शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
4
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
5
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
6
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
7
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
8
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
9
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
10
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
11
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार
12
भारतावर कुरघोडी करणाऱ्या चीनची लागली 'लंका'! 'या' क्षेत्रात मोठी मंदी, खरेदी करायलाच कोणी नाही
13
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
14
कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 
15
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
16
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
17
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
18
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
19
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
20
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण

प्रथांचे पुनरावलोकन गरजेचेच !

By किरण अग्रवाल | Updated: May 24, 2018 09:49 IST

रितीरिवाजांची जपणूक व्हायलाच हवी, कारण तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे. पण ते करताना त्यात काळाशी सुसंगत बदल स्वीकारायला काय हरकत असावी?

रितीरिवाजांची जपणूक व्हायलाच हवी, कारण तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे. पण ते करताना त्यात काळाशी सुसंगत बदल स्वीकारायला काय हरकत असावी? विशेषत: आजच्या धकाधकीच्या व विभक्त कुटुंबपद्धतीमुळे एकारलेल्या व्यवस्थेत काही प्रथांचे नव्या संदर्भांनी पुनरावलोकन करून नूतनीकरण केले जाणे सोयीचे व लाभाचेही ठरणारे आहे. त्याकरिता पुढाकार घेणाऱ्यांच्या पाठीशी समाजमान्यतेचे बळ उभे राहायला हवे. लग्नकार्यात पत्रिका छापून त्या वितरणात वेळ खर्ची घालण्याऐवजी व मानापानाच्या जंजाळात अडकून बसण्यापेक्षा भ्रमणध्वनी संदेश, अगर व्हॉट्सअ‍ॅपवरील निमंत्रणाला स्वीकारार्हता लाभण्याच्या अपेक्षांकडे त्याचसंदर्भाने बघता यावे.मुलगी बघावयास गेले आणि लग्न करूनच परतले, अशा आशयाच्या बातम्या मध्यंतरी ब-याचदा वाचावयास मिळत. तेव्हा ते नवीनच वाटायचे. पण, त्यातून वेळेची बचत घडून येतानाच खर्चही वाचू लागल्याने नंतर या प्रकारास सर्वमान्यता व पर्यायाने समाजमान्यताही लाभलेली दिसून आली. आज मुलगी बघायला गेल्यावर पसंती झाली व सोबत महत्त्वाचे नातेवाईक असलेत की बाकी गावभरच्या संबंधांचा व गणगोताचा विचार न करता साखरपुड्यातच विवाह उरकून घेण्याची पद्धत ब-यापैकी अंगीकारली गेलेली दिसून येते. लग्नसमारंभात खर्च वगैरे बाबींपेक्षाही मानापानाचा विषय नेहमी महत्त्वाचा ठरत असतो. यासंदर्भातल्या अवघड दुखण्यावर आता नवीन पिढी आपापल्यापरीने मार्ग काढत मात करताना दिसते, कारण मुळात कोणत्याही व कुणाकडच्याही कार्यात स्वत:ला झोकून देऊन काम करणारे ‘कर्ते’ आता कमी होत आहेत. कुटुंबपद्धतीतला विभक्तपणा त्यास कारणीभूत ठरत आहे. त्यातून ओढवलेले ‘मी’पण व माझ्यापुरते पाहण्याची मानसिकता बघता जवळचेही आता शक्यतो हाताची घडी घालून उभे राहताना दिसतात. त्यामुळेच मानपानाच्या पारंपरिक प्रथांनाही काहीसा वळसा घालून कार्य सिद्धीस नेण्याचे प्रयत्न प्रागतिक विचाराच्या पिढीकडून केले जाताना दिसून येतात.लग्नपत्रिकांचे वाटप हा असाच एक मानापानाशी निगडित विषय आहे. घरी येऊन पत्रिका हाती दिल्याखेरीज लग्नाला जायचे नाही, अशी काहीशी परिपाठी आजही कायम आहे. ती निभावतानाच अनेकांची दमछाक होते. आजकाल मंगल कार्यालयवाल्यांच्या ‘एक खिडकी’ योजनेंतर्गत जेवणाची व्यवस्था, घोडा, वाजंत्री, पुरोहित आदी सारे काही सहजपणे उपलब्ध होत असल्याने त्यासंबंधीचा ताण वाचत असला तरी, पत्रिका वितरणातली जिकिरी मात्र संपलेली नाही. अर्थात, मोठ्या शहरातील परस्परांच्या निवासाची दूरता व लांबच्या नातेसंबंधात कुरिअरद्वारे पत्रिका पाठवून ‘हेच निमंत्रण समजून अगत्याने येण्याचे करावे’, असे सांगितले जाऊ लागले आहे खरे; परंतु जवळकीच्या व मानाच्या लोकांना पत्रिका देण्यासाठी स्वत: जाण्याचा प्रघात काही मोडवला जात नाही. यात वावगे अगर आक्षेपाचे काही नाहीही; परंतु प्रश्न इतकाच आहे की काळ बदलला आहे, प्रत्येकाचीच व्यस्तता वाढली आहे, घरात करणारे जास्तीचे व सवडीचे लोक आता फारसे नसतात; अशात संबंधिताने घरी येऊन स्वहस्तेच पत्रिका दिली पाहिजे, असा आग्रह अथवा तशी अपेक्षा का धरली जावी?महत्त्वाचे म्हणजे, सामाजिक सुधारणेच्या अंगाने असा प्रश्न यासाठीही गरजेचा आहे की, हल्ली पत्रिकेसोबत भेटवस्तू देण्याचे ‘फॅड’ही वाढले आहे. अमुक एकाच्या लग्नात पत्रिकाच हजार-पाचशेची होती, असे कौतुकाने व भारावून जाऊन सांगणारी माणसंही आपल्याला भेटतात; कारण पत्रिकेवरून आसामी किती तालेवार आहे याचा अंदाज बांधण्याची मानसिकता आपल्याकडे आहे. पारंपरिक लग्न-उत्सवाला फाटा देऊन ‘रजिस्टर मॅरेज’ करणारे; परंतु त्यासाठीही पत्रिका छापणारे काही सुधारणावादी आढळून येतात. तेव्हा सामाजिक सुधारणेच्या दृष्टीने विवाहाची पत्रिका स्वहस्ते घरी जाऊन देणे खरेच का गरजेचे आहे, असा प्रश्न चर्चेचा ठरावाच; परंतु त्याचसोबत यासंबंधीच्या धकाधकीत होणारे अपघात व त्यात जाणारे जीव पाहता, तो गंभीरपणे विचारात घेण्याचाही ठरावा.अगदी लग्नाच्या याच चालू ‘सीझन’मधील प्रातिनिधिक घटना घ्या, नाशिक जिल्ह्याच्या बागलाण तालुक्यातील नीलेश धिवरे हा तरुण स्वत:च्या लग्नाच्या पत्रिका वाटायला नाशकात आला असता अपघातात त्याचा मृत्यू ओढवला. जळगाव जिल्ह्यातील कानळदा येथील सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग कोळी हेही मुलाच्या लग्नपत्रिका वाटावयास गेले असता वरणगावजवळ अपघातात मृत्युमुखी पडले. सिन्नर तालुक्यातील देवपूरचे भाऊसाहेब मुरडनर हे पुतण्याच्या लग्नपत्रिका वाटताना अपघातात बळी गेले. अशा अन्यही घटनांचा उल्लेख करत येईल की, घरात लग्नाची तयारी झाली असताना व दारात मांडव पडला असताना पत्रिका वाटप करणा-या वरास किंवा त्याच्या आप्तास अपघातात जीव गमवावा लागला. मंगल शहनाईऐवजी सुतकी सुराच्या अशा स्थितीत त्या कुटुंबावर ओढवणा-या दु:खाची कल्पनाच करता येऊ नये. या अशा घटना अपघाताने घडत असल्याने अपवादात्मक ठरणा-या असल्या तरी, त्याला निमित्त मात्रही का लाभू द्यावे? पत्रिकाच न छापता आजच्या प्रगत तंत्राच्या काळात भ्रमणध्वनी अथवा व्हॉट्सअ‍ॅप मेसेजद्वारे निमंत्रणे धाडायला व स्वीकारायलाही काय हरकत असावी, या प्रश्नाकडे म्हणूनच गंभीरतेने बघायला हवे व तशी सुरुवात करणा-यांच्या पाठीशी आपल्या मान्यतेचे बळ उभे करायला हवे.

टॅग्स :marriageलग्न