शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

शक्तिप्रदर्शन नव्हे, काँग्रेससाठी ही संदेशाची सभा!

By shrimant mane | Updated: December 28, 2023 08:10 IST

भाजपची अजस्त्र प्रचार यंत्रणा, प्रोपगंडा मशिनरीपुढे कुणाचीही गय नाही. राजकारणाचे ध्रुवीकरण झालेले असताना काँग्रेसचा ‘नागपूर संदेश’ महत्त्वाचा ठरेल.

श्रीमंत माने, संपादक, लोकमत, नागपूर

तेलंगणामधील विजयासोबतच डिसेंबरची सुरुवात नागपूरलगतच्या मध्य प्रदेश व छत्तीसगडमधील पराभवाने झाली असली तरी, काँग्रेस पक्षासाठी महिन्याचा शेवट दोन आशादायक गोष्टींनी होताे आहे. पहिली गोष्ट - पक्षाला ऊर्जितावस्थेच्या स्थितीत आणणाऱ्या ‘भारत जोडो’ यात्रेचा मणिपूर ते मुंबई हा दुसरा टप्पा ‘भारत न्याय यात्रा’ नावाने होणार असल्याची घोषणा बुधवारीच झाली. दुसरी - शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे मित्रपक्ष फुटीमुळे घायाळ झाले असतानाही महाराष्ट्रात महाविकास आघाडी अजूनही प्रबळ असल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले. या पार्श्वभूमीवर पक्षाचा १३९ वा स्थापना दिवस साजरा करण्यासाठी नागपूरचीच निवड करण्यामागे काँग्रेसचा हेतू केवळ शक्तिप्रदर्शनाचा नसावा. त्यानिमित्ताने गुरुवारी होणारी काँग्रेसची बहुचर्चित सभा ही प्रत्यक्षात संदेशाची असेल. 

पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच श्रीमती सोनिया गांधी, राहुल व प्रियांका यांच्यासह देशभरातील नेते या सभेतून कार्यकर्ते, इंडिया आघाडीतील मित्रपक्ष, कुंपणावर असलेले पक्ष तसेच भारतीय जनता पक्ष व नागपूर मुख्यालय असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या प्रत्येकालाच काही ना काही संदेश देतील. सभेसाठी नागपूरची निवड करण्यामागे १९२०च्या अधिवेशनाचा दाखला दिला जात असला तरी शंभर वर्षांपूर्वीचा एक ऐतिहासिक संदर्भ वगळता त्याला फार महत्त्व नाही. नागपूरच्या सभेचा विचार समकालीन राजकारणावरच करावा लागणार आहे. 

‘भारत न्याय यात्रा’ हा ‘भारत जोडो’चा पुढचा टप्पा आहे. विखार, विद्वेषाऐवजी परस्पर सद्भाव, प्रेम ही ‘भारत जोडो’ची संकल्पना तर मणिपूर हिंसाचाराच्या पृष्ठभूमीवर अन्यायग्रस्तांना न्यायासाठी प्रत्यक्ष लोकांमध्ये जाणे, हा विचार नव्या यात्रेत दिसतो. तो एकप्रकारे विद्वेषाचे राजकारण करणाऱ्यांना संदेश आहे. लोकसभेची सेमीफायनल मानलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया आघाडीतील सगळ्याच पक्षांची राजकीय भाषा तसेच देहबोली बदलली आहे. काँग्रेससाठी दिवस ‘करो वा मरो’चे आहेतच, शिवाय ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल या सुभेदारांनाही जाणीव आहे की, काँग्रेस जात्यात तर आपण सुपात आहोत. भाजपची अजस्त्र प्रचार यंत्रणा, प्रोपगंडा मशिनरीपुढे कुणाचीही गय नाही. राजकारणाचे ध्रुवीकरण होत असल्याने ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीपासून ते मायावतींचा बहुजन समाज पक्ष ते केसीआर यांची भारत राष्ट्र समिती या कुंपणावरच्या पक्षांना आता तटस्थ राहता येणार नाही. त्यांना भूमिका घ्याव्या लागतील. 

सलग दोन लोकसभा निवडणुकांमधील शक्तिपातामधून काँग्रेस पक्ष अजून सावरलेला नाही. दक्षिणेकडे थोडी सुस्थिती असली तरी अडचण उत्तर भारतातील हिंदी पट्ट्याची आहे. तिथे नेत्यांचे वाद व कार्यकर्त्यांची मरगळ दूर करण्याचा इलाज अजून सापडलेला नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तीन राज्यांत पराभव झाला तरी काँग्रेसला भाजपपेक्षा दहा लाख मते अधिक मिळाली. परंतु, ते स्पष्ट होईपर्यंत राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमधील विजयाचे ढोल भाजपने इतक्या जोरात वाजवले की, अशीच हॅट्ट्रिक लोकसभेतही होईल, हाच संदेश मतदारांपर्यंत गेला. वास्तव व नॅरेटिव्ह यात अंतर हे असे असते. तेव्हा पश्चिम बंगाल, बिहार, महाराष्ट्र अशा काही मोठ्या राज्यांवर इंडिया आघाडीची मदार असेल. त्यातही  महाराष्ट्र हा काँग्रेससाठी आशेचा किरण आहे. विदर्भ बहुतेकवेळा काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिला आहे. गेल्या विधानसभेलाही विदर्भाने बरे यश दिले. ‘भारत जोडो’ यात्रेतील शेगावच्या विराट सभेचा संदर्भ ताजा आहे. त्यापेक्षा अधिक ताकद नागपूरसाठी लावली गेली आहे. म्हणजे विदर्भातील नेत्यांसाठी ही शक्तिप्रदर्शनाची संधी आहे. 

तथापि, काँग्रेस अथवा इंडिया आघाडीची हिमालयाएवढी समस्या आहे ती लोकसभा निवडणुकीत चेहऱ्याची. आधीच चेहरा ठरविण्याची गरज नाही, असे १९७७ चा दाखला देत शरद पवार यांच्यासारखे ज्येष्ठ सांगत असले तरी मतदारांना तशी गरज वाटते का? हे प्रबळ प्रचारतंत्राच्या आधारे भारतीय जनता पक्षच ठरवतो. राज्यात भाजपकडे चेहरा नसेल तर त्याची गरज नसते आणि देशात भाजपकडे नरेंद्र मोदींचा चेहरा असेल तर विरोधकांकडेही हवा, हे ते प्रचारतंत्र आहे. काँग्रेसच्या स्थापनादिनी होणाऱ्या सभेतून त्यावर तोडगा निघेल, याची कोणतीही शाश्वती नाही. shrimant.mane@lokmat.com 

टॅग्स :congressकाँग्रेस