एस. जे. आढावजेमतेम शिक्षण झालेला माझ्या मित्राचा भाऊ एक साधा कामगार म्हणून कामाला लागला. अगदी उत्साहाने त्याने आम्हाला नोकरी लागल्याची बातमी दिली. मी त्याचे अभिनंदन केले व दरमहा बचत कशी करावी, व्यसन करू नये, कामावर वेळेवर जावे, दांड्या मारू नयेत इ. मार्गदर्शन केले. पुढे ही गोष्ट मी विसरूनही गेलो. त्याला आता बरीच वर्षे झाली. काही दिवसांपूर्वीच त्याची माझी गाठ मेन स्ट्रीटवर पडली. छानसा नीटनेटका पोषाख, गळ्यात सोन्याची चेन, बोटात अंगठी, भारी रिस्टवॉच, डोळ्यांवर गॉगल, स्वारी चांगल्या बाईकवर बसलेली व हातात मोबाईल. मी कुतूहलाने त्याच्याकडे पाहतच राहिलो. तेव्हा तो म्हणाला, ‘दादा तुम्ही मला सांगितल्यानुसार पहिल्या पगारापासून मी काटकसर करून बचतीला सुरुवात केली. थोडे-थोडे सोने घेत गेलो. व्यसनांपासून, वाईट गोष्टींपासून दूर राहिलो. कामावर जाण्याबाबत नियमितता ठेवली व प्रामाणिकपणे काम करीत राहिलो. आता स्वत:चे घर आहे. लग्न झाले आहे. सुंदरसा, छानसा मुलगाही आहे.त्याचे बोलणे ऐकल्यावर मी विचार करू लागलो, मी त्याला चांगला सल्ला दिला; पण बचतीची सवय मी मात्र अंगी बाळगली नाही. त्यामुळे जीवनात मी काहीसा मागे पडलो. आपल्या आध्यात्मिक जीवनाचेही असेच आहे. आपण इतरांना परमेश्वराचे वचन सांगतो, उपदेश करतो; परंतु स्वत:मध्ये मात्र आमूलाग्र बदल करीत नाही. त्यामुळे सार्वजनिक जीवनाच्या वाटेवर आमची पीछेहाट होते. पवित्र शास्त्र सांगते, ‘माझ्या मुला, माझी वचने राखून ठेव, माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू वाचशील. माझी शिस्त आपल्या हृत्पटलावर लिहून ठेव. (नीती. ७:१-३)
‘माझ्या मुला, माझी वचने राखून ठेव...
By admin | Updated: July 1, 2014 09:10 IST