मिलिंद कुळकर्णी -
‘पार्टी विथ द डिफरन्स’ चा दावा करणाऱ्या भाजपा आणि रस्त्यावर उतरून आंदोलने गाजविणाऱ्या शिवसेनेला अजूनही सत्ताधारी पक्षाची भूमिका वठवता येत नसल्याची स्थिती दिल्लीपासून गल्लीपर्यंत दिसून येत आहे. विकासकामांपेक्षा एकमेकांची उणीदुणी काढणे, कुरघोडी करण्यातच मंत्री, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते व्यग्र आहेत. कॉँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडळींमध्ये कडाक्याची भांडणे व्हायची पण विकासकामांमध्ये खोडा घालण्यापर्यंत मजल जात नसे. धुळ्यात मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाचा विषय गेल्या २० वर्षांपासून गाजत आहे. प्रत्येक रेल्वे अर्थसंकल्प आणि निवडणुकीच्या वेळी हा विषय चर्चेत येतो. पण सर्वेक्षणाच्या पुढे काही गाडी सरकली नाही. यंदा तर धुळ्यातील भाजपाचे खासदार डॉ. सुभाष भामरे आणि भाजपाचेच आमदार अनिल गोटे यांच्यात या विषयावरून जुगलबंदी रंगली आहे. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन रेल्वेमंत्री पुन्हा सर्वेक्षणाचा घाट घालत असल्याचा गौप्यस्फोट केला. नेमके घडले तसेच. गोटेंनी हा मुद्दा उचलत मुंबईत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन मालवाहतुकीच्या मुद्द्याकडे लक्ष वेधत सर्वेक्षणाची गरज नसल्याचे पटवून दिले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली. या रेल्वेमार्ग निर्मितीसाठी स्वत:च नेतृत्व करणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिल्याचे गोटे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. गोटेंच्या या घोषणेनंतर खासदार भामरेंनी पत्रकार परिषद घेतली. पुराव्यादाखल सुरेश प्रभू यांच्याशी दिल्लीत झालेल्या भेटीची चित्रफीत पत्रकारांना दाखवली. या रेल्वेमार्गाचे जुने सर्वेक्षण निरुपयोगी असल्याने पुन्हा शास्त्रोक्त पद्धतीने सर्वेक्षणाचा निर्णय घेतल्याची माहिती प्रभू यांनी दिली. नवीन रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारला भागीदार करणे, निधीसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करणे असे पर्याय रेल्वे मंत्रालयापुढे आहेत. तीन वर्षांत हा प्रश्न मार्गी लावणार असून, कोणीही दिशाभूल करू नये, असे प्रभू यांनी आवाहन केल्याचा भामरे यांनी दावा केला आहे.भाजपाच्या दोन लोकप्रतिनिधींनी एकाच विषयावर एकमेकांवर कुरघोडी करण्याचा हा प्रकार धक्कादायक आहे. खासदारांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावांचा आधार घेत दावे-प्रतिदावे चालविले आहेत. धुळेकर या सगळ्या प्रकाराकडे आश्चर्यचकित होऊन पाहत आहेत. या कुरघोडीत रेल्वेमार्गाचे काय होईल, हा प्रश्न मात्र धुळेकरांना भेडसावत आहे. जळगावात भाजपा आणि शिवसेनेच्या नेते-कार्यकर्त्यांमध्ये पक्के वैरी असल्यासारखे वाद सुरू आहेत. अधिकाराच्या मुद्द्यावरून महसूलमंत्री एकनाथराव खडसे व राज्यमंत्री संजय राठोड यांच्यात वाक्युद्ध झडले. राठोड यांनी जळगावात येऊन आगीत तेल ओतले. अधिकार न मिळाल्यास महसूल विभागातील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढीन, या त्यांच्या विधानावरून गहजब झाला. भाजपा कार्यकर्त्यांनी राठोडांच्या पुतळ्याचे दहन केले. शिवसैनिकांनी प्रत्युत्तर म्हणून खडसेंचा पुतळा जाळला. भाजपा कार्यकर्ते त्यामुळे बिथरले. शिवसैनिकांच्या वाळू ठेक्यांच्या मुद्द्यावरून प्रकरण हातघाईवर आले. माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे आणि नुकतीच सेनेत घरवापसी केलेल्या माजी आमदार संतोष चौधरी यांच्यावर दोन वर्षांसाठी हद्दपारीची झालेली कारवाई हा काही योगायोग निश्चितच नाही. संतोष व त्यांचे बंधू माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्यावरील हद्दपारीच्या कारवाईला भाजपा-सेना यांच्यातील संघर्षाची पार्श्वभूमी जशी आहे, त्याचप्रमाणे भाजपामधील अंतर्गत वादाचा पदरदेखील आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टाईने अनिल चौधरी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला. खडसे फारसे इच्छुक नसताना हा प्रवेश झाल्याची चर्चा त्यावेळी होती. या वादातून खान्देशच्या विकासाचे प्रश्न मागे पडत असल्याचे भान दोन्ही पक्षांना नाही. नेत्यांकडूनही हे वाद संपविण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत.