शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कौतिकराव, रश्शात वडा की वड्यावर रस्सा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 08:46 IST

साहित्य संमेलनाची गरीब गाय श्रीमंत धनवानांच्या गोठ्यात कोणी नेऊन बांधली? सगळी तिकिटे नाशिकच्या नावाने फाडून नैतिकतेचा आव का आणता?

- धनंजय वाखारे

ध्यानीमनी नसताना अचानक कोरोना महामारी आली, आणि  अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडून नाशिकला मिळालेले ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित झाले.  यंदाच्या वर्षी तरी नाशकात  ह्या संमेलनाचा मांडव पडेल की नाही याबद्दल खुद्द महामंडळाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील हे साशंक आहेत. साशंक कसले, आता हे संमेलन रद्द होण्याचीच जास्त शक्यता असल्याची पुडी त्यांनी सोडून ठेवली आहे. त्यासाठी त्यांनी महामंडळाच्या ‘‘अक्षरयात्रा’ वार्षिकांकात तब्बल १८ पानी अध्यक्षीय मनोगत लिहिले आहे. 

अलीकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडे काही लोक ‘धंदा’ म्हणून पाहू लागले असल्याचे निरीक्षण या मनोगतात कौतिकराव नोंदवतात. हे सारे करताना त्यांनी संमेलनाच्या मांडव डोहाळ्यांचा पटच्या पटच उलगडला आहे. हे साहित्य संमेलन दिल्लीत भरवण्याबाबत त्यांच्यावर वेगवेगळ्या माध्यमातून आलेला दबाव आणि धमक्या... संमेलनात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहस्रचंद्रदर्शनाचा त्यांच्या भक्त मंडळींनी घातलेला घाट... पानिपतच्या तिसऱ्या युद्धाला २६१ वर्षे झाली, त्याची आठवण म्हणून दिल्लीत संमेलन मागण्यासाठी तारतम्य सोडून दिलेली विसंगतीपूर्ण कारणे या साऱ्यांचा त्यांनी तपशीलवार उहापोह केला आहे. सहा-सात वर्षापूर्वी पंजाबला घुमान येथे साहित्य संमेलन नेमके कुणासाठी घेतले होते, हा प्रश्न मला आजही सतावतो, अशी कबुलीही भावनेच्या भरात कौतिकरावांनी देऊन टाकली आहे. 

नाशिकच्या नियोजित संमेलनाबाबत केलेले स्फोटक खुलासे हा कौतिकरावांच्या मनोगतात ठासून भरलेला खरा मसाला. हा मसाला सांप्रत स्थितीत अनेक साहित्यप्रेमींच्या डोळ्याला संतापाचे पाणी  आणील, असा झणकेदार आहे.  नाशिकच्या संमेलनासाठी वापरलेल्या निधी संकलनाच्या पद्धतीवर कौतिकराव जाम बरसले आहेत. निमंत्रक संस्था असलेल्या लोकहितवादी मंडळाचा इवलासा जीव आणि त्यांनी अल्पावधीत कोटीच्या कोटी उड्डाणे घेण्याची पाहिलेली स्वप्ने याला कौतिकरावांनी आडव्या हाताने घेतले आहे.  “संमेलनासाठी लोकांच्या सहभागातून निधी जमा केलेला नाही. त्यामुळे लोक (म्हणजे नाशिककर) आपलं ‘सत्व’, ‘स्वत्त्व’ आणि ‘सार्वभौमत्व’ हरवून बसतील; नाशिककरांना हे चालेल का?”- असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. कौतिकरावांनी संमेलनाचे निमंत्रक व मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांच्या एकतंत्री कारभाराकडे अप्रत्यक्षपणे बोट दाखवले आहे.

मुळातच नाशिकला साहित्य संमेलन घेण्याइतपत लोकहितवादी मंडळाची कुवत नाही आणि नव्हती, हे माध्यमांनी यापूर्वी वारंवार सांगितले होते. सुरूवातीला सार्वजनिक वाचनालयाच्या गळ्यात संमेलन मारण्याचे प्रयत्न फसले. त्यानंतर लोकहितवादीचे घोडे पुढे दामटले गेले. मुळात हा घोडा रेसचा नव्हताच हे नाशिककरांना चांगलेच माहिती होते. जे लोकहितवादी मंडळ महापालिकेचा साडेतीन लाख रुपये मालमत्ता कर भरू शकले नाही, ते हा प्रपंच उभा करायला निघाले. अशावेळी राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील हेवीवेट नेते छगनराव भुजबळ यांना स्वागताध्यक्षपदी बसवले तेव्हाच निधीचा सारा भार त्यांच्यावरच टाकला जाणार हे तेव्हा कौतिकरावांना माहीत नव्हते का, असा प्रश्न त्यांचा हा पश्चातबुद्धी विलाप वाचून कुणालाही पडेल.

साहित्य संमेलनाच्या मैदानातल्या कुस्त्या कशा रंगवल्या जातात हे पुरेपूर माहिती असलेले कौतिकराव स्वत:च साहित्याच्या या वार्षिक आखाड्यातले कसलेले मल्ल आहेत ! इतकी वर्षं या आखाड्याच्या मातीत मनसोक्त खेळल्यावर नाशिकच्याच निमित्ताने आपल्या सदऱ्याला डाग पडल्याचा साक्षात्कार या कौतिकारावांना इतक्या उशिराने व्हावा हे एक नवलच ! मराठी साहित्याचे हे उत्सव जगभर  भरवले जावेत - आणि महामंडळाच्या सदस्यांना फुकट जग-पर्यटन व्हावे - यासाठी मरत चाललेल्या मराठीच्या नावाने डोळ्यात पाणी आणूआणून परदेशस्थ मराठी माणसांच्याही खिशात हात घालायला मागेपुढे न पाहिलेल्या कौतिकरावांना नाशिकच्या संयोजकांची कोटीकोटी उड्डाणे अशी अचानक खटकायला कशी लागली ? 

साहित्य संमेलन हा एक धंदा झाला आहे, असे   कौतिकराव मारे मोठ्या नैतिक फणकाऱ्याने म्हणतात. पण साहित्याचे हे दुकान ज्यांनी पहिल्यांदा थाटले आणि साहित्य संमेलनाची गरीब गाय श्रीमंत धनवानांच्या गोठ्यात नेऊन बांधली, त्यांचे अध्वर्यू कोण होते ? जेव्हा हा सारा धंदा भरभराटीला आला, तेव्हा  ‘‘अतिरेकी खर्चावर आळा घाला’’ असे म्हणणाऱ्या संयमी लोकांना आपल्या उद्धट भाषेत गप्प कोणी बसवले? साहित्य संमेलनांचा केवळ  चेहरामोहराच नव्हे तर या वाङ्मयीन आयोजनाचे मूळ उद्दिष्टच भरकटवून साहित्य महामंडळाची “ इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनी’’  कोणी केली ? - या प्रश्नांचे उत्तर इथे वेगळे देण्याचीही गरज नाही, इतके ते स्पष्ट आहे.

स्वतःच केलेल्या पापांचे खापर फोडायला कौतिकरावांना नाशिककर आयोजकांनी आपली डोकी आयतीच दिली हे खरेच; पण सगळी तिकिटे नाशिकच्या नावाने फाडून कौतिकरावांनी उगीच नैतिकतेचा आव आणू नये. कदाचित औरंगाबादच्या ठकाला नाशिकचे महाठक भेटल्याने उसळलेल्या संतापातून हा नैतिकतेचा फणकारा आला असावा. पण नाशिकच्या मिसळीइतकाच इथला वडा-रस्साही झणझणीत असतो. तेव्हा रश्शात वडा की वड्यावर रस्सा एवढाच काय तो प्रश्न आहे. 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन