शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

भारताची बेरीज-वजाबाकी; ‘भारत विश्वगुरु होणार’ अन् ‘एकविसावे शतक भारताचे आहे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 07:04 IST

Tariff War Between US and China: ट्रम्प यांनी जेवढ्यास तेवढे आयात शुल्क आकारण्याची घोषणा करून, अनेक देशांमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवरील आयात शुल्क नुकतेच वाढविले.

सध्याच्या घडीला संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चिला जाणारा विषय कोणता असेल, तर तो म्हणजे आयात शुल्क आणि त्यामुळे भडकलेले अमेरिका-चीन व्यापारयुद्ध! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच आयात शुल्क वाढविण्याचे हत्यार उपसल्यामुळे हे व्यापारयुद्ध सुरू झाल्याचा सर्वसाधारण समज असला तरी, प्रत्यक्षात ते २०१८ मध्येच सुरू झाले होते. 

ट्रम्प यांनी जेवढ्यास तेवढे आयात शुल्क आकारण्याची घोषणा करून, अनेक देशांमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवरील आयात शुल्क नुकतेच वाढविले. त्यात चीनवर जबर आयात शुल्क आकारल्याने, चीननेदेखील प्रत्युत्तरादाखल अमेरिकेवर आयात शुल्क वाढविले आणि त्यातून व्यापारयुद्धाचा भडका उडाला. त्यानंतर चीनवगळता इतर देशांवर आकारलेले वाढीव आयात शुल्क अमेरिकेने नव्वद दिवसांसाठी स्थगित केले. 

या संघर्षामुळे केवळ अमेरिका आणि चीनदरम्यानचाच नव्हे, तर जगभरातील व्यापार प्रभावित झाला आहे. या संघर्षामुळे भारतासाठी किती संधी निर्माण झाल्या आहेत आणि त्याचे फायदे-तोटे काय असू शकतात, हा भारतीयांसाठी औत्सुक्याचा विषय आहे. 

ट्रम्प यांनी पहिल्या राष्ट्राध्यक्षीय कारकिर्दीदरम्यान २०१८ मध्येच काही चिनी उत्पादनांवरील आयात शुल्क वाढवले होते आणि त्याविरोधात चीननेही अमेरिकेच्या उत्पादनांवर शुल्क लावले होते. तेव्हाच दोन्ही देशांत व्यापारयुद्ध सुरू झाले होते. त्यामुळे जागतिक व्यापार व्यवस्थेवर मोठा परिणाम होऊन विविध देशांनी त्यांच्या व्यापार धोरणात बदल करणे सुरू केले होते. 

अमेरिका-चीन व्यापारयुद्धाची तीव्रता वाढण्याची शक्यता विचारात घेऊन, अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी ‘चीन अधिक एक’ धोरण स्वीकारले. त्या अंतर्गत चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इतर देशांमध्ये उत्पादन केंद्रे उभारण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यातील बरीच केंद्रे भारताच्याही वाट्याला आली. 

गेल्या काही वर्षांत औद्योगिक उत्पादने, इलेक्ट्रॉनिक्स, रसायने, धातू इत्यादी क्षेत्रांमध्ये भारताने आपला वाटा वाढवला आहे. मोबाइल क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी भारतात उत्पादन केंद्रे स्थापन केली आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत अग्रणी मोबाइल उत्पादक देशांमध्ये भारताचाही समावेश झाला आहे. 

भारताच्या औषधनिर्माण क्षेत्रासाठीही  अमेरिका - चीन व्यापारायुद्धामुळे संधी निर्माण झाली आहे. भारतासाठी अशा संधी निर्माण झाल्या असल्या तरी, त्या इतर देशांनाही उपलब्ध आहेत आणि त्यामुळे भारताच्या झोळीत आयते काही येऊन पडण्याची अपेक्षा चुकीची ठरेल. 

भारताने निश्चितच काही संधींचा लाभ घेतला आहे; परंतु व्हिएतनाम, मलेशिया, दक्षिण कोरिया, सिंगापूरसारख्या देशांच्या तुलनेत भारताला उत्पादन क्षेत्रात मोठा ठसा उमटवता आलेला नाही. नोमुरा प्रॉडक्शन रिलोकेशन इंडेक्सनुसार भारताचा क्रमांक व्हिएतनाम आणि मलेशियाच्या नंतर लागतो. त्यामुळे भारताला चीनमधील उत्पादन केंद्रे आकर्षित करायची असतील, तर आणखी धोरणात्मक सुधारणा आवश्यक आहेत. जमीन अधिग्रहणातील जटिलता, अपुऱ्या पायाभूत सुविधा, करांचे उच्च दर, अत्याधिक नियामक अडथळे यांसारख्या अडचणींमुळे भारतात औद्योगिक उत्पादन वाढवणे आव्हानात्मक ठरू शकते. 

दुसरी गोष्ट म्हणजे, ज्या चीनमधील उत्पादन केंद्रे आपल्याकडे वळविण्याची भारताची मनीषा आहे, त्याच चीनवर भारत अनेक बाबतीत अवलंबून आहे. विशेषतः औषधनिर्माण क्षेत्रासाठी आवश्यक असलेला कच्चा माल भारत मोठ्या प्रमाणात चीनमधूनच आयात करतो. त्यामुळे चीनवरील अवलंबित्व कमी करून औद्योगिक उत्पादनाची क्षमता वाढवणे हे भारतासाठी एक मोठे आव्हान ठरू शकते. 

वस्तुतः भारतात चीनपेक्षाही स्वस्त मनुष्यबळ उपलब्ध आहे. शिवाय इंग्लिश भाषा हीदेखील भारताची जमेची बाजू आहे. लोकशाही व्यवस्थेमुळेही पाश्चात्त्य देशांसाठी भारत अधिक जवळचा आहे; पण, व्यापारयुद्धाचे पूर्ण लाभ मिळविण्यासाठी भारताला तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात सुधारणा कराव्या लागतील. 

निर्यात धोरण आकर्षक बनविण्यासोबतच, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, करप्रणाली आणि व्यापार धोरणांचे अनुकूल वातावरण तयार करावे लागेल. केवळ ‘भारत विश्वगुरु होणार’ अन ‘एकविसावे शतक भारताचे आहे’, असे म्हटल्याने काही होणार नाही. बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेत सशक्त आणि प्रभावी स्थान मिळवण्यासाठी दूरदृष्टीने योग्य धोरणात्मक निर्णय जलदगतीने घेणे अत्यंत आवश्यक आहे.

टॅग्स :Trade Tariff Warटॅरिफ युद्धDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पXi Jinpingशी जिनपिंगAmericaअमेरिकाchinaचीन