शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
4
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
5
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
6
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
7
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
8
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
9
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
10
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
11
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
12
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
13
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
14
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
15
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
16
अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान
17
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
18
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
19
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
20
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...

वाद नव्हे, संवादाची गरज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 05:09 IST

आगडोंब शांत करण्यासाठी सरकारने तातडीने विरोधक, विचारवंत आणि मुस्लीम समुदायासोबत संवाद सुरू करणे गरजेचे आहे. विरोधकांनीही आगीत तेल ओतणे बंद करायला हवे. मात्र प्रश्न हा आहे की, मुळात सरकारलाच आगडोंब शांत करण्याची गरज वाटते आहे का?

नागरिकत्व कायद्यावरून सध्या देशाच्या कानाकोपऱ्यात हिंसाचार, जाळपोळ सुरू आहे. एकही दिवस असा जात नाही, ज्या दिवशी देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात बस किंवा पोलीस चौकी जाळल्याची, जमावाने पोलिसांना अथवा पोलिसांनी निदर्शकांना मारहाण केल्याची बातमी नसते! मुळात संसदेने जो नागरिकत्व (सुधारणा) कायदा मंजूर केला त्या कायद्याचा भारतीय नागरिकांशी दुरान्वयानेही संबंध नाही.

पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमध्ये धार्मिक छळ सोसावा लागलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चन अथवा पारशी धर्माच्या लोकांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी म्हणून हा कायदा करण्यात आला. त्यामुळे हा कायदा एकाही भारतीय नागरिकाला, मग तो कोणत्याही धर्माचा असो, लागूच होत नाही. शिवाय हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी करण्यात आला आहे, कोणाचे नागरिकत्व काढून घेण्यासाठी नव्हे! तरीदेखील या कायद्याच्या विरोधात आगडोंब उसळला आहे. पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानच्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी धर्माचा निकष का लावण्यात आला आणि श्रीलंका, नेपाळ, भूतानसारख्या भारताच्या इतर शेजारी देशांना कायद्याच्या कक्षेतून का वगळण्यात आले, हे कायद्याला विरोध करीत असलेल्या मंडळीचे मुख्य आक्षेप आहेत. त्यापैकी धार्मिक निकषाच्या आक्षेपाचा प्रतिवाद करताना, पाकिस्तान, बांगलादेश अथवा अफगाणिस्तानात मुस्लिमांना छळ सहन करावाच लागू शकत नाही, असा युक्तिवाद केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केला होता. त्या वेळी ते सोयीस्कररीत्या हे विसरले, की त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनीच काही दिवसांपूर्वी बलुचिस्तानात मुस्लिमांमधील अल्पसंख्य पंथाच्या लोकांवर होत असलेल्या अनन्वित अत्याचाराबद्दल कंठशोष केला होता.

अनेक वर्षांपासून भारतात आश्रयास असलेल्या तस्लिमा नसरीन या बांगलादेशी लेखिका आणि तारेक फतेह हे पाकिस्तानी पत्रकार त्यांच्या देशांमध्ये झालेल्या छळामुळेच भारतात आले आहेत, याचाही शहा आणि त्यांच्या पक्षाला आता विसर पडला आहे. थोडक्यात, नागरिकत्व कायद्यात सुधारणा करताना, कायदा मुस्लिमांच्या विरोधात नसल्याचा कितीही आव सत्ताधारी भाजपने आणला असला, तरी प्रत्यक्षात धार्मिक ध्रुवीकरण घडवून आणण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आल्याची शंका घेण्यास निश्चितच जागा आहे. या कायद्याचा भारतीय मुस्लिमांशी अर्थाअर्थी संबंध नसतानाही कायद्याच्या विरोधात आगडोंब उसळण्यामागे ही शंकाच प्रामुख्याने कारणीभूत आहे. तिहेरी तलाकविरोधी कायदा, घटनेतील अनुच्छेद ३७० निष्प्रभ करणे, आसाममध्ये नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन (एनआरसी) वरून घालण्यात आलेला घोळ, एनआरसी देशभर लागू करण्याचे अमित शहा यांचे सूतोवाच, अयोध्येतील वादग्रस्त जागा पूर्णपणे श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, या गेल्या वर्षातील काही घटनाक्रमांमुळे आपल्या विरोधात काही तरी कटकारस्थान सुरू आहे आणि हळूहळू आपल्याला दुय्यम नागरिक बनविले जाईल, अशी शंका मुस्लीम समुदायाच्या मनात घर करू लागली आहे. अशा वेळी मुस्लीम समुदायाशी संवाद साधून त्यांना आश्वस्त करण्याची नितांत गरज आहे. त्यांच्या मनातील शंकांचे निरसन करण्याची आवश्यकता आहे. सरकारने संसदेत बिनतोड युक्तिवाद करीत, या कायद्यावरील विरोधकांचे आक्षेप मोडीत काढले हे खरे; पण संसद म्हणजे संपूर्ण देश नव्हे! संसदेत केवळ देशाचे प्रतिनिधित्व करणारे जनप्रतिनिधी असतात. त्यांचे समाधान झाले म्हणजे संपूर्ण देशाचे समाधान झाले असे होत नसते.

मुळात सरकारतर्फे कितीही बिनतोड युक्तिवाद झाले तरी, विरोधकांचे समाधान झालेले नाही. कायदा मंजूर झाला असला तरी विरोधकांचे आक्षेप कायमच आहेत. त्यामुळे आगडोंब शांत करण्यासाठी सरकारने तातडीने विरोधक, विचारवंत आणि मुस्लीम समुदायासोबत संवाद सुरू करणे गरजेचे आहे. त्याचवेळी विरोधकांनीही केवळ राजकीय स्वार्थापोटी आगीत तेल ओतणे बंद करायला हवे. मात्र प्रश्न हा आहे की, मुळात सरकारलाच आगडोंब शांत करण्याची गरज वाटते आहे का?

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक