मिलिंद कुलकर्णीमहाराष्टÑाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती पुन्हा एकदा झाली आहे. २०१४ मध्ये युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांनी स्वबळ अजमावले होते. दोघांना एकत्र आल्याशिवाय सरकार स्थिर राहू शकत नसल्याने वैचारिक मित्र म्हणून दोन्ही पक्ष एकत्र आले. मुंबई महापालिका निवडणुकीवरुन पुन्हा दोन्ही पक्ष आमनेसामने आले. कटुता निर्माण झाली. परंतु, जनतेने सेनेला कौल दिला. आणि भाजपनेही ‘कर्नाटक’ पॅटर्न न वापरण्याचा समजूतदारपणा दाखवला. दोन्ही पक्षांमधील कटुता कमी होण्यास तेथून सुरुवात झाली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत युती कायम राहिली. सेनेला यश चांगले मिळाले. आताही युतीविषयी दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये वाक्युध्द सुरु राहिले. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी युती होणार असल्याचा व्यक्त केलेला विश्वास कृतीत उतरवला. सत्ताधारी पक्ष असल्याने दोघांकडे इच्छुकांची मोठी गर्दी असताना त्यांनी व्युहात्मक रणनिती आखत युती साकारली. नाराजीनाट्य दोन्हीकडे आहे, पण त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.खान्देशचा विचार केला तर २५ वर्षांपासून याठिकाणी भाजप हा मोठ्या भावाची तर शिवसेना लहान भावाची भूमिका निभावत आहे. जळगावचे नेहेते, गणेश राणा, चोपड्याचे कन्हैये बंधू, भुसावळचे राजेंद्र दायमा, अमळनेरचे देवीदास सुतार, पाचोऱ्याचे अशोक मिसाळ हे सेनेचे खान्देशातील पहिल्या फळीचे शिलेदार होते. त्यानंतर पक्ष विस्तारत गेला. बाहेरील पक्षातील कार्यकर्ते आले आणि त्यापैकी काहींनी विधानसभा निवडणुकीत यश मिळविले. आमदार म्हणून निवडून आल्यावर सेना सोडून जाण्याचे कटू प्रसंगदेखील सेनेच्या इतिहासात नोंदविले गेले. खान्देशातून पक्षाचा खासदार निवडून गेलेला नाही, ही सैनिकांच्या मनात खंत आहे. सुरेशदादा जैन यांच्यानंतर गुलाबराव पाटील यांच्या रुपाने खान्देशातील सैनिकाला मंत्रिपद मिळाले.खान्देशातील सेनेचा पहिला आमदार होण्याचा मान धरणगावच्या हरिभाऊ महाजन यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. १९९० मध्ये धरणगाव मतदारसंघातून ते निवडून आले. विशेष म्हणजे, युतीतील भागीदार असलेल्या भाजपचा पहिला आमदार पाच वर्षे आधी म्हणजे १९८५ मध्ये निवडून आला. डॉ.गुणवंतराव सरोदे हे रावेरमधून निवडून आले. दोन्ही पक्षांनी युती म्हणून एकत्र आल्यावर खान्देशातील जळगाव जिल्हा पादाक्रांत केला. धुळ्यात शिंदखेड्याचे रामकृष्ण पाटील हे सेनेचे पहिले आमदार आहेत. त्यानंतर २००९ मध्ये प्रा.शरद पाटील हे निवडून आले. नंदुरबारातून अजून एकही आमदार निवडून आलेला नाही. जळगावमध्ये काँग्रेसचा गड हलविण्यात युती यशस्वी ठरली. त्याचे मानकरी म्हणून ११ आमदारांचा उल्लेख करावा लागेल. भुसावळचे दिलीप भोळे हे दोनदा, पारोळ्याचे चिमणराव पाटील हे दोनदा, सुरेशदादा जैन हे दोनदा, पाळधीचे गुलाबराव पाटील हे तिनदा, आर.ओ.पाटील हे दोनदा तर आता त्यांचे पुतणे किशोर पाटील हे पहिल्यांदा निवडून आले. शिवसेनेचे उमेदवार म्हणून जळगावातून दोनदा कमी फरकाने पराभूत झालेले प्रा.चंद्रकांत सोनवणे हे २०१४ मध्ये चोपड्यातून पहिल्यांदा निवडून आले. आता मनसेमध्ये असलेले अॅड.जयप्रकाश बाविस्कर यांना सेनेने विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्त केले होते. अॅड.शरद वाणी हे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले होते.माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनीही सेनेतून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना यश आले नाही. ते दुसºया पक्षात गेल्यावर त्यांना निवडणुकीत यश मिळाले.२०१४ मध्ये युती नसतानाही जळगाव जिल्ह्यात सेनेचे तीन आमदार निवडून आले होते. चिमणराव पाटील यांचा अल्प मतांनी पराभव झाला होता. यंदा युती झाली असून जळगाव जिल्ह्यात चोपडा, पारोळा, पाचोरा व जळगाव ग्रामीण हे चार तर धुळे जिल्ह्यात धुळे शहर व नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा असे सहा मतदारसंघ सेनेला मिळाले आहेत. अक्कलकुव्याहून जिल्हाप्रमुख आमशा पाडवी, धुळे शहरमधून जिल्हाप्रमुख हिलाल माळी, चोपड्याहून आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी लता सोनवणे, एरंडोलमधून चिमणराव पाटील, जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव पाटील, पाचोºयाहून किशोर पाटील याांना तिकीट मिळाले आहे. नंदुरबारचे मातब्बर नेते चंद्रकांत रघुवंशी हे सेनेत आल्याने नंदुरबार व धुळे जिल्ह्यात सेनेची ताकद वाढली आहे. यंदा सेनेच्या कामगिरीत सुधारणा करण्याचा सैनिकांचा प्रयत्न राहील.
शिवसेनेने ओढली माफक प्रत्यंचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 16:45 IST