शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

अग्रलेख: फडतूस अन् काडतूस! फडणवीस-ठाकरे यांच्यातील वाक्युद्ध अन् महाराष्ट्राचं राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2023 07:37 IST

कधी पहाटेचा शपथविधी होतो, कधी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सत्तासुख भोगले जाते, तर कधी ५० आमदार फोडले जातात. महाराष्ट्राची गरज म्हणून अशा कृतीचे समर्थन केले जाते.

अटलबिहारी वाजपेयी आणि कांशीराम हे दोन दिग्गज नेते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एकदा समोरासमोर आले होते. वाजपेयी यांनी कांशीराम यांना ‘जय भीम’ म्हणत नमस्कार केला. तितक्याच तत्परतेने कांशीराम हे वाजपेयींना ‘जय श्रीराम’ म्हणाले. टोकाचे वैचारिक मतभेद असूनही एकमेकांविषयीचा आदर कसा व्यक्त केला जात असे, याचे हे उत्तम उदाहरण. अशी उदाहरणे आता इतिहासाचा भाग बनत चालली आहेत. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना अचानक उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोन नेते समोरासमोर आले, दोघांनी हस्तांदोलन केले. दोघे एकमेकांशी बोलले अन् हसलेही. राज्याच्या राजकारणाने गेल्या काही महिन्यांमध्ये पातळी पार सोडलेली असताना ठाकरे-फडणवीस यांच्यात काही क्षण का होईना; पण संवाद व्हावा हे सुखावणारेच होते. मात्र, तो अपघात होता, हे दोन दिवसांपासून सुरू झालेल्या वाक्युद्धाने सिद्धच केले आहे.

ठाण्यातील महिला शिवसेना कार्यकर्तीस मारहाण झाली. तिची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्र परिषद घेऊन उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडतूस म्हटले. त्यावर, ‘मी फडतूस नाही, काडतूस आहे. झुकेगा नहीं, घुसेगा’, असे दबंग उत्तर फडणवीस यांनी दिले. पूर्वी कार्यकर्ते एकमेकांना भिडायचे, नेते सावरून घ्यायचे. आता नेतेच एकमेकांना भिडतात. मग कार्यकर्तेही बिथरतात. गावागावांत मग गटतट तयार होऊन राजकीय दुष्मन्याही वाढतात. राजकारणातील समंजसपणाचे बोट नेत्यांनीच सोडून दिले, तर अधोगती अटळ आहे. औद्योगिक, शैक्षणिक, कृषी आदी क्षेत्रांत राज्य माघारले, तर विविध उपाययोजना करून पुन्हा प्रगती साधता येऊ शकेल; पण पुरोगामी महाराष्ट्रातील नेतृत्वाने समंजसपणाची कास सोडून दिली, तर त्यातून निर्माण होणारा सुसंस्कृतपणाचा अनुशेष कसा भरून काढणार? सत्तापक्षाने लोकांचे प्रश्न सोडवावेत आणि विरोधकांनी ते अत्यंत प्रभावीपणे मांडावेत, हा खरेतर फोकस असायला हवा; पण त्याऐवजी भावनिक आणि त्यातही खालच्या दर्जाचे शब्द वापरणे यावरच दुर्दैवाने भर दिला जात आहे. आरोप- प्रत्यारोप करताना पातळी सोडणारे काही नेते प्रत्येक पक्षात आहेत.

या बडबोल्यांना महाराष्ट्र सकाळपासून एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो. एक भोंगा सकाळी दहाला सुरू होतो. त्याच्या विधानांवरून मग उपभोंगे कानठळ्या वाजवत फिरत राहतात. लोकांना ते अजिबात रुचत नाही; पण लोक वाचाळ नसतात, ते निवडणुकीत बरोबर हिशेब करतात. या बडबोल्या नेत्यांकडे राजकीय मनोरंजनापलीकडे कोणी फारसे पाहत नाही. मात्र, उद्धव ठाकरे असोत, की देवेंद्र फडणवीस; यांनीही त्या रांगेत जाऊन बसणे योग्य नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाकरी शैलीची परंपरा चालवूनही उद्धव यांनी एक सभ्य नेता, अशी स्वत:ची प्रतिमा निर्माण केलेली आहे. या प्रतिमेला त्यांच्याकडून तडा जाऊ नये, ही माफक अपेक्षा आहे.

फडणवीस हे संघाच्या राजधानीतून आलेले विचारी नेते आहेत. लोखंडी पुलाने नागपूरचे इस पार (मूळ नागपूर) आणि उस पार (नंतर विस्तारलेले नागपूर), असे दोन भाग केले आहेत. इस पारमधील भाषा जरा रांगडी; पण उस पारच्या नागपूरची भाषा त्यापासून अंतर राखणारी. फडणवीस उस पारवाले आहेत आणि तसेच वागत, बोलत आले आहेत. या प्रतिमेला त्यांच्याकडूनच छेद जावा, असे कोणालाही वाटणार नाही. सत्ता जाण्यातून आलेल्या हताशेने बोलताना भरकटणे योग्य नाही, हे जसे ठाकरेंना लागू होते, तसेच मिळालेली सत्ता डोक्यात गेल्यासारखे बोलण्याचेही समर्थन केले जाऊ शकत नाही, हे फडणवीस यांना लागू होते. नेत्यांच्या बोलण्यातून एकमेकांबद्दल राग, असूया, द्वेष दिसला, तर तो गावोगावच्या कार्यकर्त्यांमध्ये झिरपतो. त्यातून विनाकारण वितुष्टाच्या भिंती जागोजागी तयार होतात. बरं, एकमेकांवर अक्षरश: तुटून पडणारे नेते रात्रीतून कसे एकत्र येतात, हे सगळ्यांनी पाहिले आहे. त्यातून मग कधी पहाटेचा शपथविधी होतो, कधी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सत्तासुख भोगले जाते, तर कधी ५० आमदार फोडले जातात. महाराष्ट्राची गरज म्हणून अशा कृतीचे समर्थन केले जाते. गावगल्ल्यांमध्ये वैराचे सातबारे घेऊन बसलेले कार्यकर्ते अशावेळी पार गोंधळून जातात. राजकीय अपरिहार्यतेतून कोण कोणाची गळाभेट कधी घेईल हे कोणी ताडले? तेव्हा, ‘दुश्मनी जम के करो, लेकिन यह गुंजाइश रहे की जब दोस्त बनो तो शर्मिंदा न हो’, हा बशीर बद्रचा शेर वैयक्तिक टीका करणाऱ्या नेत्यांनी लक्षात ठेवलेला बरा. त्यातच त्यांचे आणि महाराष्ट्राचेही हित आहे.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे