काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयावर राहुल गांधी अखेरपर्यंत ठाम राहिले. आपण आता काँग्रेसचे अध्यक्ष नाही, असे त्यांनी स्पष्टपणे जाहीर केले. या घोषणेसोबत राहुलजींनी पक्षाला लिहिलेले चार पानांचे एक पत्रही प्रसिद्ध केले. व्यक्तिश: माझ्यासाठी हा अत्यंत दु:खद प्रसंग आहे. पण मी राहुलजींच्या धाडसाची व सुस्पष्ट दृष्टिकोनाची प्रशंसा करतो. काँग्रेस पक्षास नवसंजीवनी मिळावी या दृष्टीनेच त्यांनी हा पदत्याग केला, हे अगदी उघड आहे. आपल्या अध्यक्षपदाच्या काळात काँग्रेसचा एवढा दारुण पराभव झाला याचे आणि एकूणच पक्षाची बिकट स्थिती याचे त्यांनाही नक्कीच दु:ख झाले असणार. मला असे वाटते की, राहुलजींनी मनापासून कठोर मेहनत केली, पण काँग्रेसकडून पक्ष म्हणून त्यांना साथ मिळाली नाही. काँग्रेसमध्ये आमूलाग्र परिवर्तन होण्याची गरज राहुलजींनी त्यांच्या पत्रात प्रतिपादित केली, ते योग्यच आहे.
गेल्या ३ जूनचा माझा हा कॉलम याच विषयावर होता. काँग्रेसची एवढी शोचनीय अवस्था का झाली, याचे सविस्तर विश्लेषण मी त्यात केले होते. काँग्रेसमध्ये संघटना नावाची गोष्ट अजिबात राहिलेली नाही, हे नाकारता न येणारे वास्तव आहे. पक्षात कुठे सेवादल दिसत नाही, ‘एनएसयूआय’ दिसत नाही की महिला काँग्रेसचे अस्तित्वही जाणवत नाही. पक्षाची ‘इंटक’ ही कामगार संघटना तर अस्ताला गेल्यासारखी वाटते.
महाराष्ट्रातील काँग्रेसच्या स्थितीविषयी मी राहुलजींना नेहमीच वस्तुस्थिती सांगत आलो. संघटनेच्या पातळीवर एका मोठ्या ‘आॅपरेशन’ची गरज होती. पण पक्षात कोंडाळे करून बसलेल्या चौकडीला ते मान्य नव्हते. नेमका कोण आपला आहे, कोण स्वत:चा फायदा करून घेण्यासाठी जवळीक करत आहे, हे सर्व बारकाईने पाहण्याची गरज होती. परंतु तसे होऊ शकले नाही. ज्यांचे काँग्रेसशी कधीही समर्पण भावनेने नाते नव्हते ते पदे मिरवीत राहिले. पडत्या काळात जे काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले त्यांना दूर ठेवले गेले. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकून पुन्हा सत्तेत येण्याची द्वाही मिरविली आहे. पण काँग्रेसमध्ये काही हालचाल होताना दिसत नाही.
पक्ष नव्या दमाने पुन्हा उभा राहावा, यासाठीच राहुलजींनी त्याग केला आहे. त्यांचे पिता राजीव गांधी यांनीही देशासाठी मोठा त्याग केला होता. मला असे वाटते की, राहुलजी नेहमीच पक्षासोबत राहतील, पक्षाला दिशा दाखविण्याचेही काम करतील. पण कालांतराने राहुलजींना पुन्हा एकदा पक्षाची धुरा आपल्या हाती घ्यावीच लागेल. त्यांची प्रतिमा उजळण्याची आज गरज आहे. राहुलजींमध्ये क्षमता आहे, देशभक्ती आहे, काम करण्याची ऊर्मी आणि निष्ठा आहे. त्याग, तपश्चर्या व राष्ट्रीय आंदोलनाचा वारसाही त्यांच्या जोडीला आहे. त्याचा नक्कीच उपयोग होईल.- विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरिअल बोर्ड,लोकमत समूह