शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तत्त्वत: सोबत, सरसकट विरोधात!

By admin | Updated: June 27, 2017 00:44 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षासोबतच्या संबंधांबाबत खरोखरच संभ्रमावस्थेत आहेत, की ते जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करीत आहेत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षासोबतच्या संबंधांबाबत खरोखरच संभ्रमावस्थेत आहेत, की ते जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करीत आहेत, हे कळायला काही मार्ग नाही. भाजपसोबत नेमके कसे संबंध राखायचे, या मुद्यावर ते संभ्रमित असतील, तर शिवसेनेविषयी सहानुभूती बाळगून असलेल्या मंडळींनी त्या पक्षाच्या भवितव्याबद्दल चिंता केलेली बरी; परंतु काही राजकीय समीकरणे मांडून ते जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करीत असतील, तर मात्र त्यांना राजनीती निपुण नेत्याचा दर्जा द्यायला हरकत नाही. राष्ट्रीय राजकारणात नरेंद्र मोदींचा उदय झाल्यापासून, उद्धव ठाकरे एकीकडे सातत्याने भाजपवर टीकेचे विखारी बाण डागत आहेत आणि दुसरीकडे त्याच पक्षाशी सत्तासोबतही करीत आहेत. पतीपत्नीने दिवसभर कचाकचा भांडायचे आणि रात्री शय्यासोबत करायची, असाच काहीसा हा प्रकार म्हणावा लागेल. महाराष्ट्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या कृषी कर्जमाफीच्या मुद्यावरून पुन्हा एकदा शिवसेना व भाजपमधील संबंधांचे हे स्वरुप समोर आले आहे. कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतला आहे आणि शिवसेना सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे निर्णयाचे जे काही बरेवाईट परिणाम समोर येतील त्याची जबाबदारी शिवसेनेवरही येते; पण कर्जमाफीच्या यशाचे शत-प्रतिशत श्रेय घेतानाच, त्याच निर्णयावरून सरकारवर टीकेचे आसूड ओढणे उद्धव ठाकरे यांनी सुरू केले आहे. कृषी कर्जमाफीचा विषय ऐरणीवर आल्यापासून, महाराष्ट्रात तत्त्वत:, सरसकट आणि निकष हे तीन शब्द सातत्याने विनोद निर्मितीसाठी वापरल्या जात आहेत. समाजमाध्यमांमध्ये तर या तीन शब्दांवर बेतलेल्या विनोदांचा अक्षरश: पूर आला आहे. शिवसेना व भाजपमधील सध्याच्या संबंधांचे वर्णन हे शब्द वापरून करायचे झाल्यास, ‘तत्त्वत: सोबत, सरसकट विरोधात!’ असे करता येईल. वास्तविक संधिसाधूपणा हाच राजधर्म बनलेल्या सध्याच्या युगात दोन राजकीय पक्षांनी तब्बल २५ वर्षे युती टिकविणे, हे खरोखरच कौतुकास्पद म्हणावे लागेल. सर्वसामान्यांसाठी फार काही करून दाखविता आले नसले तरी, २५ वर्षे युतीचा धर्म निभविण्याचे अशक्यप्राय काम शिवसेना व भाजपने करून दाखविले, याचे श्रेय उभय पक्षांना द्यायलाच हवे! दुर्दैवाने मोठा भाऊ कोण, या वादात युतीच्या पारदर्शकतेची काच टिचकली आणि सत्तेच्या चिकट गोंदानेही ती सांधणे शक्य होत नसल्याचे नित्य समोर येत आहे. देशातील राजकीय अवकाश शत-प्रतिशत व्यापून टाकण्याची भाजपची महत्त्वाकांक्षा आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरेंना जो मानमरातब मिळाला तोच मलाही मिळायला हवा ही उद्धव ठाकरेंची अपेक्षा, या दोहोतील संघर्षाचा परिपाक म्हणजे शिवसेना व भाजप यांच्या संबंधांमधील कटुता! गत फेब्रुवारीमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान उद्धव ठाकरेंनी मुखपत्राला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीमध्ये त्यांची ही अपेक्षा स्पष्ट शब्दांमध्ये मांडली होती. मी बाळासाहेबांचा वारसदार असल्याने महाराष्ट्रात मीच सर्वेसर्वा आहे आणि भाजपलाही ते मान्य करावेच लागेल, असे ते तेव्हा गरजले होते. दुर्दैवाने श्रेष्ठत्वाच्या या लढाईत दोन्ही पक्षांना सर्वसामान्यांप्रतिच्या अपेक्षित बांधिलकीचा विसर पडला आहे. राज्यात सत्तांतर होऊन तीन वर्षे उलटल्यानंतर, शेतकऱ्यांसह समाजाच्या इतरही अनेक घटकांमध्ये कमालीची अस्वस्थता व्याप्त आहे. शेतकरी कर्जमाफीमुळे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी लांबणीवर पडल्यास, उद्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्येही असंतोष उफाळणार आहे. विरोधी पक्षांसाठी खरे तर ही पर्वणीच म्हणायला हवी; पण काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही प्रमुख विरोधी पक्ष मरगळलेल्या अवस्थेतून बाहेर पडायला तयार दिसत नाहीत. त्यामुळेच सत्ताधारीही आम्हीच अन् विरोधकही आम्हीच, अशी भूमिका घ्यायला शिवसेनेचे फावत आहे. किमान लोकसभा व विधानसभेची निवडणूक पार पडेपर्यंत तरी शिवसेनेकडून भाजपवर वाग्बाण डागणे बंद होण्याची शक्यता नाही. भाजपला दोन्ही निवडणुकांमध्ये कमीअधिक फरकाने २०१४ मधील यशाची पुनरावृत्ती करता आल्यास, शिवसेनेला एक तर निमूटपणे भाजपचे मांडलिकत्व स्वीकारावे लागेल किंवा उघडपणे विरोधकाची भूमिका घ्यावी लागेल. त्याच्या उलट घडल्यास, म्हणजे शिवसेना सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरल्यास, भाजपला किमान महाराष्ट्रापुरते तरी शत-प्रतिशतचे स्वप्न बासनात बांधून ठेवून, शिवसेना मोठा भाऊ असल्याचे चुपचाप मान्य करावे लागेल. या दोन शक्यतांपैकी काहीही न घडता, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने उसळी घेतली, तर मात्र शिवसेना व भाजपला मोठा भाऊ-छोटा भाऊचा वाद गुंडाळून ठेवण्याचा वा कायमस्वरुपी काडीमोड घेण्याचा पर्याय निवडावा लागेल. थोडक्यात, शिवसेना व भाजपमधील रिकाम्या भांड्यांचा खणखणाट महाराष्ट्रातील जनतेला किमान दोन वर्षे तरी सहन करावाच लागणार आहे. दोन वर्षांनंतर ते एक तर गुण्यागोविंद्याने नांदतील किंवा रीतसर काडीमोड घेतील. तोपर्यंत मात्र ते तत्त्वत: सोबत, पण सरसकट विरोधात असतील. त्यासाठीचे त्यांचे निकष तपासण्याच्या भानगडीत कुणी पडू नये, हेच बरे!