणूक करून त्याद्वारे खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल का सुरू केली आहे? देशी व विदेशी विमा कंपन्यांनी महामंडळाचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केलेले असून, सरकार लवकरच महामंडळामधील ६.५ टक्के हिस्सा विकणार आहे. त्यामुळे जागतिक दर्जाच्या तीन ते चार बँका करण्याच्या नावाखाली त्या बँकांचे खासगीकरण करणे, हाच सरकारचा मुख्य हेतू आहे. 

सेवाशुल्कात भरमसाट वाढ करणे, ठेवींवरील व्याजदरात कपात करणे व त्याद्वारे मोठ्या प्रमाणात नफा मिळविणे हाच खासगी बँकांचा मुख्य हेतू असतो. या बँकांनी बचत खात्याच्या किमान शिल्लक रकमेत केलेली भरमसाट वाढ पाहता देशातील कोट्यवधी सर्वसामान्य लोक बँकिंग सेवेला वंचित होण्याची शक्यता आहे. यामुळे बँकांच्या विलीनीकरणाचा निर्णय योग्य आहे का, याचा सांगोपांग विचार करण्याची आवश्यकता आहे.

kantilaltated@gmail.com

English
हिंदी सारांश
Web Title : Bank Mergers: Big Banks for Corporates, What About Common People?

Web Summary : Public bank mergers aim for global competitiveness, but critics fear privatization, increased service charges, and reduced access for common citizens. Is it truly progress?
टॅग्स :bankबँक