शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

अग्रलेख: फडतूस अन् काडतूस! फडणवीस-ठाकरे यांच्यातील वाक्युद्ध अन् महाराष्ट्राचं राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2023 07:37 IST

कधी पहाटेचा शपथविधी होतो, कधी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सत्तासुख भोगले जाते, तर कधी ५० आमदार फोडले जातात. महाराष्ट्राची गरज म्हणून अशा कृतीचे समर्थन केले जाते.

अटलबिहारी वाजपेयी आणि कांशीराम हे दोन दिग्गज नेते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एकदा समोरासमोर आले होते. वाजपेयी यांनी कांशीराम यांना ‘जय भीम’ म्हणत नमस्कार केला. तितक्याच तत्परतेने कांशीराम हे वाजपेयींना ‘जय श्रीराम’ म्हणाले. टोकाचे वैचारिक मतभेद असूनही एकमेकांविषयीचा आदर कसा व्यक्त केला जात असे, याचे हे उत्तम उदाहरण. अशी उदाहरणे आता इतिहासाचा भाग बनत चालली आहेत. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना अचानक उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोन नेते समोरासमोर आले, दोघांनी हस्तांदोलन केले. दोघे एकमेकांशी बोलले अन् हसलेही. राज्याच्या राजकारणाने गेल्या काही महिन्यांमध्ये पातळी पार सोडलेली असताना ठाकरे-फडणवीस यांच्यात काही क्षण का होईना; पण संवाद व्हावा हे सुखावणारेच होते. मात्र, तो अपघात होता, हे दोन दिवसांपासून सुरू झालेल्या वाक्युद्धाने सिद्धच केले आहे.

ठाण्यातील महिला शिवसेना कार्यकर्तीस मारहाण झाली. तिची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्र परिषद घेऊन उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडतूस म्हटले. त्यावर, ‘मी फडतूस नाही, काडतूस आहे. झुकेगा नहीं, घुसेगा’, असे दबंग उत्तर फडणवीस यांनी दिले. पूर्वी कार्यकर्ते एकमेकांना भिडायचे, नेते सावरून घ्यायचे. आता नेतेच एकमेकांना भिडतात. मग कार्यकर्तेही बिथरतात. गावागावांत मग गटतट तयार होऊन राजकीय दुष्मन्याही वाढतात. राजकारणातील समंजसपणाचे बोट नेत्यांनीच सोडून दिले, तर अधोगती अटळ आहे. औद्योगिक, शैक्षणिक, कृषी आदी क्षेत्रांत राज्य माघारले, तर विविध उपाययोजना करून पुन्हा प्रगती साधता येऊ शकेल; पण पुरोगामी महाराष्ट्रातील नेतृत्वाने समंजसपणाची कास सोडून दिली, तर त्यातून निर्माण होणारा सुसंस्कृतपणाचा अनुशेष कसा भरून काढणार? सत्तापक्षाने लोकांचे प्रश्न सोडवावेत आणि विरोधकांनी ते अत्यंत प्रभावीपणे मांडावेत, हा खरेतर फोकस असायला हवा; पण त्याऐवजी भावनिक आणि त्यातही खालच्या दर्जाचे शब्द वापरणे यावरच दुर्दैवाने भर दिला जात आहे. आरोप- प्रत्यारोप करताना पातळी सोडणारे काही नेते प्रत्येक पक्षात आहेत.

या बडबोल्यांना महाराष्ट्र सकाळपासून एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो. एक भोंगा सकाळी दहाला सुरू होतो. त्याच्या विधानांवरून मग उपभोंगे कानठळ्या वाजवत फिरत राहतात. लोकांना ते अजिबात रुचत नाही; पण लोक वाचाळ नसतात, ते निवडणुकीत बरोबर हिशेब करतात. या बडबोल्या नेत्यांकडे राजकीय मनोरंजनापलीकडे कोणी फारसे पाहत नाही. मात्र, उद्धव ठाकरे असोत, की देवेंद्र फडणवीस; यांनीही त्या रांगेत जाऊन बसणे योग्य नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाकरी शैलीची परंपरा चालवूनही उद्धव यांनी एक सभ्य नेता, अशी स्वत:ची प्रतिमा निर्माण केलेली आहे. या प्रतिमेला त्यांच्याकडून तडा जाऊ नये, ही माफक अपेक्षा आहे.

फडणवीस हे संघाच्या राजधानीतून आलेले विचारी नेते आहेत. लोखंडी पुलाने नागपूरचे इस पार (मूळ नागपूर) आणि उस पार (नंतर विस्तारलेले नागपूर), असे दोन भाग केले आहेत. इस पारमधील भाषा जरा रांगडी; पण उस पारच्या नागपूरची भाषा त्यापासून अंतर राखणारी. फडणवीस उस पारवाले आहेत आणि तसेच वागत, बोलत आले आहेत. या प्रतिमेला त्यांच्याकडूनच छेद जावा, असे कोणालाही वाटणार नाही. सत्ता जाण्यातून आलेल्या हताशेने बोलताना भरकटणे योग्य नाही, हे जसे ठाकरेंना लागू होते, तसेच मिळालेली सत्ता डोक्यात गेल्यासारखे बोलण्याचेही समर्थन केले जाऊ शकत नाही, हे फडणवीस यांना लागू होते. नेत्यांच्या बोलण्यातून एकमेकांबद्दल राग, असूया, द्वेष दिसला, तर तो गावोगावच्या कार्यकर्त्यांमध्ये झिरपतो. त्यातून विनाकारण वितुष्टाच्या भिंती जागोजागी तयार होतात. बरं, एकमेकांवर अक्षरश: तुटून पडणारे नेते रात्रीतून कसे एकत्र येतात, हे सगळ्यांनी पाहिले आहे. त्यातून मग कधी पहाटेचा शपथविधी होतो, कधी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सत्तासुख भोगले जाते, तर कधी ५० आमदार फोडले जातात. महाराष्ट्राची गरज म्हणून अशा कृतीचे समर्थन केले जाते. गावगल्ल्यांमध्ये वैराचे सातबारे घेऊन बसलेले कार्यकर्ते अशावेळी पार गोंधळून जातात. राजकीय अपरिहार्यतेतून कोण कोणाची गळाभेट कधी घेईल हे कोणी ताडले? तेव्हा, ‘दुश्मनी जम के करो, लेकिन यह गुंजाइश रहे की जब दोस्त बनो तो शर्मिंदा न हो’, हा बशीर बद्रचा शेर वैयक्तिक टीका करणाऱ्या नेत्यांनी लक्षात ठेवलेला बरा. त्यातच त्यांचे आणि महाराष्ट्राचेही हित आहे.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे