गजानन जानभोर(cmhealthcell@gmail.com) -
थॅलसेमियाने ग्रस्त आपल्या मुलाला वाचविण्यासाठी मंदिरांसोबतच माणसांचे उंबरठे झिजवणाऱ्या एका गरीब बापाच्या संघर्षाची ही कहाणी आहे. या बापाने मुलाच्या उपचारासाठी आपले सर्वस्व विकून टाकले. उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेली आॅटोरिक्षाही विकली. तामिळनाडूतील वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजात तो आता मुलाला घेऊन गेला आहे. लवकरच शस्त्रक्रिया होईल आणि त्याचा मुलगा एक नवे आयुष्य जगायला लागेल. पण ही गोष्ट इथेच संपत नाही.या गरीब आॅटोरिक्षा चालकाच्या संघर्षात समाजातील ज्या सहृदयी माणसांनी मदत केली, त्यांच्या माणुसकीची आपण माध्यम म्हणून दखल तर घ्यायला हवीच, पण त्याच्या या लढाईत बातमीचा विषय कुठेही होऊ न देता मुलाला वाचविण्यासाठी मदत करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची संवेदनशीलतासुद्धा समाजासमोर येणे आवश्यक आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील देगाव मानकी या खेड्यात प्रकाश धर्माळे हा आॅटोरिक्षा चालक राहतो. त्याचा नऊ वर्षांचा मुलगा तुषार थॅलसेमिया (मेजर) या आजाराने ग्रस्त आहे. दर १५ दिवसानंतर त्याला रक्त बदलावे लागते. मुलाचा जीव वाचवायचा असेल तर ‘बोनमॅरो’ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करावी लागेल, असे डॉक्टरांनी सांगताच त्याच्यावर आभाळ कोसळले. शस्त्रक्रियेसाठी लागणारे १५ लाख रुपये आणायचे कुठून? तो वणवण भटकत होता. किती जणांपुढे हात पसरायचे आणि कुणाकुणाला हातपाय जोडायचे? पण त्याच्यातला बाप त्याला हार मानू देत नव्हता. एका सामाजिक कार्यकर्त्याने त्याला मुख्यमंत्री सहायता निधीबाबत सांगितले. प्रयत्न करून बघ! शक्यता तशी कमीच आहे, असाही तो कार्यकर्ता पूर्वानुभवातून म्हणाला. या आॅटोरिक्षा चालकाने मुख्यमंत्र्यांचा मोबाईल क्रमांक कुठून तरी मिळवला आणि त्यांना एसएमएस केला. आश्चर्य असे की त्याच दिवशी संध्याकाळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून त्याला फोन आला. मुलाच्या उपचाराशी संबंधित सर्व कागदपत्रे त्याला मागितली व पुढची प्रक्रिया सुरू झाली. या प्रक्रियेत जुनाट सरकारी खाक्यांचे अडथळेही यायचे. पण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची जबाबदारी सांभाळणारे ओमप्रकाश शेटे सातत्याने पाठपुरावा करीत होते. या मुलासाठी सरकारी नियम आडवे येऊ देऊ नका, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. शेवटी १९ जूनला चार लाख रुपये वेल्लोरच्या रुग्णालयात महाराष्ट्र सरकारकडून जमा करण्यात आले. या आठवड्यात तुषारवर शस्त्रक्रिया होईल. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून या गरिबाला मदत मिळाली हे तर महत्त्वाचे आहेच, पण वेळीच उपचार उपलब्ध व्हावेत म्हणून मुख्यमंत्री फडणवीस व त्यांचे सहकारी केतन पाठक, ओमप्रकाश शेटे यांनी केलेली धडपड सरकारची पूर्वापार असलेली काळीकुट्ट प्रतिमा पुसून काढणारी आहे. मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून यापूर्वीही अनेकांना मदत मिळाली आहे. परंतु खेदाची बाब ही की, पूर्वी आमदार-खासदार किंवा बड्या नेत्यांच्या, अधिकाऱ्यांच्या शिफारशीनंतरच अशी मदत मिळायची. सामान्य माणूस इथपर्यंत सहसा पोहचू शकत नव्हता. चुकीने पोहोचलाच तरी प्रचंड मनस्ताप देऊन उपकाराच्या भावनेतून ही मदत दिली जायची. आता तसे राहिलेले नाही. नागपूरचे हेमदेव चौरागडे यांच्या हृदयविकारग्रस्त मुलाला किंवा बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर पांग्रा येथील राजेश देशपांडे यांना मिळालेली मदत या गोष्टीचे द्योतक आहे. ओमप्रकाश शेटे हे सरकारी अधिकारी नाहीत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. मुंबईत अनेक वर्षांपासून रुग्णसेवा करतात. मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर फडणवीसांनी त्याच दिवशी शेटेंना फोन केला आणि उद्यापासून हे काम सांभाळा असे सांगितले. प्रकाश धर्माळे या आॅटोरिक्षा चालकाला आलेला हा अनुभव प्रातिनिधिक आहे. सरकारचा दृष्टिकोन समाजातील शेवटच्या माणसाला न्याय देणारा असेल तर सरकार त्याच्यापर्यंत थेट कसे पोहोचते याचेही हे उदाहरण आहे. समाजातील अशा गरजूंना वैद्यकीय उपचारासाठी मदत हवी असेल तर ते मुख्यमंत्री कार्यालयातील पुढील ई-मेलवर संपर्क साधू शकतात.