शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

झेंडे नाचवणाऱ्यांना लगाम घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 04:19 IST

दिवस झेंडे घेऊन नाचायचे आहेत. कारण ते सोपे असते. म्हणूनच जिकडेतिकडे झेंडे नाचवले जात असल्याचे दिसते. अस्मितेला फुंकर घालण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

दिवस झेंडे घेऊन नाचायचे आहेत. कारण ते सोपे असते. म्हणूनच जिकडेतिकडे झेंडे नाचवले जात असल्याचे दिसते. अस्मितेला फुंकर घालण्यासाठी त्याचा उपयोग होतो. कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आता नवा झेंडा खांद्यावर घेतला. त्यांना कर्नाटकासाठी वेगळा झेंडा पाहिजे. लाल आणि पिवळ्या रंगाचा हा झेंडा कर्नाटकची सांस्कृतिक अस्मिता म्हणून पुढे आणला जातो आणि आता त्याला कायदेशीर मान्यता कशी देता येईल यासाठी सिद्धरामय्या यांनी नऊ जणांची एक समितीच स्थापन केली आणि ही समिती एक अहवाल सादर करणार आहे. अहवाल येईपर्यंत आता त्यांना खांद्यावर झेंडा घेऊन नाचता येईल आणि राज्यापुढील महत्त्वाच्या प्रश्नांना बगल देणे सोपे जाईल. त्यांच्या लेखी असा झेंडा ही सांस्कृतिक अस्मिता आहे. आपल्या देशात जम्मू-काश्मीरला वेगळा झेंडा आहे; पण त्यासोबत तिरंगाही असलाच पाहिजे; पण राज्यघटनेच्या ३७० व्या कलमानुसार मिळालेल्या विशेषाधिकारामुळे हा झेंडा आहे. त्यांच्या मुख्यमंत्र्यांना पूर्वी ‘पंतप्रधान’ असे संबोधले जायचे; पण पुढे ते रद्द करण्यात आले. झेंडा की ध्वज, ही कोणत्याही राष्ट्राची केवळ ओळख नसते, तर सारी अस्मिता, ऐक्य आणि एकात्मता त्यात एकवटलेली असते. यामुळेच देशातील कोणत्याही राज्याला स्वतंत्र ध्वज नाही. तसे पाहिले तर मराठी साम्राज्याची अस्मिता असलेला ‘जरी पटका’ही अटकेपार फडकला होता म्हणून तो मुद्दा कधी महाराष्ट्राने अस्मितेचा केला नाही. देशाचे ऐक्य आणि एकात्मता याचा विचार केला, तर अशा वेगळ्या ओळखीची राज्याला गरज नाही. सिद्धरामय्या यांना अचानक एवढा कर्नाटकप्रेमाचा उमाळा का आला, असा प्रश्न पडणे साहजिक आहे. पुढील वर्षी कर्नाटकात विधानसभा निवडणुका असल्याने प्रादेशिक अस्मिता चेतविण्याचे हे उद्योग म्हणता येतील आणि हे समजत नाही इतपत सामान्य माणूस दूधखुळा निश्चित नाही. राज्यकारभारातील अपयश झाकण्यासाठी अशा युक्त्या शोधून समाजमन दुसरीकडे वळविण्याचे हे प्रकार आता नवे नाहीत. २०१२ मध्ये कर्नाटकात भाजपचे सरकार असताना अशीच मागणी केली होती; पण ती केंद्र सरकारने फेटाळली. म्हणजे रामय्या यांचा हा शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न आहे. ‘कर्नाटक रक्षण वेदिका’ ही कन्नडिगांचे हितसंरक्षण करणारी संघटना या झेंड्याचा आपल्या फायद्यासाठी दुरुपयोग करते, असा युक्तिवाद गेल्यावर्षी कर्नाटक हायकोर्टातही झाला होता. याचा अर्थ हा लाल-पिवळा झेंडा कर्नाटकची अस्मिता असली तरी त्याची काठी ही राजकीय आहे आणि हा झेंडा राजकारणासाठी वापरला जाणार हे निश्चित. भारतीय समाजमनाच्या मानसिकतेत गेल्या पंचवीस वर्षांत बदल झाला. जाती-धर्मांचे राजकारण फोफावले. सामाजिक आक्रमकता दिसू लागली. वीर, योद्धे हे महापुरुष न राहता ‘आयकॉन’ बनले आणि या महापुरुषांना समाजापुरते ठेवण्याची काळजी घेतली जाऊ लागली. महापुरुष नव्हे तर ज्या संतांनी समानता आणण्यासाठी आयुष्य वेचले त्यांची जातीनुसार वाटणी झाली. तो तुमचा, तर हा आमचा, अशा स्पर्धा लागल्या. अशा सामाजिक आणि राजकीय माहोलात सिद्धरामय्यांची मागणी वेगळी नाही; पण देशाच्या ऐक्य-एकात्मतेची ज्या काँग्रेस पक्षाने कायम कास धरली. याचसाठी त्यांच्या दोन नेत्यांनी बलिदान दिले, त्याच पक्षाचे मुख्यमंत्री अशी मागणी करतात, हे विचित्रच आहे. अशा छोट्या मागण्यांतून प्रादेशिकता बळकट होते. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, अशी भावना निर्माण होते. सारे एका झेंड्याखाली या, असे आवाहन करण्यामागे ऐक्य ही भावना असते. याचा विसर पडला असावा. तिरंग्यासाठी किती जणांनी हौतात्म्य पत्करले, कित्येकांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवले याचे भान सुटल्याचा हा परिणाम आहे. म्हणूनच निवडणुकांमधून राजकीय स्वार्थ साधण्यासाठी असे उपक्रम सोपे असतात. ध्वजाची परंपरा महाभारतापासून ठळक दिसते. पुढे हे ध्वज राष्ट्राची ओळख ठरले. अमेरिकेतही प्रत्येक राज्याचा स्वतंत्र झेंडा असला तरी युनायटेड स्टेटस् आॅफ अमेरिका, असा एकच ध्वज जगभरात ओळखला जातो. अमेरिकेची लोकशाही प्रगल्भ समजली जाते. तेथे जात-धर्म-प्रदेशाचे मुद्दे राष्ट्रीय एकात्मतेशी कधीच जोडले जात नाहीत. आपल्याकडची राजकीय संस्कृतीच गेल्या काही वर्षांत बदलल्याने प्रादेशिकवादाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रोत्साहन दिले जाते. मग तो दोन राज्यांतील पाण्याचा वाद असो की सीमेचा. त्याकडे राष्ट्र या भावनेने न पाहता केवळ प्रादेशिक अस्मितेच्या चष्म्यातून पाहिले जाते. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हे त्याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. कर्नाटकातील मराठी भाषकांचा कसा कोंडमारा केला जातो हे नवे नाही. म्हणूनच प्रादेशिकतावादाला खतपाणी घालणाऱ्या अशा प्रवृत्तींना वेळीच आवर घालावा लागेल. शिवाय आपल्या ऐक्याला आव्हान देणाऱ्या उपद्रवी शक्तींची कमतरता नाही. प्रत्येक राज्याची वेगळी संस्कृती, भाषा असतानाही आपले प्रजासत्ताक संघराज्य मजबूत आहे आणि विविधतेत एकताच आपले वेगळेपण ठरले. भारतातील राज्यांना असे ध्वज देणे हे ऐक्य आणि एकात्मतेसाठी बाधक ठरू शकते. नसता क्षुल्लक स्वार्थासाठी देशाच्या ऐक्याचा विचार न करता खांद्यावर झेंडे घेऊन नाचणारे मुबलक आहेत. त्यातीलच सिद्धरामय्या समजावेत.