शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

प्रग्यान झोपला, आदित्य जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 07:21 IST

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर शंभर मीटर रांगत राहिलेला प्रग्यान रोव्हर व त्याला तिथे घेऊन जाणाऱ्या विक्रम लँडरला किमान चौदा दिवसांसाठी ...

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर शंभर मीटर रांगत राहिलेला प्रग्यान रोव्हर व त्याला तिथे घेऊन जाणाऱ्या विक्रम लँडरला किमान चौदा दिवसांसाठी थोपटून झोपविण्यात आले, त्याच दिवशी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य एल-१ हे यान रवाना केले. अंतराळात तीन महिने प्रवास करून १५ लाख किलोमीटर अंतरावरील लॅग्रांज-१ नावाच्या विस्मयकारक टापूत हे यान १२५ दिवसांनी पोहोचेल. पृथ्वीपासून सूर्याचे अंतर १५ कोटी किलोमीटर असल्याने तिथूनही सूर्य खूप लांब आहेच. तरीही या टापूचे फायदे हे आहेत की पृथ्वी व सूर्य या दोहोंची गुरुत्वाकर्षण शक्ती एकमेकांना या बिंदूवर निरस्त करीत असल्याने कोणतीही वस्तू स्थिर राहील. शिवाय, सूर्याच्या निरीक्षणात ग्रहण किंवा अन्य अडथळे येणार नाहीत. सूर्य कधीच आदित्य एल-१ च्या नजरेआड होणार नाही. सूर्याच्या तापमानातील चढ-उतार, सौरवारे व वादळे, चुंबकीय लहरी आदींचा अभ्यास या यानावरील सात उपकरणे पुढची पाच-दहा वर्षे करीत राहील.

विशेषत: पृथ्वीवर नैसर्गिक संकटे आणणाऱ्या, हवामानावर बरे-वाईट परिणाम घडविणाऱ्या सौरवादळांची आगाऊ सूचना काही तास तरी आधी मिळेल. कारण, प्रकाशवर्षांच्या गणिताने एल-१ टापूपासून पृथ्वीचे अंतर अवघे पाच प्रकाश सेकंद आहे. युरोपियन स्पेस एजन्सीचे सोहो यान तिथे आदित्यची प्रतीक्षा करीत असेल. ही छोटी वेधशाळा तिथे १९९६ पासून कार्यरत आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून आदित्य एल-१ घेऊन निघालेल्या पीएसलव्ही अग्निबाण उड्डाणाच्या निमित्ताने इस्रोच्या या गगनभरारीच्या तपशिलात भरपूर चर्चा झाली आहे. त्यांची पुनरुक्ती करण्यापेक्षा इतकेच म्हणता येईल, की ब्रह्मांडाच्या पोकळीत कोट्यवधी किलोमीटर अंतरावर पोहोचण्याचे तंत्र व विज्ञान भारताने पूर्णपणे आत्मसात केेल्याबद्दल हे शिक्कामोर्तब आहे. प्रारंभी भारत त्यात थोडा मागे होता; परंतु, चंद्रयान-३ च्या रूपाने इतरांना जमले नाही ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रमला उतरवून ती पिछाडी भारताने सव्याज भरून काढली. त्या यशाने आत्मविश्वास व उत्साह कैकपटीने वाढलेल्या शास्त्र-तंत्रज्ञांनी सूर्यावरील मोहिमेचा मुहूर्त काढला.

आता, चंद्रयान-३ व आदित्य एल-१ या दोन यशस्वी मोहिमांचा वेगळ्या अंगाने विचार करायला हवा. विशेषत: ग्रहदशा किंवा त्यासारख्या अवैज्ञानिक गोष्टींमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांच्या दृष्टिकाेनात बदल होईल, वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. अशा लागोपाठच्या यशस्वी मोहिमांचा एक अप्रत्यक्ष फायदाही हाच असतो. जगातील प्रगत, विकसित राष्ट्रांमध्ये छोट्या-मोठ्या गोष्टींचा वैज्ञानिक विचार करण्याची जी स्थिती दिसते, तिच्यामागे अशा अंतराळ किंवा सागरी मोहिमांचे मोठे योगदान आहे. विशेषत: युरोप खंडातील देशादेशांत शतकानुशतके सागरी मोहिमांची एक स्पर्धाच होती. पिढ्यांमागे पिढ्या अशा मोहिमांवर निघालेल्या जगाने पाहिल्या. त्यातून महासागराचा, निसर्गाचा अभ्यास वाढला. एकेका राष्ट्राच्या जगाच्या काेनाकोपऱ्यात वसाहती झाल्या. तिथल्या नोकऱ्यांच्या निमित्ताने शिक्षणाची दिशा बदलली. आधुनिक जगाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. तिला पुढे औद्योगिक क्रांतीचे बळ मिळाले. उद्योगांमधील रोजगाराच्या निमित्ताने विज्ञान, तंत्रज्ञानाचा प्रसार झाला. रशिया व अमेरिकेमधील शीतयुद्धादरम्यान या दोन्ही देशांत अंतराळ मोहिमांची स्पर्धा दिसली. सोव्हिएत युनियनने सुरुवातीला अमेरिकेला मागे टाकले.

अमेरिका इरेला पेटला आणि अंतराळ विज्ञानाबद्दल जगभर कौतुकमिश्रीत कुतूहल तयार झाले. पारतंत्र्याच्या बेड्या परिश्रमाने तोडलेल्या आणि स्वातंत्र्याच्या सुरुवातीलाच भूक व दारिद्र्याचा सामना करणाऱ्या भारतासारख्या गरीब देशालाही या क्षेत्रात उतरावे लागले. सुरुवातीच्या काळात केवळ अवकाश मोहिमाच नव्हे तर संरक्षण सिद्धतेसह सगळ्याच क्षेत्रात रशिया भारताचा साथीदार होता. आता भारत या दोन्ही, तसेच जपान, चीन व युरोपीय संघ या महासत्तांना आव्हान देत आहे. चंद्र व सूर्याकडील मोहिमांनी त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आता या क्षेत्रात अधिक प्रमाणात रोजगार तयार होतील, नवी दालने खुली होतील. त्या संधींवर स्वार होण्यासाठी नवी पिढी त्यासाठी आवश्यक असलेले शिक्षण घेऊ लागेल. आपोआप ती वैज्ञानिक पद्धतीने विचार करायला लागेल आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे एकूणच भारतीय समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागेल. आदित्यला शुभेच्छा देताना अशी अपेक्षा नजीकच्या भविष्यकाळात ठेवायला हरकत नाही.

टॅग्स :Chandrayaan-3चंद्रयान-3Aditya L1आदित्य एल १