महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार तीन दिवसांचा विदर्भ पाहाणीदौरा (?) करून परत गेले आहेत. विदर्भात अवर्षण नाही, दुष्काळ नाही, कोणती निवडणूक जवळ नाही आणि पक्षातही तेढ म्हणावी अशी माणसे नाहीत. अशा स्थितीत त्यांच्यासारख्या व्यस्त व अष्टावधानी नेत्याने हा दौरा का केला असेल याचीच शंका अनेकांच्या मनात आहे. तिकडे अजित पवार अडकले आहेत, सुनिल तटकऱ्यांच्या मागे चौकशा लागल्या आहेत, भुजबळांचा एक पाय बाहेर आहे आणि पक्षातील अनेक बड्यांच्या वाताहातीची चिन्हे आहेत. तशीही ‘मला विदर्भ समजला नाही’ अशी कबुली काही काळापूर्वी पवारांनी स्थानिक पत्रकारांजवळ दिली होती. आताही ‘विदर्भातील शेतकरी आत्महत्त्या का करतो याचे नक्की कारण मला कळले नाही’ असे ते म्हणाले आहेत. तरीही त्यांच्या श्रद्धाळू अनुयायांकडून ‘ते या आत्महत्त्यांची कारणे समजून घ्यायला आले’ असेच सांगितले जात आहे. या दौऱ्यात पवारांनी बॅ. वानखेडे यांच्या जन्मशताब्दी सोहळ््यात मुख्यमंत्र्यांसोबत हजेरी लावली. एका पक्षसभेत आपल्या अनुयायांना मार्गदर्शन केले. यवतमाळच्या शेतकऱ्यांशी माफक संवाद साधला आणि क्रिकेट बोर्डाच्या श्रीनिवासन यांचीही भेट घेतली. पण यातल्या कशातूनही त्यांच्या येण्याचा खरा हेतू कोणाला कळला नाही. विदर्भात शेतकऱ्यांच्या समस्येएवढीच मोठी समस्या नक्षल्यांची आहे. मेळघाटातले कुपोषणही तसेच राहिले आहे. तेलंगणाने प्राणहिता नदी पळविल्यानंतर आंध्र प्रदेशाने इंद्रावतीच्या चोरीचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे होणारी बुडित क्षेत्रे मोठी व विदर्भाची वनसंपदा नाहिशी करणारी आहे. पवारांनी त्याविषयी या दौऱ्यात एक शब्दही उच्चारला नाही. सरकारवर माफक टीका केली आणि ती कोणालाही बोचणार नाही याची काळजी घेतली. विदर्भाच्या दौऱ्यावर येण्याआधी त्यांनी नरेंद्र मोदींची दिल्लीत आणि फडवणीसांची मुंबईत भेट घेतली. मराठवाड्यातील अवर्षणाची चर्चा करायला या भेटी झाल्या असे सांगितले गेले असले तरी त्यात तितकेसे तथ्य नाही. अवर्षणाची माहिती पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविणारी माध्यमे खूप आहेत. वास्तव हे की पवारांचा राज्यातील सगळा पक्षच कोणत्या ना कोणत्या अडचणीत आला आहे. अजित पवार, तटकरे आणि भुजबळ संकटात आहेत. आव्हाड, मेटे आणि आठवले दुरावले आहेत. तर पवारांचे आयुष्यभराचे स्नेही व विदर्भातील विश्वासू कार्यकर्ते दत्ता मेघे सहकुटुंब सहपरिवार भाजपात सामील झाले आहेत. एरव्ही पवारांच्या जवळ असणारी माणसेही त्यांच्या पक्षनिष्ठेबाबत आता संशयास्पद बनली आहेत. त्यामुळे अनिल देशमुख या ज्युनियर नेत्याची सोबत त्यांना या दौऱ्यात घ्यावी लागली. यवतमाळातही त्यांची माणसे एक तर पराभूत आहेत वा घरी शांत आहेत. नागपुरात त्यांना त्यांच्या अतिशय जुन्या व राजकारणातून निवृत्त झालेल्यांनाच सोबत घ्यावे लागले आहे. अजितदादांचा उठाव संपला आहे आणि सुप्रिया सुळ््यांना अद्याप उड्डाणच जमले नाही. निवड केलेले नेते निष्क्रिय असणे, जवळचे कार्यकर्ते दूर जाताना पाहावे लागणे, ज्यांच्यावर विश्वास ठेवला ती माणसे विश्वासघाती निघणे आणि याच काळात सत्तेपासून दूर राहावे लागणे या गोष्टी महाराष्ट्रावर तब्बल ४० वर्षे ताबा ठेवणाऱ्या शरद पवारांच्या मनाला केवढ्या यातना देत असतील याची कल्पना करता येते. त्यातून पवारांच्या जीवनाला एक सांस्कृतिक बाजू आहे. ते साहित्य संमेलनांची उद््घाटने करतात, त्यांच्या आयोजनामागे उभे राहतात, बक्षिसे देतात, सन्मान करतात आणि एखाद्याला हात देऊन मोठे करणे हे अजूनही त्यांना जमते. या स्थितीत त्यांना बाबासाहेब पुरंदऱ्यांबाबत अबोल राहणे भाग पडले, मराठवाड्याच्या वाङ्मयीन निवडणुकीत अपयश पाहावे लागले आणि प. महाराष्ट्रातही त्यांची हक्काची राजकीय व सामाजिक क्षेत्रे त्यांच्यापासून दूर जाताना दिसली. दिल्लीत काम नाही, मुंबईत कार्यक्रम नाही आणि बारामतीसह प. महाराष्ट्रातही फारसे काही करायचे राहिले वा उरले नाही. पवारांचा विदर्भ दौरा या पार्श्वभूमीवरचा आहे हे लक्षात घेतले की त्याचे प्रयोजनही समजू लागते. आजवर सांभाळलेली आपली किती कोकरे अजून आपल्या कळपात आहेत हे चाचपणे, दूर गेलेली माणसे हाकेच्या टप्प्यात आहेत काय ते पाहाणे, प. महाराष्ट्रातील अस्वस्थ वर्तमानातून काही काळ दूर जाणे आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर आपली छाप आणखी काही काळ कायम करण्याच्या तरतुदी शोधणे ही त्यांची आताची गरज आहे. वय झाले, राजकारण क्षीण झाले, जवळची माणसे स्वयंभू बनली आणि हाताशी धरून वाढविलेली माणसे वेगवेगळ्या खोड्यात अडकलेली दिसली की प्रौढ नेत्याच्या वाट्याला असेच एकाकीपण येत असते. खरे तर अशा प्रत्येकच पराभूत प्रौढाच्या वाटचालीत येणारे हे अपरिहार्य असे वळण आहे. पवारांनी राज्याची फार मोठी सेवा केली आहे. अनेकांवर त्यांच्या उपकारांचे आणि मदतीचे ओझे आहे. त्यांच्याविषयीच्या सद््भावनाही लोकमानसात अद्याप कायम आहेत. त्याचमुळे आताचे त्यांच्या आयुष्याचे हे एकाकी व दुर्लक्षित वळण केवळ सुखकारकच नाही तर त्यांच्या नेतृत्त्वाला आणखी एक नवी उंची देणारे ठरावे ही सदिच्छा.
पवारांचे एकाकीपण
By admin | Updated: September 25, 2015 10:58 IST