शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

प्रग्यान झोपला, आदित्य जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 07:21 IST

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर शंभर मीटर रांगत राहिलेला प्रग्यान रोव्हर व त्याला तिथे घेऊन जाणाऱ्या विक्रम लँडरला किमान चौदा दिवसांसाठी ...

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर शंभर मीटर रांगत राहिलेला प्रग्यान रोव्हर व त्याला तिथे घेऊन जाणाऱ्या विक्रम लँडरला किमान चौदा दिवसांसाठी थोपटून झोपविण्यात आले, त्याच दिवशी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य एल-१ हे यान रवाना केले. अंतराळात तीन महिने प्रवास करून १५ लाख किलोमीटर अंतरावरील लॅग्रांज-१ नावाच्या विस्मयकारक टापूत हे यान १२५ दिवसांनी पोहोचेल. पृथ्वीपासून सूर्याचे अंतर १५ कोटी किलोमीटर असल्याने तिथूनही सूर्य खूप लांब आहेच. तरीही या टापूचे फायदे हे आहेत की पृथ्वी व सूर्य या दोहोंची गुरुत्वाकर्षण शक्ती एकमेकांना या बिंदूवर निरस्त करीत असल्याने कोणतीही वस्तू स्थिर राहील. शिवाय, सूर्याच्या निरीक्षणात ग्रहण किंवा अन्य अडथळे येणार नाहीत. सूर्य कधीच आदित्य एल-१ च्या नजरेआड होणार नाही. सूर्याच्या तापमानातील चढ-उतार, सौरवारे व वादळे, चुंबकीय लहरी आदींचा अभ्यास या यानावरील सात उपकरणे पुढची पाच-दहा वर्षे करीत राहील.

विशेषत: पृथ्वीवर नैसर्गिक संकटे आणणाऱ्या, हवामानावर बरे-वाईट परिणाम घडविणाऱ्या सौरवादळांची आगाऊ सूचना काही तास तरी आधी मिळेल. कारण, प्रकाशवर्षांच्या गणिताने एल-१ टापूपासून पृथ्वीचे अंतर अवघे पाच प्रकाश सेकंद आहे. युरोपियन स्पेस एजन्सीचे सोहो यान तिथे आदित्यची प्रतीक्षा करीत असेल. ही छोटी वेधशाळा तिथे १९९६ पासून कार्यरत आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून आदित्य एल-१ घेऊन निघालेल्या पीएसलव्ही अग्निबाण उड्डाणाच्या निमित्ताने इस्रोच्या या गगनभरारीच्या तपशिलात भरपूर चर्चा झाली आहे. त्यांची पुनरुक्ती करण्यापेक्षा इतकेच म्हणता येईल, की ब्रह्मांडाच्या पोकळीत कोट्यवधी किलोमीटर अंतरावर पोहोचण्याचे तंत्र व विज्ञान भारताने पूर्णपणे आत्मसात केेल्याबद्दल हे शिक्कामोर्तब आहे. प्रारंभी भारत त्यात थोडा मागे होता; परंतु, चंद्रयान-३ च्या रूपाने इतरांना जमले नाही ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रमला उतरवून ती पिछाडी भारताने सव्याज भरून काढली. त्या यशाने आत्मविश्वास व उत्साह कैकपटीने वाढलेल्या शास्त्र-तंत्रज्ञांनी सूर्यावरील मोहिमेचा मुहूर्त काढला.

आता, चंद्रयान-३ व आदित्य एल-१ या दोन यशस्वी मोहिमांचा वेगळ्या अंगाने विचार करायला हवा. विशेषत: ग्रहदशा किंवा त्यासारख्या अवैज्ञानिक गोष्टींमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांच्या दृष्टिकाेनात बदल होईल, वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. अशा लागोपाठच्या यशस्वी मोहिमांचा एक अप्रत्यक्ष फायदाही हाच असतो. जगातील प्रगत, विकसित राष्ट्रांमध्ये छोट्या-मोठ्या गोष्टींचा वैज्ञानिक विचार करण्याची जी स्थिती दिसते, तिच्यामागे अशा अंतराळ किंवा सागरी मोहिमांचे मोठे योगदान आहे. विशेषत: युरोप खंडातील देशादेशांत शतकानुशतके सागरी मोहिमांची एक स्पर्धाच होती. पिढ्यांमागे पिढ्या अशा मोहिमांवर निघालेल्या जगाने पाहिल्या. त्यातून महासागराचा, निसर्गाचा अभ्यास वाढला. एकेका राष्ट्राच्या जगाच्या काेनाकोपऱ्यात वसाहती झाल्या. तिथल्या नोकऱ्यांच्या निमित्ताने शिक्षणाची दिशा बदलली. आधुनिक जगाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. तिला पुढे औद्योगिक क्रांतीचे बळ मिळाले. उद्योगांमधील रोजगाराच्या निमित्ताने विज्ञान, तंत्रज्ञानाचा प्रसार झाला. रशिया व अमेरिकेमधील शीतयुद्धादरम्यान या दोन्ही देशांत अंतराळ मोहिमांची स्पर्धा दिसली. सोव्हिएत युनियनने सुरुवातीला अमेरिकेला मागे टाकले.

अमेरिका इरेला पेटला आणि अंतराळ विज्ञानाबद्दल जगभर कौतुकमिश्रीत कुतूहल तयार झाले. पारतंत्र्याच्या बेड्या परिश्रमाने तोडलेल्या आणि स्वातंत्र्याच्या सुरुवातीलाच भूक व दारिद्र्याचा सामना करणाऱ्या भारतासारख्या गरीब देशालाही या क्षेत्रात उतरावे लागले. सुरुवातीच्या काळात केवळ अवकाश मोहिमाच नव्हे तर संरक्षण सिद्धतेसह सगळ्याच क्षेत्रात रशिया भारताचा साथीदार होता. आता भारत या दोन्ही, तसेच जपान, चीन व युरोपीय संघ या महासत्तांना आव्हान देत आहे. चंद्र व सूर्याकडील मोहिमांनी त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आता या क्षेत्रात अधिक प्रमाणात रोजगार तयार होतील, नवी दालने खुली होतील. त्या संधींवर स्वार होण्यासाठी नवी पिढी त्यासाठी आवश्यक असलेले शिक्षण घेऊ लागेल. आपोआप ती वैज्ञानिक पद्धतीने विचार करायला लागेल आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे एकूणच भारतीय समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागेल. आदित्यला शुभेच्छा देताना अशी अपेक्षा नजीकच्या भविष्यकाळात ठेवायला हरकत नाही.

टॅग्स :Chandrayaan-3चंद्रयान-3Aditya L1आदित्य एल १