प्रकाश बाळ (ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभ लेखक)अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ‘सिलिकॉन व्हॅली’ सर करून आणि न्यूयॉर्क येथे आपला मित्र ‘बराक’ याच्याशी गुफ्तगू करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं खास विमान दिल्लीच्या दिशेनं झेपावलं, त्याच दरम्यान भारतात घडत होत्या, त्या या दोन घटना.त्यापैकी पहिली घटना देशाची राजधानी दिल्लीजवळच्या दादरी या गावातील. तेथील एका मुस्लिम शेतमजुराचं कुटुंब गोमांस खात आहे, अशी घोषणा देवळातून करण्यात आली आणि जमावानं त्या शेतमजुराला मारून टाकलं. जमावानं त्याचं घरही उद्ध्वस्त केलं.दुसरी घटना आहे, ती केंद्र सरकारनं (लोकसभेच्या २०१४ सालातील निवडणुकीच्या आधी) नेमलेल्या संस्कृत आयोगानं आपल्या अहवालात केलेल्या शिफारशींची. वैदिक काळात मंत्रोच्चाराच्या उद्घोषात यज्ञात बळी देऊन पाऊस पाडण्यासाठी वरूण राजाला विनवणी केली जात असे किंवा या यज्ञात बळी देण्यात आल्यानंतर जे भस्म तयार होई, त्याची जखमा भरून काढण्याची क्षमता इत्यादी लक्षात घेऊन त्याविषयी वैज्ञानिक व संस्कृत भाषातज्ज्ञ यांना एकत्र येऊन प्रयोग करता यावेत यासाठी खास प्रयोगशाळा स्थापन करण्यात यावी, अशी सूचना या आयोगाच्या अहवालात करण्यात आली आहे.आता मोदी ज्या अमेरिकेत दिग्विजय करून आले आणि ज्या ‘सिलिकॉन व्हॅली’त त्यांनी ‘फेसबुक’च्या कार्यालयात जाऊन ‘मार्क’शी ‘डिजिटल’ संवाद साधला, तेथील एक घटना बघू या. मोदी अमेरिकेस जाण्याच्या आधीच काही दिवस त्या देशातील एका गावातील एका १० वर्षांच्या विद्यार्थ्यानं घरी एक डिजीटल घड्याळ बनवलं आणि अत्यंत उत्साहानं त्यानं ते आपल्या शाळेत नेऊन शिक्षिकेला दाखवलं. त्या शिक्षिकेला संशय आला. एवढा छोटा मुलगा घड्याळ बनवतो, म्हणजे इंटरनेट वगैरेच्या सहाय्यानं बॉम्ब वगैरे बनवण्याच्या मार्गाला तर हा लागला नाही ना? शिक्षिकेनं पोलिसांना बोलावलं. त्यांनी या मुलाला बेड्या घातल्या आणि पोलीस ठाण्यात नेलं. कारण काय? ...तर तो १० वर्षांचा मुलगा कृष्णवर्णीय मुस्लिम होता व अहमद हे त्याचं नाव होतं. या घटनेची बातमी झाली. ‘सोशल मीडिया’त गदारोळ उडाला. तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष असलेले (मोदी यांचे मित्र) ‘बराक’ यांनी स्वत: ‘ट्विट’ करून अहमदचं कौतुक केलं आणि त्याचं ते घड्याळ घेऊन अहमदनं अमेरिकी अध्यक्षांचं निवासस्थान असलेल्या ‘व्हाईट हाऊस’मध्ये यावं, असं आमंत्रण दिलं. मोदी यांनी ज्या ‘फेसबुक’च्या कार्यालयात जाऊन ‘मार्क’शी संवाद साधला, त्यानंही अहमदच्या पाठीवर ‘डिजिटल’ थाप दिली आणि ते घड्याळ घेऊन त्याला ‘फेसबुक’च्या कार्यालयात बोलावलं.या घटनेचा मतितार्थ एवढाच की, केवळ भारतातच नव्हे, तर जगात सर्वत्रच वांशिक, धार्मिक वा इतर प्रकारचा विद्वेष पसरवणाऱ्या संघटना आहेत. त्यांच्या विचारानं प्रभावित होणारे लोकही आहेत. पण तेथील ‘राज्यसंस्था (स्टेट) आणि ती हाकण्याची जबाबदारी असलेले राजकारणी त्या त्या देशाच्या राज्यघटनेनुसार बनवलेले कायदे व नियम यांच्या चौकटीत राहून कारभार करण्यावर भर देत असतात. असा एखादा प्रसंग घडला की, ते पुढाकार घेतात आणि राज्यसंस्थेच्या नि:पक्षपातीपणाची ग्वाहीही देत असतात. त्याचप्रमाणं या देशातील जाणता समाजही अशा वेळी मागं राहत नाही. तोही राज्यसंस्थेच्या अशा नि:पक्षपाती कारभाराची पाठराखण करण्यासाठी पुढं येतो.आता परत एकदा दादरीच्या घटनेकडं बघू या. मोदी भारतात परतले आहेत. त्यांना जर खरोखरच ‘माहितीयुग’ भारतात आणायचं असेल, तर त्यांनी आपला मित्र बराक याचा कित्ता गिरवून दादरीतील त्या मारल्या गेलेल्या मुस्लिम शेतमजुराच्या कुटुंबाला किमान ‘डिजिटल’ दिलासा द्यायला हवा. तसंच या घटनेत हात असलेल्यांना पकडून त्यांच्यावर योग्य ती न्यायालयीन कारवाई होईल, यात जातीनं लक्ष घालायला हवं. त्याचबरोबर मोदी यांच्या अमेरिकेतील ‘डिजिटल दिग्विजया’नं प्रचंड प्रभावीत झालेल्या भारतातील अभिजनवर्गानंही या घटनेचा जाहीर निषेध करायला हवा आणि त्या शेतमजुराच्या कुटुंबाच्या मागं उभं राहण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा....कारण ‘सिलिकॉन व्हॅली’ तंत्रज्ञान बहरलं, ते मुक्त विचाराचं, आचाराचं, प्रचाराचं तेथे वातावरण असल्यानं. तेथे बायबलमध्ये काय लिहिलं आहे, त्यावर संशोधन होत नाही. २१ व्या शतकात मंगळावर पाणी सापडल्यानंतर तेथे वस्ती कशी उभारता येईल, याचे आराखडे बनवण्यावर तेथे भर दिला जातो.‘इंटरनेट’चा शोध लागला, तो लष्कराच्या गरजेसाठी. उलट येथे लष्करी शस्त्रसामग्रीसाठी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांसमोर संरक्षणमंत्री दाखला देतात, तो दधिची ऋषींनी इंद्राला अस्त्र दिल्याचा आणि या शास्त्रज्ञांच्या संस्थेचे प्रमुख असलेले व नंतर राष्ट्रपती झालेले डॉ. कलाम ‘मुस्लिम असूनही राष्ट्रवादी होते’ असे प्रशस्तीपत्र देतात देशाचे सांस्कृतिक मंत्री. ‘हिंदू मुलींनी इतर धर्मीयातील मुलांशी लग्न करू नये’, असं मंत्रिमंडळातील एक साध्वी मंत्री बजावते. या साऱ्यांना ‘माहितीयुगा’ची महती गाणारे मोदी साधी ‘डिजिटल’ थप्पडही देत नाहीत.अशा वातावरणात नवनवं संशोधन होत नसतं. होतं ते फक्त प्रचारकी थाटाचं बिनकामाचं संशोधन. ‘भारत असा आहे, तसा आहे, आम्ही हे करू, ते करू’ हे सांगून ‘ब्रँड भारता’चं मार्केटींग करता येईल. पण वस्तुवरील वेष्टन कितीही आकर्षक असलं, तरी ती मुळात चांगली दर्जेदार असावी लागते. ज्यांनी अब्जावधी डॉलर्स गुंतवावेत, अशी अपेक्षा केली जात आहे, ते अशा वेष्टनाला भुलत नसतात. वस्तुच्या दर्जावर त्यांचा कटाक्ष असतो आणि वस्तु निकृष्ट आहे, हे दिसल्यावर ते पाठ फिरवतात. त्यामुळंच ‘मार्केटींग’च्या धंद्यात जाहिरातबाजीचं स्थान महत्वाचं असलं, तरी नुसती जाहिरातबाजीच एखाद्या उत्पादनाला बाजारात स्थान मिळवून देऊ शकत नाही. त्या उत्पादनाची विश्वासार्हताच ग्राहकांना आकर्षित करीत असते.मंत्रोच्चाराच्या उद्घोषातील माहिती युगातील मोदी यांचं हे मार्केटींग यशस्वी होतं काय, हाही एक संशोधनाचाच विषय!
माहिती युगातील मंत्रोच्चारी मार्केटींग!
By admin | Updated: September 30, 2015 22:40 IST