शहरं
Join us  
Trending Stories
1
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
2
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
3
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
4
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
5
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
6
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
7
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
8
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
9
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
10
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
11
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
12
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
13
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
14
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग
15
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
16
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
17
Rohit Pawar: समविचारी पक्ष सोबत आले तर ठिक, नाही तर...; रोहित पवार स्पष्टच बोलले
18
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
19
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
20
लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  

धुळ्यातले १,८४,८४,२०० रुपये : रफादफा करू नका!

By यदू जोशी | Updated: May 23, 2025 08:54 IST

विधिमंडळ समित्यांचे दौरे म्हटले की, ‘कलेक्शन’ आलेच! धुळ्याच्या घटनेने पुरती अप्रतिष्ठा झाली आहे. या समित्या ठेवा; पण त्यांच्या दौऱ्यांचा उच्छाद थांबवा!

यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत

विधिमंडळाच्या विविध समित्यांचे उद्घाटन १९ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले; तेव्हा ते जे काही बोलले होते त्याचे गांभीर्य समित्यांनी लगेच ओळखले असते तर धुळ्यातील घटना घडलीच नसती. फडणवीस म्हणाले होते, ‘गतकाळात काही समित्या बऱ्याच बदनाम झाल्या होत्या, ब्लॅकमेलिंगचे प्रकार घडलेले होते. आता तसे होऊ देऊ नका, चांगले काम करा.’- मुख्यमंत्री हे बोलून दोन  दिवसही उलटत नाहीत तोच धुळ्यात खोतकर यांचे समिती पीए किशोर पाटील यांच्या नावाने आरक्षित असलेल्या खोलीत १ कोटी ८४ लाख ८४ हजार २०० रुपये सापडले.  हा मामला कोणाला कळलाही नसता. पण अशा घटनांचा कधीकाळी भाग राहिलेले धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी धुळ्याच्या विश्रामगृहात ठिय्या मांडला, नोटांची मोजदाद करवून घेतली आणि एकूणच सगळा भांडाफोड केला. 

खोतकर यांच्या समितीला मानले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केल्याबरोबर दोनच दिवसात दौरा सुरू केला.  इतकी काय घाई  होती? आठ-पंधरा दिवस अभ्यास करायचा. बरं, हे किशोर पाटील  विधानमंडळात कक्ष अधिकारी आहेत. ते म्हणे चार-पाच दिवसांपासून धुळ्यात होते. हा गडी गेली अनेक वर्षे अंदाज समितीच्या अध्यक्षांचाच पीए असतो. खरेतर कक्ष अधिकाऱ्याच्या खालचा कर्मचारी हा विधिमंडळ समिती अध्यक्षांकडे पीए म्हणून दिला जातो; पण किशोर पाटील अपवाद . कसे?- त्याची चौकशी झाली पाहिजे. 

वर्षानुवर्षे या महाशयांना अंदाज समितीतच पीए का व्हायचे असते, याचा अंदाज तुम्हाला आला असेलच आता. माहिती अशी आहे की समिती अध्यक्ष  खोतकर यांचा पीए म्हणून किशोर पाटील यांची ऑर्डरच निघालेली नव्हती, तरीही हा पठ्ठ्या धुळ्यात जाऊन बसला.  विधानभवनचा कर्मचारी; त्यामुळे ‘स्टाफ’ म्हणून पाठविले होते, असे कारण उद्या दिले जाईल. उद्या धुळ्याचे प्रकरण रफादफा करतील, उगाच हक्कभंग वगैरेची आफत नको म्हणून माध्यमे फारसे लिहिणार नाहीत. अनेक कारणे देऊन धुळ्यातील ती रक्कम पवित्र करवून घेण्याचे प्रयत्नही होतील. अनेकांचा बचाव केला जाईल; पण या निमित्ताने विधानमंडळाच्या सन्मानाला मोठा धक्का बसला, त्याचे काय? तांत्रिकदृष्ट्या स्वत:चा बचाव करून घ्याल; पण जनतेच्या नजरेतून पडाल त्याचे काय करणार? समित्यांचे दौरेच नकोत

किशोर पाटील एकट्याने सगळे करतात, असे म्हणण्यातही काही अर्थ नाही, या महाशयांना वाट्टेल तसे वागण्याची मोकळीक कोणी दिली, त्याच्या मुळाशी गेले पाहिजे. अंदाज समितीला अमर्याद अधिकार आहेत. अर्थसंकल्पित निधीचा वापर योग्य रितीने होतो की नाही, हे पाहण्याचा अधिकार असल्याने कोणत्याही विभागात ही समिती तोंड मारू शकते; पण धुळ्यातील घटनेने तोंड काळे होण्याची वेळ आली आहे. 

अंदाज, पंचायत राज, लोकलेखा अशा विधिमंडळ समित्यांचे दौरे म्हटले की ‘कलेक्शन’ हे आलेच. अधिकारी आपापल्या परीने रक्कम जमा करतात आणि समिती सदस्यांना देतात; याचे किस्से  अनेकदा छापून आले आहेत. भ्रष्ट अधिकाऱ्यांना या समित्या आल्या की धस्स होते, प्रामाणिक अधिकाऱ्यांनाही द्यावे लागतात कारण तेही सिस्टिमच्या बाहेर जाऊ शकत नाहीत. 

दिलीप वळसे पाटील विधानसभा अध्यक्ष होते तेव्हा समित्यांच्या दौऱ्यांनी उच्छाद मांडला होता. पाटील यांनी मग समित्यांचे दौरेच बंद करून टाकले. तशी हिंमत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दाखवायला हवी. समित्या ठेवा; पण दौरे बंद करून टाका. तसे झाले तर खोतकरांच्या नावाने इतर समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्य बोटे मोडतील; पण निदान विधानमंडळाची आणि आमदारांची बदनामी तर थांबेल? नार्वेकरजी आणि शिंदेजी, धुळ्यातील घटनेने अंतर्मुख व्हा. विधिमंडळाचा कारभार एकूणच पारदर्शक व्हावा, यासाठी आपण काय करणार आहात, याची महाराष्ट्र वाट पाहत आहे. सभागृहात कोणी आक्षेपार्ह बोलले तर आपण ते कामकाजातून काढून टाकता; पण विधानमंडळाच्या कारभारावर धुळ्याच्या निमित्ताने येत असलेले आक्षेप कसे काढून टाकणार ते सांगा. 

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये विचारले जाणारे प्रश्न, लक्षवेधी आणि त्या आडून होत असलेल्या अनेक गोष्टी गंभीर आहेत. मकरंद, राजेश, किशोर या नावांचा आणि त्यांच्या ‘कर्तृत्वा’चा शोध घ्या, शब्द ‘थिटे’ पडतील. अध्यक्ष नार्वेकर यांनी हाकललेला माणूस विधान परिषदेच्या एका पिठासीन अधिकाऱ्याकडे पवित्र करून घेतला गेला आहे. विधानमंडळाचे सचिव विधानभवनातील बदमाशांना वठणीवर आणण्याचे काम करताना दिसत नाहीत. 

जाता जाता : कोलकात्याच्या ‘मेयर इन कौन्सिल’ पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी तीसएक वर्षांपूर्वी नागपूरचे काही नगरसेवक तिथे गेले होते. तेव्हा कोलकात्याचे महापौर हे कम्युनिस्ट पक्षाचे होते. त्यांच्या कक्षात दोन पात्यांचा अगदी जुना पंखा होता.  नगरसेवक त्यांना म्हणाले, ‘तुम्ही तीन-चार पात्यांचा नवा पंखा का बसवत नाही?’ महापौर म्हणाले, ‘शक्य नाही ते.  मी तसे केले तर माझा पक्ष मला पैशांची उधळपट्टी करत असल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावेल. कदाचित माझे महापौरपदही जाईल.’- तेव्हा आपले नगरसेवक अवाक् नाहीतर दुसरे काय होणार?  

yadu.joshi@lokmat.com

टॅग्स :DhuleधुळेArjun Khotkarअर्जुन खोतकर