शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

एक शिक्षक, एक शहाणं गाव... आणि एक शाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 07:38 IST

‘वर्ल्ड‌स‌् बेस्ट स्कूल २०२५’ या पुरस्काराच्या लघुयादीतील ४ भारतीय शाळांमध्ये एक आहे जालिंदरनगरची जि.प. प्राथमिक शाळा. या शाळेच्या प्रवासाबद्दल...

दत्तात्रय वारे, शिक्षक, जि. प. प्राथमिक शाळा

जालिंदरनगर, ता. खेड, जि. पुणे

जिल्हा परिषदेची शाळा म्हटली की तिची एक विशिष्ट प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. गळकी कौले, पडकी इमारत, मोडकी बाके आणि दुरवस्था… ही प्रतिमा सपशेल चुकीची असते असेही नाही. मला अशा दोन शाळांमध्ये काम करायची संधी मिळाली. सहसा अशी शाळा म्हणून नाक मुरडणे ही शिक्षकांची पहिली आणि स्वाभाविक प्रतिक्रिया असेल तर त्यात आश्चर्य काही नाही; मी मात्र ते आव्हान म्हणून स्वीकारले आणि बदलाची सुरुवातही तिथूनच झाली.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात जालिंदरनगर हे लहानसे गाव. इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत माझी बदली झाली तेव्हा शाळा बंद पडण्याच्या यादीत होती. पटसंख्या अवघी तीन  होती. तिथून पुढे वर्षभरात शाळेची पटसंख्या १२०वर जाऊन पोहोचली  आणि ‘मुख्यमंत्री माझी शाळा - सुंदर शाळा’ स्पर्धेत सर्वोत्तम ठरली. त्यापूर्वी मी वाबळेवाडीच्या शाळेत काम केले, तिथे पटसंख्या ३२ होती, शाळा म्हणजे दोन गळक्या खोल्या होत्या. दोन-अडीच वर्षांनी तिथे प्रवेश मिळवण्यासाठी ५००० मुलांची ‘वेटिंग लिस्ट’ लागली. - हा चमत्कार तुम्ही कसा काय करता?- असा प्रश्न मला अनेकदा विचारला जातो. त्यावर माझे उत्तर आहे - शिक्षकाचे प्रामाणिक, तळमळीचे प्रयत्न आणि जबाबदार लोकसहभाग!

प्राथमिक शाळेचा शिक्षक ही व्यक्ती गावात केंद्रस्थानी असते. ‘नजरेत’ही असते. या  शिक्षकाला शाळा, विद्यार्थी, गाव, ग्रामस्थ यांच्याप्रति प्रामाणिक तळमळ आणि आत्मीयता उपजतच असली पाहिजे. तिचे ढोंग करता येत नाही. शिक्षक तळमळीचा असेल आणि त्याचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर संपूर्ण गाव त्याच्या पाठीशी उभा राहतो आणि तिथून शाळेच्या कायापालटाला सुरुवात होते.

वाबळेवाडीमध्ये शाळेला चांगली इमारत, त्यासाठी पुरेशी जागा हवी, असे आम्ही म्हणताच ग्रामस्थांनी दीड एकर जागा शाळेला बक्षीसपत्र करून दिली. त्या जागेची ‘मार्केट व्हॅल्यू’ सात ते आठ कोटी रुपयांच्या घरात होती. तिथून जवळच असलेल्या एका माजी आमदाराच्या शाळेच्या पटसंख्येवर आमच्या शाळेमुळे परिणाम होऊ लागल्यावर आमदार महोदयांनी शाळेला सर्वतोपरी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ग्रामस्थ शाळेच्या पाठीशी उभे राहिले आणि ग्रामसभेत ठराव करून आमदारालाच गावबंदी केली. गावातील मुलांना चांगले शिक्षण देणारी आपली शाळा असावी, या लोकभावनेतूनच हे शक्य झाले.

सरकारी शाळा म्हटले की, ‘त्या शाळा ही सरकारची जबाबदारी’ ही अपेक्षा चुकीची नाही. पण सरकारच्या अखत्यारीत एक लाखांहून जास्त शाळा आहेत. सगळ्यांना देण्यासाठी निधी तरी सरकारकडे आहे की नाही कोणास ठाऊक? अशा परिस्थितीत ‘सरकार येईल आणि शाळा सुधारेल’ अशी अपेक्षा न करता शिक्षकानेच ग्रामस्थांच्या मदतीने हे करणे हा एकमेव मार्ग मला तरी दिसतो.

जालिंदरनगरच्या शाळेत काय नाही? इथले विद्यार्थी इंटिग्रेटेड आणि इनोव्हेटिव्ह पद्धतीचे शिक्षण घेतात. इथे २२ पेक्षा जास्त कौशल्ये शिकवली जातात. रोबोटिक्स, भारतीय आणि परदेशी भाषा, मेकॅनिक्स, कोडिंग, इलेक्ट्रॉनिक्स, प्लंबिंग, कारपेंटरी, ज्वेलरी मेकिंग अशा कितीतरी गोष्टी इथली मुले शिकतात. इस्रोबरोबर शाळेचे टाय-अप आहे. पॅराशूट, प्रत्यक्ष लाँचसाठी तयार उपग्रह क्युब सॅट, रॉकेट आणि त्यासाठी लागणारे इंधन, ॲस्ट्रो फिजिक्स अशा विषयांची मुलांना माहिती आहे. हे करण्यासाठी शिक्षकाचे समर्पण, प्रामाणिक मेहनत ही मात्र सगळ्यांत आवश्यक ‘टुल्स’ आहेत. ती असतील तर काहीही अशक्य नाही.

२८ वर्षे मी शिक्षकी पेशात आहे. अनेक मुले या काळात हाताखालून गेली. हल्ली आपल्या घरातील व्यक्तीचीही खात्री आता देता येत नाही; पण या सगळ्या विद्यार्थ्यांची मी खात्री देऊ शकतो की ते कधीही चुकीचे वागणार नाहीत. भ्रष्टाचार करणार नाहीत. त्यांना निराशा येणार नाही असे नाही; पण आलीच तर निराशेच्या भरात कुठलेही चुकीचे पाऊल ती मुले उचलणार नाहीत.

 एक चांगला, तळमळीचा शिक्षक आणि त्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देणारे शहाणे गाव यांची एकत्रित तयारी असेल तर जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेचा चेहरामोहरा बदलणे शक्य आहे!

                dattajiware@gmail.com

                (शब्दांकन : भक्ती बिसुरे)