शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

बोल खरे,पण नाही बरे!

By admin | Updated: December 29, 2014 23:39 IST

जेव्हा केव्हा शेतकऱ्यांच्या शिरावरील कर्जाचा डोंगर उतरविण्याच्या आवश्यकतेवर चर्चा सुरु होते, तेव्हा तेव्हा देशभरात आस्ती पक्ष आणि नास्ती पक्ष यांच्यात वितंडवाद सुरू होतो.

जेव्हा केव्हा शेतकऱ्यांच्या शिरावरील कर्जाचा डोंगर उतरविण्याच्या आवश्यकतेवर चर्चा सुरु होते, तेव्हा तेव्हा देशभरात आस्ती पक्ष आणि नास्ती पक्ष यांच्यात वितंडवाद सुरू होतो. अशा कर्जमाफीच्या समर्थनातील आस्ती पक्ष हमखास उद्योगांना दिलेल्या आणि थकलेल्या कर्जाचा उल्लेख करतो आणि त्यांच्या तुलनेत शेतकऱ्यांना कर्जमाफी किती निकडीची आहे, याचे समर्थन करू लागतो. प्रत्येक वेळी ही चर्चा अभिनिवेशानेच केली जाते आणि साहजिकच मग अशा वेळी अर्थकारण बाजूला पडते. ‘चांगले राजकारण हे वाईट अर्थकारण, तर चांगले अर्थकारण हे वाईट राजकारण असते,’ अशा अर्थाचे एक इंग्रजी वचन आहे. त्याचा या संदर्भात अगदी पुरेपूर प्रत्यय येतो. सामान्यत: जेव्हा कोणत्याही आणि विशेषत: लोकसभा वा विधानसभांच्या निवडणुका दृष्टिपथात असतात, तेव्हा राजकीय पक्षांना अचानक शेतकऱ्यांच्या व्यथांची जाणीव होते व या जाणिवेतूनच मग संपूर्र्ण कृषी कर्जमाफ करणे वा गेला बाजार कर्जावरील व्याज माफ करण्याच्या घोषणा सत्ताधारी, तसेच सत्तेच्छुक अशा दोन्ही पक्षांकडून केल्या जातात. काहीअंशी या घोषणा सत्यातदेखील उतरतात. पण त्यातून नेमके काय साध्य होते, शेतकरी खरोखरीच व्याधीमुक्त होतो अथवा नाही, याचा सोक्षमोक्ष कुणी लावीत नाही. आता नेमके तेच काम रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले आहे. कृषी कर्जमाफीची योजना पूर्णपणे निष्प्रभ ठरल्याचे नि:संदिग्ध विधान त्यांनी केले असून ते करतानाच, कर्जमाफीच्या निर्णयांचा कृषी पतपुरवठ्यावर अत्यंत प्रतिकूल परिणाम झाल्याचे निदानही त्यांनी केले आहे. अर्थात, हे विधान देशातील सर्वोच्च बँकेच्या सर्वोच्च अधिकाऱ्याने आणि तेही अभ्यासांती केलेले असल्याने या विधानाला भले कोणाचा कितीही विरोध होणारा असला, तरी विद्यमान सरकारला ते गांभीर्याने घ्यावेच लागेल. अर्थात, होणारा विरोध पुन्हा राजकीयच असेल, यात शंका नाही. इतकेच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील बनलेला आत्महत्यांचा प्रश्न त्यांच्या शिरावरील कर्जाशी आणि बँकिंग प्रणालीशी कितपत निगडित आहे, याचादेखील स्वतंत्रपणे अभ्यास करण्याची गरज राजन यांनी बोलून दाखविली आहे. अर्थात, रघुराम राजन म्हणतात म्हणून कदाचित हे सारे गांभीर्याने घेतले जाणारे असले, तरी जे लोक वास्तवाशी निगडित आहेत, त्यांची मते विचारात घेतली, तर राजन यांनी नवे काहीच सांगितलेले नाही, असेच त्यातून समोर येऊ शकेल. केवळ कृषी कर्जाच्याच बाबतीत नव्हे, तर शेतकऱ्यांसाठीच्या बव्हंशी योजनांबाबत असा अनुभव येत असतो, की या योजनांचे सरकारला अपेक्षित असलेले संभाव्य लाभार्थी तसेच कोरडे राहतात आणि राज्यकर्त्यांशी ज्यांचे लागेबांधे आहेत, असेच लोक सारे फायदे गिळंकृत करून मोकळे होतात. पुन्हा प्रत्येक वेळी त्यांचाच आवाज मोठा असतो. जागतिक अर्थकारणात नावाजलेले अर्थतज्ज्ञ आणि देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग जेव्हा पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री झाले तेव्हा त्यांनी आपल्या कारकिर्दीच्या प्रारंभी इंग्रजीतून जे एक विधान केले होते, ते विधान त्यांच्या कारकिर्दीची दिशा दाखवून देणारे होते. आता यापुढे अन्नछत्रे चालविली जाणार नाहीत, अशा अर्थाच्या त्या विधानाद्वारे त्यांनी सरसकट कर्जमाफी आणि विविध प्रकारची अनुदाने यांच्या दिशेने आपला रोख व्यक्त केला होता. ते करतानाच ग्रामीण विभागातील कर्जवितरणाची प्रक्रिया अधिक गतिमान करण्याचेही त्यांनी सांगितले होते व त्यासाठी एक योजनाबद्ध आराखडाही जाहीर केला होता. पण, केवळ अर्थमंत्रिपदाच्या काळातच नव्हे, तर त्यानंतर पंतप्रधानकीच्या काळातदेखील त्यांना चांगल्या अर्थकारणाची नव्हे, तर चांगल्या राजकारणाचीच कास धरणे भाग पडले होते. पण हे केवळ त्यांच्याच काळात झाले असे नव्हे. त्यांच्या आधीच्या काळातही तेच झाले आणि कदाचित यापुढील काळातही तसेच होत राहील. पण, देशाच्या अर्थकारणाच्या दृष्टीने असे होत राहणे इष्ट नाही, हे स्पष्टपणे सांगणे आणि शासनकर्त्यांना जागे करणे, इतकाच रघुराम राजन यांचा यामागील हेतू आहे वा असला पाहिजे. एका वेगळ्या अर्थाने राजन यांनी कृषी कर्जमाफीचा फुगा फोडण्याचा प्रयत्न केला आहे, असेही म्हणता येईल. साहजिकच त्यांनी नोंदविलेली निरीक्षणे व केलेले रोगनिदान त्याच भावनेने आणि भूमिकेने स्वीकारले गेले पाहिजे. पण तसे होईलच, याची खात्री देता येत नाही. रिझर्व्ह बँक आणि तिचे गव्हर्नर सरळसरळ शेतकरी विरोधक आहेत, असा निष्कर्ष काढून त्यांच्यावरच टीकेचा भडिमार केला जाऊ शकेल. कारण जे विषय शुद्ध अर्थकारणाशी आणि पर्यायाने देशहिताशी संबंधित आहेत, त्यांच्या बाबतीत तरी राजकारण करू नका, हे आवाहन आजवर एकाही राजकीय पक्षाने गांभीर्याने घेतलेले नसल्याने या वेळी ते गांभीर्य दर्शविले जाईल, अशी आशा कशाच्या जोरावर बाळगणार?