शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

वणवा पुन्हा पेटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 20:12 IST

२७ मधून ९ वजा केले तर शिल्लक काय? या अकबराच्या प्रश्नाचे उत्तर बिरबलाने दिले आणि बादशहा चक्रावला. उत्तर होते शून्य. आजचा प्रश्न असाच आहे. साडेतीन महिन्यांच्या पावसाळ्यातील ९ नक्षत्रे ही पावसाची. ज्याची सुरुवात मृगापासून होते. यावर्षी मराठवाड्यावर ही नक्षत्रे रुसली आहेत.

- सुधीर महाजन२७ मधून ९ वजा केले तर शिल्लक काय? या अकबराच्या प्रश्नाचे उत्तर बिरबलाने दिले आणि बादशहा चक्रावला. उत्तर होते शून्य. आजचा प्रश्न असाच आहे. साडेतीन महिन्यांच्या पावसाळ्यातील ९ नक्षत्रे ही पावसाची. ज्याची सुरुवात मृगापासून होते. यावर्षी मराठवाड्यावर ही नक्षत्रे रुसली आहेत. पावसाळ्याचे आणि विशेषत: भरपूर पावसाची नक्षत्रे कोरडी जात आहेत आणि दिवसागणिक दुष्काळाचे ढग अधिक काळेकुट्ट होताना दिसतात. रोज काळजी वाढवतात. दुष्काळाचे चटके सोसून खेडी अगोदरच बकाल झाली आहेत. या अवर्षणाने तर खेड्यांचा सारा जीवनरस शोषून घेतलेला दिसतो. गप्पांचे पार मुके बनले. शिवारातील पिकांनी माना टाकल्या. विहिरी खोल गेल्या म्हणण्यापेक्षा आटल्या. पाण्यासाठी पायपीट आणि ट्रॅक्टरची प्रतीक्षा वाढली. डोकी भणानून गेली. कानाभोवती फेर घालणाºया चिलटांनी तर वातावरण आणखी भकास केले. प्रत्येक जण एकमेकांशी बोलताना बोलण्याची क्रिया पार पाडताना दिसतो. हवा-पाण्याच्या गप्पा होतात. कुठे पंधरा मिनिटे पाऊस झाल्याची बातमीही अंगावर पिसारा फिरवल्यासारखी वाटते. मनातली हिरवळ दाटून येते. डोळे मिटले की हिरवाई पसरते, उघडताच उन्हाळा जाणवतो.पूर्वीसारखा पाऊस भरवशाचा राहिला नाही. तो झड धरत नाही. संध्याकाळचा पाऊस पाहुण्यासारखामुक्कामाला थांबायचा. श्रावणात ऊन-पावसाचा खेळ चालायचा. लोखंड्या झोडपून काढायचा, हे रंग पावसाचे बदलले, त्याचा स्वभाव बदलला. तो बेभरवशाचा झाला, माणसासारखा. माणसाचा तरी काय भरवसा. सोशल मीडियाच्या युगात तर माणसातील किती नवनवीन राक्षसी प्रवृत्ती उफाळून येताना दिसतात. माणूसपण संपलं का, असा प्रश्न पडतो. परवाची मुंबईची बातमी. एका फ्लॅटमध्ये वृद्ध महिलेचा सांगाडाच सापडला. मुलाला चार महिन्यांनंतर आईची आठवण झाली. यावरून माणूसपणाचे मोजमाप केले तर पावसाचे काय चुकले? तो मुक्कामाला थांबत नाही. आपणही आप्तस्वकीयांकडे सुख-दु:खाच्या समाचाराला गेलो तरी टाकणं टाकल्यासारखं धड त्यांच्या आनंदात किंवा दु:खात मनापासून सामील होत नाही, मग पावसाने तरी का कोसळावे. फक्त पाऊसच बदलला नाही, तर माणूसही बदलला आहे.वराहमिहिरापासून ते आजपर्यंत पावसाचे ठोकताळे मांडले गेले. या निकषांचा आधार घेऊन अंदाज वर्तविले जातात; पण पाऊस मात्र हुलकावणी देतो. आजही आधुनिक तंत्रज्ञानाला त्याच्या लहरीपणाचा अंदाज येत नाही. यावर्षी सरासरीच्या ९४ टक्के पाऊस होणार, असे भाकीत केले गेले. देशभरातील पावसाची सरासरी विचारात घेऊन हे भाकीत असते आणि कागदावर तेवढा पाऊस पडतो.आपल्याकडे कोकण, प. महाराष्ट्रातील पाऊस ही सरासरी भरून काढतो; पण मराठवाडा आणि विदर्भ कोरडे राहतात, हे काही यावर्षीचे नाही. पाच वर्षांतून तीन वर्षे तरी हाच पावसाचा स्वभावधर्म राहिला आहे. म्हणजे कागदावरचा पाऊस समाधानकारक असला तरी मराठवाडा, विदर्भाची जमीन आसुसलेली, भेगाळलेलीच असते. वातावरणातील हा कोरडेपणा मनात झिरपतो. मन कोरडे होते. झटझटून काही करण्याची जीवनेच्छा संपते. हे आता जागोजागी दिसत आहे. माणसातील कोरडेपणा प्रखरपणे जाणवतो. यावर्षी मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य ही नक्षत्रे संपली. चार नक्षत्रांमध्ये २६ दिवस पाऊस झाला, पण तोही सर्वत्र झालेला नाही. पिकांनी माना टाकल्याने यापुढे पाऊस आला तरी उत्पादनात ६० टक्के घट असेल. म्हणजे पिके कुपोषित बनली. पावसाने दडी मारली की, त्याचा रुसवा काढण्यासाठी ‘धोंडी धोंडी पाणी दे’ असा एक कार्यक्रम खेड्यापाड्यातून चालतो. लहान मुलांच्या अंगावर कडुनिंबाच्या पानांचे डगळे बांधून मिरवणूक काढतात आणि मिरवणुकीवर घराघरातून पाणी ओतले जाते. कधी महादेवाचे देऊळ पाण्याने भरून टाकतात, पिंड बुडेपर्यंत पाणी ओतले जाते. आता हे सारे निष्फळ ठरत आहे. खरे तर श्रद्धेला बसणारा धक्का; पण दरवर्षी ‘धोंडी धोंडी...’ यंत्रवत केले जाते. यज्ञ, याग, भंडारा यांचाही बोलबाला आहेच; पण पाऊस काही पडत नाही.यंदाचे वर्ष भयानक दिसते. आतापर्यंत ५१८ शेतकºयांनी फासात मान अडकवून घेतली. एक दोरी किंवा टोपणभर कीटकनाशक. सोप झालं आहे मरण. सगळ्याच वेदना. काळजी झटक्यात संपवण्याचं सोपं साधन या शेतक-याने शोधले. जुगाड करीत जगण्याची जन्मजात कला असलेल्या बळीराजाने मरणाचाही ‘जुगाड’ केला, आता तर हे दु:ख आकडेवारीत जाऊन बसले. आता दरमहिना, दरवर्षी स्कोअर पाहायचा, एवढी निगरगट्ट मनं बनली. जसा दुष्काळ पसरत जाईल तसा हा स्कोअर वाढत जाणार. बरं झालं याचे काही पावसासारखे निकष शोधले नाहीत. दुष्काळाच्या वणव्याची एवढी सवय झाली की, आता काही वाटतच नाही. कारण मन रितं झालं, कोरडं झालं. जमीन आणि मन याचा ओलावाच काय तो प्राण असतो बाकी कलेवर.