प्रा. दिलीप फडके (ज्येष्ठ विश्लेषक)नरेंद्र मोदींनी जेमतेम दहा महिन्यांपूर्वी नेपाळला भेट दिली तेव्हां त्यांना मिळालेला प्रतिसाद केवळ अद्भुत असाच होता. पण केवळ दहा महिन्यात तिथली परिस्थिती पार बदलून गेलीे आहे. नेपाळी जनता आज भारताच्या विरोधात गेल्याचे दिसते आहे. तिथल्या केबलवाल्यांनी भारतीय वाहिन्या बंद केल्या आहेत, भारतात नोंदवलेल्या वाहनांना तिथे बंदी घातली आहे व भारतविरोधी निदर्शने सुरु झाली आहेत. नव्याने सुरु झालेले दंगे आणि अशांततेच्या गर्तेत नेपाळ पुन्हा एकदा सापडला असल्याचे दिसते असले तरी इथल्या प्रसारमाध्यमांना मात्र हा विषय दखल घेण्याजोगा वाटलेला नाही. सध्याच्या अस्वस्थतेची सुरुवात तिथल्या घटना परिषदेने राज्यघटनेचा नवा मसुदा स्वीकारण्याच्या सुमारास झाली. नव्या राज्यघटनेनुसार आतापर्यंत हिंदू राष्ट्र असणारा नेपाळ धर्मनिरपेक्ष झाला आहे. नव्या घटनेला तराई भागातील मधेशींनी विरोध केला आणि हिंसक निदर्शने सुरु झाली. शंभरच्या आसपास नागरिक त्या हिंसाचारात बळी पडले असून या आंदोलनामागे भारतच असल्याचा तिथल्या शासकांचा आणि जनतेचा पक्का समज झाल्याने तिथे प्रखर भारत विरोधी जनमत तयार झाले आहे. याचे दूरगामी परिणाम भारत-नेपाळ संबंधांवर होण्याची चिन्हे आहेत. नेपाळ हे सर्व बाजूंनी जमीन असणारे राष्ट्र असल्याने त्याला सागरी मार्गाने मालाची वाहतूक करण्याचा मार्ग उपलब्ध नाही. चीनमधून नेपाळमध्ये दाखल व्हायचे तर हिमालय ओलांडून यावे लागते. उलट भारतातून नेपाळमध्ये जाणे अगदीच सोपे आहे. अनेक वस्तूंच्या, विशेषत: पेट्रोलियम उत्पादनांच्या आपल्या गरजा भागवण्यासाठी नेपाळ भारतावर पूर्णपणे अवलंबून आहे. परिणामी भारताने आपली आर्थिक नाकेबंदी केल्याचे नेपाळला वाटते तर आपण अशी कोणतीही कृती केलेली नाही असे भारत सरकारचे म्हणणे आहे. तिथे पेट्रोल आणि डिझेलचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.‘काठमांडू पोस्ट’ने आपल्या अग्रलेखात याच प्रश्नाचा उहापोह केला असून या अनधिकृत नाकेबंदीसारख्या घटनेमुळे मूळ मधेशी समस्येकडे दुर्लक्ष होऊन इतर दुय्यम गोष्टी महत्वाच्या ठरण्याची शक्यता असल्याचे सांगताना या समस्येचे वेगवेगळे पैलू मांडले आहेत. बीरगुंज, विराटनगर या भागात आंदोलनकर्त्या मधेशींनी रस्ते रोखले असले तरी इतर भागात असा कोणताही अवरोध नसल्याचे सांगून पोस्टने भारताच्या माथी दोषाचे खापर फोडले आहे. गुरुवारी पोलीस संरक्षणात पेट्रोलचे सोळा टँकर्स नेपाळमध्ये दाखल झाल्याचेही पोस्टने म्हटले आहे. ‘हिमालयन टाईम्स’च्या पहिल्या पानावरच्या बातमीवरून पेट्रोलच्या पुरवठ्याबाबत जवळपास आणीबाणीची स्थिती निर्माण झाली असल्याचे लक्षात येते. कोणत्याही खाजगी वाहनास पेट्रोल मिळू शकणार नाही असा आदेश नेपाळ आॅईल कॉर्पोरेशनने दिला आहे. आपल्या अग्रलेखात भारत आणि नेपाळने परस्पर चर्चेने आपापसातले प्रश्न सोडवणे गरजेचे असल्याचे त्याने म्हटले आहे. नेपाळने तराई भागातल्या मधेशींच्या समस्येवर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु केल्याची बातमीही टाईम्सने दिली आहे. टाईम्सच्या याच अंकात अभिषेक मनधार या स्तंभलेखकाचा एक लेख प्रकाशित झाला आहे. नेपाळला पेट्रोल स्वातंत्र्य मिळण्याची शक्यता आहे का याबद्दलचे विश्लेषण त्यांनी केले आहे. एखाद्या समस्येचा विचार करताना त्या समस्येमुळे प्रश्नाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन विकसित व्हायला कशा प्रकारे मदत होते हे या लेखातून लक्षात येत. याच अंकात नेपाळच्या डाव्या पक्षाचे नेते आणि माजी पंतप्रधान बाबुराम भट्टराय यांच्या विरोधात जनकपूर भागात सुरु झालेल्या तीव्र आंदोलनाची बातमीही आली आहे. नेपाळी भाषेतल्या ‘कान्तिपूर’ या दैनिकात डॉ. प्रकाशचंद्र लोहनी या प्रजातंत्र पार्टीच्या वरिष्ठ नेत्याचा लेख आला आहे. मोदींनी अल्पकाळात नेपाळच्या जनतेचा संपादन केलेला विश्वास भारतीय नोकरशहांनी पार नष्ट केल्याचा सूर त्यांनी लावला आहे. अमेरिकेसह जगातल्या इतर देशांनी नेपाळच्या लोकानी प्रचंड प्रयत्न केल्यावर नवी राज्यघटना निर्माण केली याचे स्वागत केले आहे. भारतानेसुद्धा नेपाळच्या नव्या घटनेचे स्वागत करून तिथल्या समस्या चर्चा आणि संवादाने सोडवाव्यात असे मत व्यक्त केले आहे. पण लोकप्रिय जनमत मात्र भारताबद्दलचा संताप आणि भारताबद्दलचा संशय व्यक्त करते आहे. नेपाळमधील या भारतविरोधी वातावरणाचा लाभ उठवायला चीन तयारच आहे. ‘अन्नपूर्णा पोस्ट’ या नेपाळी भाषिक वृत्तपत्रात ‘नाकाबंदी चीन र भारत’ (नाकाबंदी, चीन आणि भारत) या वार्तापत्रात या विषयाचा आणि त्यातही पुष्पकमल दहल प्रचंड या मार्क्सवादी नेत्याच्या चीनबद्दलच्या दृष्टिकोनाचा विचार केला आहे. ते पाहता भारताला आपल्या नेपाळविषयक धोरणाचा नीट विचार करून सावधपणाने पावले टाकली पाहिजेत असे लक्षात येते. कान्तिपुर दैनिकातले डॉ. लोहनी यांच्या वर उल्लेख केलेल्या लेखात याबद्दलचे एक बोलके व्यंगचित्र प्रकाशित झाले आहे. ते नेपाळच्या मनातली सध्याची अस्वस्थता , भारताबद्दलची नाराजी आणि संताप नेमकेपणाने व्यक्त करते.
भारताचा नव्याने अशांत शेजारी : नेपाळ
By admin | Updated: October 2, 2015 22:11 IST