शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

काट्याच्या वाडीची गादी आणि पेशवाई वस्त्रे

By admin | Updated: July 1, 2016 04:46 IST

शरद पवार यांच्यासारखा निधर्मी, नि:जातीयवादी, तत्त्वनिष्ठ आणि कधीही खंजीर न बाळगणारा नेता इत:पर होणे नाही, यावर तमाम ‘राष्ट्रवाद्यां’ची अपरंपार श्रद्धा आहे.

शरद पवार यांच्यासारखा निधर्मी, नि:जातीयवादी, तत्त्वनिष्ठ आणि कधीही खंजीर न बाळगणारा नेता इत:पर होणे नाही, यावर तमाम ‘राष्ट्रवाद्यां’ची अपरंपार श्रद्धा आहे. ते त्यांना कवतिकाने जाणता राजा म्हणूनही अधूनमधून संबोधीत असतात. पवार केवळ निधर्मीच आहेत असे नव्हे तर ते निरीश्वरवादीदेखील आहेत आणि त्याच्या जोडीला निरक्षरवाद्यांचे पाठीराखे आणि त्यांच्यात आपले समर्थक पाहाणारे व म्हणूनच त्यांच्यावर मन:पूत प्रेम करणारे पुढारीदेखील आहेत. त्यांच्या ठायी असलेल्या अगणित अलौकीक गुणांपैकी एक म्हणजे ते कधीही भूतकाळात रमत नाहीत. वर्तमानकाळ हाच खरा भविष्यातील ऐश्वर्याच्या शिखराकडे घेऊन जाणारा सोपान या सिद्धांतावर त्यांची अलोट श्रद्धा आहे. त्यांच्या या सश्रद्ध भावनेकडे वाकुडेपणाने बघणारे आणि पवारांना संधीसाधू अशी उपाधी जोडणारे लोक भले असतीलही पण पवार अशांचे म्हणणे कधीच मनावर घेत नाहीत. निंदकांकडेही लोण्याच्या ममतेने बघण्याची कला त्यांना अवगत आहे. संतांच्या भूमीत बागडल्याचाच बहुधा तो परिणाम असावा. इतके सारे गोमटे असताना त्यांच्यासारखा नेता अचानक भूतकाळात आणि तेही इतिहास काळात व त्यातही परत मराठेशाहीच्या इतिहासात शिरुन तिथे का रममाण व्हावा हे भल्या भल्यांच्याही आकलनापलीकडचे ठरले आहे. तूर्तास दिल्लीच्या तख्तावर बसलेल्या सत्ताधीशांना महाराष्ट्रातील जनतेच्या शिवशाहीवर (अस्सल, बेगडी नव्हे!) असलेल्या प्रेमाचा आणि थोरल्या महाराजांच्या वंशजांप्रती असलेल्या आदरभावाचा आठव पडला आणि त्यांनी छत्रपतींच्या करवीरकर वंशजास अत्याधुनिक काळातील मनसबदारी म्हणजेच राज्यसभेतील एक गादी आदरपूर्वक बहाल करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हेतु फार शुद्ध आणि प्रामाणिक होता वा आहे असा आरोप कोणीही सांप्रतच्या दिल्लीश्वरांवर करणार नाही. पण त्यांनी एक बेरीज करुन पाहिली. ती आपण करु शकलो नाही या उद्वेगाने असेल वा अन्य काही कारणानी असेल पवारांचा पित्तप्रकोप अचानक उसळून वरती आला. मराठेशाहीत छत्रपतींनी पेशवाई वस्त्रे बहाल केली पण आज पेशव्यांनी छत्रपतींना वस्त्रे बहाल केली, असे काहीसे ते म्हणाले. थोरल्या महाराजांचे चौथे वंशज छत्रपती शाहू महाराज यांनी बाळाजी विश्वनाथ बल्लाळ यास पेशवाईची म्हणजे मराठेशाहीची वस्त्रे प्रदान केली होती, त्याचाच संदर्भ बहुधा पवारांनी दिला असावा. इतिहासातील छत्रपती शाहू महाराज जन्माने मराठे होते आणि बाळाजी विश्वनाथ हा बामण होता आणि आज करवीरकर मराठा छत्रपतीस देवेन्द्र फडणवीस नावाच्या बामणाने मनसबदारीची वस्त्रे बहाल केली गेली, असा जो काही संदर्भ पवारांच्या वक्तव्यामधून निघतो, तो निव्वळ योगायोग समजावा आणि कोणत्याही जीवित वा मृत व्यक्ती अथवा संस्थेशी तिचा संबंध जोडण्याचा प्रयत्न कोणी करु नये हेच खरे. कारण पवार असे जातीयवादी बोलतीलच कसे? पवारांच्या वक्तव्यावर फडणवीसांनी उगाचच खुलासा करताना छत्रपतींना आपण काही वस्त्रे बहाल केली नाहीत, तर दिल्लीश्वरांकडून आलेली वस्त्रे केवळ छत्रपतींकडे सुपूर्द करण्याचे काम केले असे म्हटले. खरे तर त्याची काहीही गरज नव्हती. कारण फडणवीस आणि बाळाजी विश्वनाथ दोघेही बामण असले तरी तो कोकणातला चित्तपावन आणि फडणवीस वऱ्हाडातले बहुधा देशस्थ (वर्णावरुन तरी तसेच वाटते). त्यामुळे टिपण जमत नाही. त्याहून महत्वाचे म्हणजे पवार अशी अनैतिहासिक चूक कशी करतील? ते जातीयवादी नसले तरी त्यांना केवळ जातीपातीची नव्हे तर उप आणि पोटजातींचीही खडा न खडा जाण असते. त्याशिवाय का कोणी असेच स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेईल? या राजाने दिल्लीचे तख्त फोडण्याचा (याचा नेमका अर्थ कोणी तरी कधी तरी सांगा रे) अनेकवार प्रयत्न करुन पाहिला. कपाळमोक्षाशिवाय काहीही हाती लागले नाही. आपल्या मार्गात सोनिया बाईसाहेब ही फिरंगीण आडवी येते म्हणून त्यांनी तिला एकाकी पाडण्याचा निर्णय घेतला तो फिरंग्यांचा द्वेष करण्याच्या एतद्देशियांच्या जन्मसिद्ध अधिकारातून. पण त्यात तेच एकाकी पडले हे अलाहिदा. पण मुद्दा ते तेव्हांही देशवादी असतील पण धर्म वा जातवादी नव्हे! ऐंशीच्या दशकातील त्या कुप्रसिद्ध ‘खंजीर’ प्रकरणात ‘इन्द्राय स्वाहा:, तक्षकाय स्वाहा:’ या न्यायाने त्यांनी वसंतदादा या स्वजनाचा घात करुन भटजींच्या पक्षातील लोकांच्या ओठाला सत्तेच्या मधाचे चाटण लावले ते का पवार जातीयवादी म्हणून? अगदी अलीकडात त्यांनी नरेन्द्र दामोदर मोदी नावाच्या बारा बलुतेदारांपैकी एक असलेल्या व्यक्तीस आणि नंतर अरुण जेटली या उच्चवर्णीयास काट्याच्या वाडीच्या गादीवरुन कुर्निसात करीत महावस्त्रे प्रदान केली ती काय जातीयवादातून? छे, छे! पवार असतील स्ववादी, स्वकुटुंबवादी, स्वकन्यावादी, स्वपुतण्यावादी पण त्यांना आता या वयात मनस्ताप देत नका रे उगाच ढकलू जातीयवाद्यांच्या कळपात!