शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आय ॲम फ्री, बट नॉट अव्हेलेबल... एका स्नेहाचे स्मरण!

By विजय दर्डा | Updated: May 10, 2023 07:37 IST

मला आठवते, कवी ग्रेस यांच्या घरात एक वठलेले झाड होते. त्यावर पदके, सन्मान असे सारे काही टांगलेले ! ते म्हणायचे, ‘मी जो काही आहे, तो या झाडावर आहे.’

डॉ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

माणिक सीताराम गोडघाटे म्हणजेच कवी ग्रेस यांचा बुधवारी ८६ वा जन्मदिन. ते जाऊन अकरा वर्षे झाली. पण, त्यांच्या आठवणी आजही मनात रुंजी घालतात. त्यांची पहिली भेट अजूनही चांगली आठवते. विवेक रानडे यांच्या सोबत मी ग्रेस यांच्या घरी पहिल्यांदा गेलो. दारावर दोन पाट्या दिसल्या. पहिली - फ्लॅट फॉर सेल, बट नॉट फॉर जंटलमेन आणि दुसरी- आय ॲम फ्री बट नॉट अव्हेलेबल ! दुसऱ्या पाटीबद्दल अधिक कुतूहल होते. विचारले तर म्हणाले, ‘ही पाटी तुमच्यासाठी नाही. पण, मीच काय इतरही कुणी कलावंत, कवी-लेखक, विचारवंत रिकामे दिसले तरी तसे ते नसतात. त्यांचे म्हणून काम सुरूच असते. तेव्हा, ते बाजारगप्पा मारण्यासाठी रिकामेच आहेत, असे समजून येणाऱ्यांसाठी ही पाटी आहे.’

- हे केवळ ग्रेस यांच्याबद्दलच होत नसते. एखाद्याभाेवती प्रसिद्धीचे वलय तयार झाले की, हौसे, नवसे, गवसे लोक त्या वलयापोटी त्यांच्याकडे जातात. ग्रेस त्याबद्दल फटकळ म्हणावे इतके स्पष्टवक्ते होते. त्यांच्या घरात एक वठलेले झाड होते. त्यावर पदके, ओळखपत्रे सारे काही टांगलेले. म्हणायचे, ‘मी जो काही आहे, तो या झाडावर आहे.’

‘लोकमत’ला काही गोष्टी योगायोगाने लाभल्या. त्यापैकी एक म्हणजे नागपुरात लोकमत भवनजवळ राहणारी थोर माणसे. अशा सान्निध्यासोबतच ती माणसे संस्थेच्या रोजच्या व्यवहारात सहभागी झाली तर आपोआप त्यांचे वलय संस्थेभोवतीही तयार होते. कवी अनिल म्हणजे आत्माराव रावजी देशपांडे व त्यांच्या पत्नी कुसुमावती यांचे घर रामदासपेठेत ‘लोकमत’पासून हाकेच्या अंतरावर. रस्त्याच्या पलीकडे धंतोलीत  ग्रेस व सुरेश भट यांची घरे. कवी अनिलांच्या वार्धक्याच्या काळात लोकमत बाल्यावस्थेत, फारतर किशोरावस्थेत होता. सुरेश भट मात्र प्रारंभापासून लोकमतशी जुळलेले. ते लोकमतमध्ये नियमित लिहायचे. पण, महत्त्वाचे म्हणजे आधी ते अमरावतीला लोकमतचे जिल्हा प्रतिनिधीही होते. ग्रेस थोडे अलिप्त राहणारे. स्वत:हून वृत्तपत्रांकडे न जाणारे. इतकेच काय, पण नेहमीच्या कला-साहित्याच्या कार्यक्रमांकडेही न फिरकणारे. आमच्या भेटी व्हायला लागल्या आणि मी त्यांना ‘दीपोत्सव’ या लोकमतच्या दिवाळी अंकाचे अतिथी संपादक बनण्याचे निमंत्रण दिले. त्यांनी विचारले, ‘मी कविता करणारा, ललित लिहिणारा माणूस, मला ते संपादन वगैरे कसे जमेल? त्याऐवजी मी तुम्हाला पन्नास कविता देतो’. मग मी विनम्रपणे १९७१ ते ७४पर्यंत त्यांनी केलेल्या विदर्भ साहित्य संघाचे ‘युगवाणी’ व नंतर मुंबईच्या रायटर्स सेंटरच्या ‘संदर्भ’ द्वैमासिकाच्या संपादनाचा संदर्भ दिला. ते तयार झाले. लिखाणासाठी बैठक मारावी तसे त्यांनी किशोर कुलकर्णी, विवेक रानडे यांच्यासोबत अत्यंत मन लावून अंकाचे काम केले. २००७ सालच्या दीपोत्सवावर त्यांच्या संपादनाची अमीट छाप होती आणि महत्त्वाचे म्हणजे ग्रेस यांच्या एकवीस कविता हा त्या नितांत सुंदर अंकाचा मेरुमणी होता.

पहिल्याच कवितासंग्रहाला ‘संध्याकाळच्या कविता’ नाव देणारे, दुर्बोध शिक्का मारला गेलेल्या गूढ-गर्भित कविता लिहिणारे ग्रेस नेमके कसे आहेत, हा प्रश्न त्यांच्या हयातीत चर्चेत होता आणि आताही आहे. अनेकजण म्हणतात तसे ते कुणात न मिसळणारे माणूसघाणे, एककल्ली, फटकळ होते का? त्यांना जवळून पाहिले, अनुभवले असल्यामुळे मी नक्की सांगू शकतो की, ते तसे  नव्हते. मैत्री जपणारे होते. नागपुरात अनेकांशी त्यांचे आयुष्यभर मित्रत्वाचे संबंध होते. आमचा प्रदीर्घकाळ पत्रव्यवहार चालला. मला लिहिलेल्या प्रत्येक पत्राची प्रत ते विवेक रानडे यांना पाठवायचे. कारण काय? - तर ज्यांच्यामुळे मैत्री झाली, त्यांनाही मैत्रीचा व्यवहार समजावा.

आयुष्यात त्यांनी दु:खाचे अनेक पदर अनुभवले.. ते दु:ख ते अखेरपर्यंत विसरले नाहीत. त्यांच्या मोठ्या भावाच्या निधनावेळी आम्ही सांत्वनासाठी गेलो तेव्हा ते शांत बसून होते. म्हणाले, ‘बाप गेला तेव्हाही गेलो नव्हतो. ज्याने कधी मुलगा मानला नाही, त्याच्या मृत्यूचा काय शोक करायचा? मी मरणाला व तोरणाला जाणे कधीच बंद केले आहे’.

बालपणीच्या दु:खाने त्यांच्या मनावर इतक्या खोल जखमा केल्या होत्या. त्यांचे बालपण कष्टात गेले. आईच्या अकाली मृत्यूमुळे त्या कष्टावर मायेची पाखरही राहिली नाही. हालअपेष्टा सहन करून शिक्षण घेतले. पुढे  अलौकिक प्रतिभेने त्यांच्या आयुष्यातील उणिवांवर मात केली. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात काही विशेष असलाच तर तो दु:ख गोंजारण्याचा नव्हता तर प्रतिभेचा होता. आयुष्यभर वाट्याला येणारे सारे दु:ख कमी वयातच भोगून झाले असल्यामुळे त्यापुढे आपले घर, आपले लिखाण, आपले आयुष्य आपल्याला हवे तसेच जगायचे, हे त्यांनी ठरवून टाकले होते आणि अखेरपर्यंत ते तसेच राहिले... त्यांना विनम्र आदरांजली!