शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अग्रलेख: अर्थव्यवस्थेत सुखद झुळूक! निर्णय अकस्मात; पण त्यामागे स्पष्ट आर्थिक कारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 07:04 IST

मागील तिमाहीत महागाई दर ४ टक्क्यांच्या खाली आला आहे

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ६ जून रोजी घेतलेला रेपो रेट कपातीचा निर्णय बाजारासाठी केवळ अनपेक्षितच नव्हे, तर धोरणात्मक दृष्टिकोनात झालेल्या मोठ्या बदलाचा निदर्शकही आहे. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात २५ ऐवजी थेट ५० बेसिस पॉइंट्सची कपात जाहीर करून तो ५.५० टक्क्यांवर आणला आणि रोख राखीव प्रमाणात (सीआरआर) १०० बेसिस पॉइंट्सनी कपात करत ते ३ टक्क्यांवर नेले. हे दोन्ही निर्णय एकत्रित घेतले जाणे दुर्मीळ असते. यामुळे बँकिंग प्रणालीत सुमारे ₹२.५ लाख कोटींचा अतिरिक्त तरलता प्रवाह निर्माण होणार असून, त्याचा थेट परिणाम कर्जवाटप, मागणी, उद्योगधंदे आणि शेती यांच्यावर होणार आहे. हा निर्णय काहीसा अकस्मात वाटत असला तरी, त्यामागे स्पष्ट आर्थिक कारणे आहेत.

मागील तिमाहीत महागाई दर ४ टक्क्यांच्या खाली आला आहे. रिझर्व्ह बँकेने २०२५-२६ साठी महागाई दर ३.७ टक्के इतका राहील, असा अंदाज वर्तवला आहे, जो ४ टक्क्यांच्या लक्ष्याच्या आत आहे. त्याचवेळी देशाचा सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वृद्धीदर ६.५ टक्क्यांवर स्थिरावला असून, मागणीची गती अपेक्षेइतकी वेगवान नाही. जागतिक अनिश्चितता, अमेरिकेचे व्याजदर व आयातकर धोरण, युक्रेन-रशिया संघर्ष, कच्च्या तेलातील अस्थिरता, इत्यादी कारणांमुळे भारतासाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी आर्थिक स्फूर्तीची गरज असल्याचे रिझर्व्ह बँकेला वाटले असावे आणि त्यातूनच रेपो रेट आणि सीआरआर कपातीचा निर्णय झाला असावा. सीआरआर कपातीमुळे बँकांकडे अधिक निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गृहनिर्माण, वाहन, उद्योग, शिक्षण आदी कर्जे स्वस्त होण्याची अपेक्षा आहे. गृहकर्जाच्या व्याजदरात अर्धा ते एक टक्का घट अपेक्षित आहे. त्यामुळे ग्राहकांचा आत्मविश्वास वाढेल आणि बँका अधिक जोखमीची, पण गरजेची कर्जे वाटू शकतील.

कर्ज सुलभ झाल्यामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रालाही दिलासा मिळेल. दुसरीकडे ठेवीदारांचे व्याजदर घटल्याने गुंतवणुकीसाठी पर्यायी पर्यायांचा विचार वाढेल. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाची आर्थिक बाजारात उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली. सेन्सेक्सने ८५० अंशांची झेप घेतली, तर बँक निफ्टी निर्देशांकाने विक्रमी उच्चांक गाठला. अचल मालमत्ता, वाहन, गैर बँकिंग वित्त (एनबीएफसी) आणि उपभोक्ता क्षेत्रात तेजी दिसून आली. रिझर्व्ह बँकेची पावले दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य आणि वाढ सुनिश्चित करण्यासाठी असल्याचे दिसते. त्यासाठी निर्णयांचे लाभ प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने गव्हर्नर मल्होत्रा यांनी बँकांना निर्देश दिले, हे बरे झाले. रिझर्व्ह बँकेने आता आपली भूमिका ‘अनुकूल’वरून ‘तटस्थ’ केली असून, पुढील निर्णय महागाई व आर्थिक आकडेवारीच्या आधारे घेतले जातील. जर महागाई पुन्हा वाढली, तर दरकपात थांबवली जाईल किंवा दर वाढवलेही जाऊ शकतात. त्यामुळे बँक आणि बाजारांना सतर्कतेचे संकेत मिळाले आहेत. या दरकपातीमुळे सरकारला पायाभूत सुविधा, आरोग्य व कृषी क्षेत्रांमध्ये भांडवली खर्च वाढवण्यास मोकळीक मिळेल.

दरकपात ही केवळ आर्थिक पातळीवरची बाब नसून, तिचा सामाजिक परिणामही मोठा असतो. दरकपातीमुळे कर्ज सुलभ होऊन, उद्योजक, विद्यार्थी, शेतकरी आणि गृहस्वप्न बघणाऱ्या सामान्य नागरिकांना प्रत्यक्ष लाभ होतो. या निर्णयांमुळे देशांतर्गत मागणीत वाढ अपेक्षित असून, ती आर्थिक वृद्धीस चालना देईल; पण वाढ टिकवून ठेवण्यासाठी केवळ रिझर्व्ह बँकेच्या उपाययोजना पुरेशा नाहीत. सरकारलाही पूरक आर्थिक, औद्योगिक व रोजगार धोरणे राबवावी लागतील. बँकांनीही कर्ज वसुली आणि पारदर्शकतेच्या बाबतीत अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे. एकूणच, रिझर्व्ह बँकेचा हा धाडसी निर्णय देशाच्या आर्थिक प्रवाहाला नवीन दिशा देणारा आहे. वाढीचा वेग टिकवण्याच्या उद्देशाने घेतलेल्या या निर्णयाचा परिणाम केवळ आर्थिक आकड्यांवर नव्हे, तर सामान्य माणसाच्या जगण्यावरही होणार आहे. बाजार, सरकार, बँका आणि जनता यांनी नीट समन्वय साधल्यास या निर्णयाचे सकारात्मक फलित अधिक गतीने समोर येईल. सध्या तरी या धोरणाने अर्थव्यवस्थेत सुखद झुळूक आणली आहे. ती झुळूकीप्रमाणे अल्पायुषी ठरू न देण्याची जबाबदारी सगळ्या घटकांची असेल!

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक