शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

लोकमत : प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची ५० वर्षे

By विजय दर्डा | Updated: February 18, 2023 06:15 IST

लोकमतच्या पन्नास वर्षांच्या वाटचालीला उजाळा देणारा आणि भविष्याचे सूचन करणारा विशेष लेख.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, लोकमतचे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि लोकमतच्या नागपूर आवृत्तीचा सुवर्णमहोत्सव यानिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज नागपूर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने लोकमतच्या पन्नास वर्षांच्या वाटचालीला उजाळा देणारा आणि भविष्याचे सूचन करणारा विशेष लेख.

लोकमतच्या नागपूर आवृत्तीचा पहिला अंक १५ डिसेंबर १९७१ रोजी प्रकाशित झाला. या पहिल्या अंकातील विशेष लेखामध्ये भूमिका स्पष्ट करताना आमचे पिताश्री, मार्गदर्शक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजींनी कवी विनायकांची एक ओळ उद‌्धृत केली होती : ‘पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावि काळ, बोध हाच इतिहासाचा सदा सर्व काळ!’  

-  ५० वर्षांची यशस्वी आणि गौरवपूर्ण वाटचाल पूर्ण करून लोकमत नव्या क्षितिजाच्या दिशेने निघाले आहे. या दीर्घ प्रवासात प्रचंड संघर्ष करून लोकमत वंचित-पीडित-शोषितांच्या बाजूने भक्कमपणे उभे राहिले. प्रस्थापित वर्तुळाला छेद देत हे वृत्तपत्र समाजाभिमुख झाले. अनेक दिव्य पार पाडत आणि खाचखळग्यांतून प्रवास करीत लोकमतने महाराष्ट्र व्यापला.

लोकनायक बापूजी अणे यांनी यवतमाळमध्ये १९१८ मध्ये साप्ताहिक लोकमत सुरू केले. लोकमत हे नाव खुद्द लोकमान्य टिळकांनी दिले होते. पुढे जंगल सत्याग्रहातील ब्रिटिशांच्या दमनतंत्रामुळे ते साप्ताहिक बंद पडले. महात्मा गांधी यांच्या ‘सुराज्य’ संकल्पनेच्या तालमीत वैचारिक जडणघडण झालेले बाबूजी बंद पडलेले साप्ताहिक चालवावे या विचाराने परवानगी मागण्यासाठी स्वातंत्र्यानंतर बापूजींकडे गेले. तेव्हा, बापूजी म्हणाले, ‘त्या साप्ताहिकाचा अध्याय कधीचाच संपला आहे. परवानगी कशाला मागता?- ती आवश्यक नाही. परवानगी नव्हे तर शुभेच्छा देऊ शकतो’  आणि   १ मे १९५३ रोजी मध्य प्रांत व वऱ्हाडाचे तत्कालीन मुख्यमंत्री पंडित रविशंकर शुक्ल यांच्या हस्ते, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या उपस्थितीत साप्ताहिक लोकमतचा  यवतमाळातून  पुन्हा प्रारंभ झाला. १९६० मध्ये त्याचे द्विसाप्ताहिकात रूपांतर झाले; परंतु नागपूरमध्ये राष्ट्रीय विचारांचे वर्तमानपत्र नाही, ही खंत बाबूजींना  सलत होती. त्यातूनच नागपुरातून  दैनिकाच्या रूपात लोकमत प्रकाशित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. १५ डिसेंबर १९७१ पासून नागपूरमधून लोकमतचे प्रकाशन सुरू झाले. राज्याच्या उपराजधानीतून लोकमतचा प्रारंभ ही नव्या युगाची सुरुवात होती. लोकजागराच्या व्रताचे ते बीजारोपण होते,  कदाचित या धाडसाची पुरेशी कल्पना अन्य कुणाला नसेल; पण बाबूजींना त्याची पुरती जाणीव होती. स्वातंत्र्य मिळाल्याचा जयघोष थांबला होता. स्वतंत्र देशासमोरील आव्हाने ठळक बनत चालली होती. अशा वेळी राष्ट्रीय विचारांचे दैनिक देशाच्या हृदयस्थानातून अर्थात नागपुरातून सुरू करण्याचा विचार बाबूजींनी मूर्तरूपात आणला.

तेव्हाची  मराठी पत्रसृष्टी मोठ्या शहरांमध्ये प्रस्थापित झालेली. मुंबई, पुण्यातून वर्तमानपत्रे इतरत्र जायची. लोकमतच्या रूपाने हा प्रवाह उलट्या दिशेने सुरू झाला. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्याची ही सुरुवात होती.   लोकमतने  मळलेल्या वाटेवरून चालण्याचे टाळले. विपरीत परिस्थितीत, अनेक आघाड्यांवर लढत स्वत:चा मार्ग शोधला व तो परिश्रमपूर्वक विस्तारत नेला. वार्ताहर व वितरकांची फळी उभी केली. ज्ञान ही मक्तेदारी समजणाऱ्या वर्गाचा विचार न करता नवशिक्षित बहुजन वर्गातून बातमीदार निवडले. ग्रामीण पत्रकारांच्या नव्या पिढीची जडणघडण केली. नवे लेखक शोधले. त्यांच्या लिखाणाचा बाज जाणीवपूर्वक ग्रामीण ठेवला. बोलीभाषेला वर्तमानपत्रात स्थान मिळू लागले. वितरणाची नवी व्यवस्था उभी केली.  लोकमत तंत्रज्ञानाबाबत अग्रेसर राहिले. शहरांमधील मूठभर अभिजनांच्या प्रतिष्ठेचे लक्षण बनलेले वर्तमानपत्र खेड्यापाड्यात पोहोचले. माहितीची गंगा शेतीमातीच्या सुगंधासह प्रवाहित झाली. ‘नाही रे’ वर्गाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लोकमत सरसावला. मालकाने बेदम मारल्याने मजुराच्या पाठीवर उठलेल्या व्रणांचा फोटोही लोकमतमध्ये प्रकाशित होऊ शकतो, ही कल्पनाच त्या काळी विचार करण्यापलीकडची होती. ते धाडस लोकमतने केले. पुढे महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाला वळण देणाऱ्या बहुतेक सामाजिक चळवळी लोकमत चौकात जन्मल्या.  नागपूर पाठोपाठ लोकमतच्या विस्ताराची सुवर्णमुद्रा अवघ्या महाराष्ट्रासह  गोवा आणि पुढे दिल्लीवरही कोरली गेली.

विधायक कृतिशीलतेच्या मार्गावर लोकमत मार्गक्रमण करीत राहिला. कामगार, शेतकऱ्यांसोबतच महिला, युवक, विद्यार्थी या घटकांना अभिव्यक्तीची संधी बहाल झाली.  लोकमत सखी मंच, कॅम्पस क्लब, बालविकास मंच, लोकमत युवा मंच, संस्काराचे मोतीसारखे विविध उपक्रम... कारगिल युद्ध, भूकंप, महापुरासारख्या राष्ट्रीय आपत्तीवेळचा पुढाकार... सैनिकांच्या पाल्यांसाठी जमा निधीमधून वसतिगृहे, शाळांची उभारणी, मेळघाटातील कुपोषणग्रस्तांसाठी मदतनिधी...  शेतकऱ्यांसाठी कृषी मेळावे, धान उत्पादकांसाठी परिषदा, संत्रा उत्पादकांसाठी ऑरेंज फेस्टिव्हल असे किती सांगावे!. आपल्या संपादकांना लोकमतच्या व्यवस्थापनाने  पूर्ण स्वातंत्र्य दिले. लोकमत नेहमी संपादक व बातमीदारांच्या पाठीशी उभा राहिला. नागपुरातील फ्रीडम ऑफ प्रेसचे शिल्प हे त्या संपादकीय स्वातंत्र्याचे  दृश्य रूप आहे.  वृत्तपत्र विक्रेता हा वर्षानुवर्षे क्रमांक एकचे मराठी दैनिक या बिरुदावलीचा खरा मानकरी. त्याचे शिल्प उभारून, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्याचे अनावरण विक्रेत्यांच्याच हस्ते करून लोकमतने ही कृतज्ञता चिरंतन केली. लोकमतवर सातत्याने काँग्रेसचे मुखपत्र असल्याचे आरोप झाले. मात्र, ते कधीच खरे नव्हते. काँग्रेसचा निष्ठावंत पाईक म्हणून निवडणुकीच्या वेळी योग्य भूमिका घेऊ; परंतु वृत्तपत्र म्हणून लोकमत स्वतंत्रच राहील, असे बाबूजी सतत सांगत आले. आजही तेच तत्त्व पाळले जाते.  लोकमतवर अनेक बाजूंनी अनेक वार झाले. मात्र, लोकमतच्या सर्वसमावेशक भूमिकेमुळे हे आरोप आपोआपच बोथट झाले. ही वाटचाल काटेरी होती. त्या काट्यांचे ओरखडे अनुभवत, त्यातून तावून-सुलाखून पुढच्या प्रवासाला सिद्ध होता आले. काळासोबत चालताना सारे वार परतवून लावण्यातून आलेली परिपक्वताच आज पुढच्या प्रवासासाठी बळ देत आहे.

आतापर्यंत लोकमत ही अनेक अर्थांनी समाजाची, तर समाज ही लोकमतची गरज राहिली. ती ओळखून, हातात हात घालून आपण निर्धाराने पावले टाकत आलो. पुढची पन्नास-शंभर वर्षे लोकमतचीच असतील, ही खात्री या निर्धारामुळेच आहे. भविष्यात समाजापुढील प्रश्नांचा, समस्यांचा, माणसांच्या वेदनांचा गुंता वेगळा असेल आणि तो सोडविण्याची धुराही तरुण पिढीनेच सांभाळावी लागेल. त्यासाठी या वळणावर लोकमत परिवारातील चि. देवेंद्र, चि. ऋषी आणि चि. करण यांच्या सहकाऱ्यांची टीम  आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन अल्गोरिदम यासारख्या साधनांनी सज्ज आहे. ऑनलाइनच्या युगात अविरत सेवा देताना लोकमतने  ई-पेपरसह डिजिटल मीडियाच्या माध्यमातून सातासमुद्रापार झेप घेतली आहे. ‘न्यूज १८ लोकमत’ या २४ तास वृत्तवाहिनीचीही भर यात पडली आहे. जागतिकीकरणात जगभरातील दु:खांची जातकुळी जशी एकसारखी असेल, तसेच आशा-आकांक्षा, स्वप्ने व सुख-समाधानाचे संदर्भही सारखेच असतील. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही पोहोचलात तरी बोर्डरूममध्ये चर्चेवेळी आपल्या मातीचा सुगंध या पिढीला हवा असतो. हा जागतिक परिप्रेक्ष्य लक्षात घेऊन लोकमतला पुढची वाटचाल करावयाची आहे.

हे मल्टिमीडियाचे युग आहे. नवमाध्यमांचे आविष्कार, समाजमाध्यमांचे महत्त्व, माध्यमांमधील क्रांती आपण अनुभवतो आहोत. वर्तमानपत्रांसाठी ही वाट आव्हानांची असली तरी त्यातूनच नव्या वैश्विक संधींची कवाडे उघडत आहेत. ही वेळ त्या संधींवर स्वार होण्याची आहे. अवतीभोवतीच्या परिस्थितीचे संदर्भ बदलत असले तरी पत्रकारितेची मूल्ये, समाज हेच स्पंदन, वाचक हा केंद्रबिंदू हा पाया कायम राहील. मूल्ये जपून व्यवहार करण्याचे भान असेच राहील, ही खात्री या निमित्ताने देतो. गावोगावचे एजंट, विक्रेते, वार्ताहर, आजी-माजी कर्मचारी, जाहिरातदार, वाचक, हितचिंतक या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खरोखरच शब्दही अपुरे आहेत. अनेक दिव्य पार पाडत आणि खाचखळग्यांतून प्रवास करीत लोकमतला या सर्वाच्या बळावरच महाराष्ट्र, गोवा, दिल्ली व्यापता आली याची मला विनम्र जाणीव आहे. जनसामर्थ्याच्या बळावर हा रथ दौडत निघाला आहे. अजून बरेच चालायचे आहे. चरैवेति, चरैवेति!! अर्थात चालत राहा, चालत राहा! विश्वासाने, आत्मविश्वासाने व परस्परविश्वासाने!

(लेखक लोकमत समूह आणि एडिटोरियल बोर्डचे, चेअरमन आहेत)

 

टॅग्स :LokmatलोकमतJournalistपत्रकारVijay Dardaविजय दर्डा