सुब्रम्हण्यम स्वामी हे देशातील एक सरकलेले व जनाधार नसलेले पुढारी आहेत. आपल्या विक्षिप्त व चमत्कारिक वक्तव्यांपायी त्यांनी स्वत:ची व आपल्या पक्षाची (भाजप) प्रतिमाही, त्याचा नेता म्हणून घालविली आहे. शशी थरूरला अटक करा, शाहरूखला ताब्यात घ्या, मनमोहन सिंगांविरुद्ध खटला भरा आणि ‘मला दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलपतीपद द्या’ अशा एकाहून एक सनसनाटी आणि लाचार वक्तव्यांनंतर त्यांनी ‘म. गांधींच्या खुनाचा खटला नव्याने चालवायला घ्या’ अशी वायफळ मागणी परवा केली. आपले प्रत्येक वाक्य एका नव्या वादाला जन्म देते अशा गंडाने पछाडलेल्या या स्वामींचा बकवा अलीकडे एवढा वाढला की त्याची फारशी दखल घेणे वृत्तपत्रांनीच कमी केले. (राहुल गांधी हे ब्रिटनचे नागरिक असल्याची त्यांची ताजी आवईही याच लायकीची व दखलपात्र नसलेली आहे. राहुल गांधींनी इंग्लंडमध्ये एक कंपनी स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता हा त्यांचा आरोप आहे. वास्तविक परदेशात कंपन्या उघडणे हा भारतीयांचा हक्क आहे. तरीही आज अस्तित्वात नसलेल्या कंपनीच्या एका कागदावर राहुल गांधींचे नाव चुकून टाकले गेले असल्याचे वास्तव आता उघड झाले आहे.) आताचे मोदी सरकार गांधी आणि नेहरू यांच्या देशसेवेची टवाळी करण्यात आणि त्यांच्यातील असल्या-नसल्या दोषांना मोठे करून दाखवण्यात आनंद घेणारे असल्यामुळे या स्वामींची बडबड त्याला चालते. अतिरेकी व आगखाऊ वक्तव्ये देणाऱ्या आपल्या खासदार व मंत्र्यांना हे सरकार जसे आवरत नाही तसे ते स्वामीच्या उंडारण्याकडेही जाणीवपूर्वक कानाडोळा करताना दिसले आहे. नथुराम गोडसेचा मृत्यूदिवस साजरा करू पाहणाऱ्या काही विद्वेषी माणसांनी सध्या जोर धरला आहे. त्यांना ठणकावत त्या मारेकऱ्याचा गौरव देशहिताचा नसल्याचे व गांधीजी संघासकट देशाला वंदनीय असल्याचे पत्रक संघाचे माजी बौद्धिक प्रमुख मा.गो. वैद्य यांनी अलीकडेच काढले आहे. त्यानंतर लागलीच या स्वामींची बुद्धी चाळवून त्यांनी गांधी खुनाच्या खटल्याची उजळणी करण्याची मागणी पुढे आणली आहे. गांधीजींना तीन गोळ्या लागल्या होत्या. पण चित्रात त्या चार दिसतात हा त्या घटनेनंतर तब्बल ६७ वर्षांनी स्वामींना लागलेला शोध आहे. ‘ही चौथी गोळी कुणाची हे शोधा’ असे त्यांचे म्हणणे आहे. देशात आणि जगात आजवर कोणाच्याही लक्षात न आलेली गोष्ट या स्वामींना आता दिसावी हे त्यांना लाभलेल्या दिव्यचक्षुंचे लक्षण असावे. या चक्षुंना इतरांना न दिसलेल्या अनेक गोष्टी आजवर दिसल्या आहेत. अटलबिहारी वाजपेयी हे किती वाईट गृहस्थ आहेत हे ६७ सालीच त्यांना समजले होते. मोरारजी देसार्इंच्या जनता मंत्रिमंडळातील निम्मे मंत्री मद्य घेतात ही गोष्ट ते सरकार अस्तित्वात आल्याक्षणीच त्यांनी जाहीर केली होती. वाजपेयी पंतप्रधान असतानाचे त्यांचे व्यक्तिगत व राजकीय दोष त्यांना ९९ मध्येच सांगता येत होते. पूर्वीचा जनसंघ, नंतरचा जनता पक्ष आणि आताचा भाजप यांत आपण नुसतेच राबतो आणि आपली हॉर्वर्डची विद्वत्ता त्यासाठी पणाला लावतो. पण या पक्षांनी आपल्याला खासदारकीपलीकडे काही दिले नाही. आपल्या अर्थविषयक ज्ञानाचीही त्यांनी उपेक्षा केली ही गोष्ट तब्बल ५० वर्षे मनात डाचत ठेवलेले ते गृहस्थ आहेत. देशातले आताचे राजकीय वातावरण ही आपल्याला लाभलेली एक चांगली संधी आहे आणि तिचा वापर करून आपले तारू पुढे रेटता येईल, असे त्यांना वाटत असावे. त्यातूनच त्यांचा आताचा बिथरलेपणा आला असावा. ‘देशाचा आर्थिक विकास करायचा असेल तर त्यातले असहिष्णू वातावरण संपले पाहिजे आणि आपल्याहून वेगळी मते असण्याऱ्यांची बाजू सहिष्णूतेने समजावून घेतली पाहिजे’ असे चांगले उद््गार मध्यंतरी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी काढले. त्यांचे ते वक्तव्य भाजपविरोधी आणि हिंदूविरोधी असल्याचा कांगावा करून राजन यांची हकालपट्टी करा अशी मागणी या स्वामींनी केली. पुढे तेच वक्तव्य मोदींनी केले तेव्हा गप्प राहण्याची राजकीय चतुराईही त्यांना दाखविता आली. रघुराम राजन यांची गणना जगातील पहिल्या क्रमांकाच्या दहा अर्थतज्ज्ञात केली जाते. सरकारचा दबाव झुगारून बँकांचे व्याजदर कमी करायला दीर्घकाळ नकार देण्याएवढे आत्मबळ व विश्वास त्यांच्यात आहे. अर्थमंत्री अरुण जेटलीही त्यांच्यापुढे हतबल दिसतात. अशा रघुरामांना हाकलण्याची मागणी स्वामींनी केली तेव्हा सरकारसह त्यांचा पक्षही हतबुद्ध झालेला दिसला. आपल्याला कोणीही खिजगणतीत घेत नाहीत ही स्वामींची खंत त्यामुळे आणखी बोलकी झाली. गांधी खून खटल्याचा फेरविचार करण्याचा त्यांचा कांगावा आणि राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक असल्याची त्यांनी उठविलेली आवई त्यातून आली आहे. मोदींच्या सरकारने पं. नेहरूंची सव्वाशेवी जयंती साजरी केली नाही. तिकडे सुभाषबाबूंचे नाव पुढे करून त्यांना बदनाम करण्याचे आणि सरदारांचे नाव सांगत त्यांना कमी लेखण्याचे त्याचे राजकारणही सुरू आहे. ही वेळ गांधी खून खटला उकरायला चांगली आहे असेच बहुदा स्वामींना वाटले असणार. मात्र हा खटला खरोखरीच पुढे आला तर त्यातले काही संशयित कसे सुटले तेच बाहेर येण्याची शक्यता अधिक आहे, ही बाब बहुदा स्वामींच्या गावी नसावी, एवढेच येथे नोंदवायचे.
स्वामींचा बकवा
By admin | Updated: November 19, 2015 04:34 IST