शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

उच्च नैतिकतेचे आव्हान!

By admin | Updated: December 22, 2015 02:16 IST

सार्वजनिक जीवनात उच्च नैतिकतेचे पालन केवळ आमचाच पक्ष करतो हा भाजपाचा प्रथमपासूनचा लाडका दावा आहे. त्यासाठी हमखास उदाहरण दिले जाते

सार्वजनिक जीवनात उच्च नैतिकतेचे पालन केवळ आमचाच पक्ष करतो हा भाजपाचा प्रथमपासूनचा लाडका दावा आहे. त्यासाठी हमखास उदाहरण दिले जाते ते लालकृष्ण अडवाणी यांचे. त्यांच्यावर हवाला प्रकरणी आरोप झाल्यानंतर त्यांनी उच्च नैतिकतेचे दर्शन घडविताना लगेचच संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि चौकशीअंती आरोपाचे किटाळ हटले तेव्हांच पुन्हा विधिवत निवडून येऊन संसदेत पाऊल टाकले असे गौरवाने सांगितले जाते. त्यांच्या या उच्चतम नैतिकतेचे पक्षाने त्यांना कोणते आणि काय पारितोषिक दिले हे आज जगासमोर आहेच. अडवाणी यांच्यानंतर पुढे अशी नैतिकता दाखविण्याची संधीच बहुधा कुणाला मिळाली नसावी किंवा संधी मिळूनही कुणी तसे धाडस केले नसावे. पण दीर्घ काळानंतर आता तशी संधी चालून आली आहे. केन्द्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे तसेही अत्यंत धाडसी मंत्री म्हणून ओळखले जातात. परिणामी आलेली संधी साधून आणि आपल्या धाडसाचे दर्शन घडवीत जेटली आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देतात का आणि उच्च नैतिकतेच्या दर्शनाचे आव्हान स्वीकारुन नवा मापदंड रुजू करतात हाच आता देशवासियांच्या दृष्टीने मोठ्या औत्सुक्याचा प्रश्न आहे. सुमारे दोन वर्षापूर्वीपर्यंत जेटली दिल्ली क्रिकेट संघटनेचे (डीडीसीए) प्रदीर्घकाळ अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सदर संघटनेने राजधानीतील फिरोजशाह कोटला मैदानाच्या नूतनीकरणाचे जे काम हाती घेतले, त्या कामात काही कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सध्या दिल्ली शहरावर ज्या पक्षाचा झेंडा आहे त्या आम आदमी पार्टीने गेल्याच सप्ताहात केला होता. हा आरोप होण्याच्या आदल्या दिवशी सीबीआयने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयावर धाड टाकून काही कागदपत्रे जप्त केली होती आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव राजेन्द्रकुमार यांची सलग चौकशी केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जेटलींवर आरोप करताना म्हटले होते की आपला भ्रष्टाचार उघड करणारी कागदपत्रे हस्तगत करण्यासाठी जेटलींच्या सांगण्यावरुनच ही धाड टाकली गेली होती. केजरीवाल यांनी केलेला आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे भाजपातर्फे सांगितले जात असतानाच खुद्द भाजपाचेच एक खासदार आणि माजी क्रिकेट खेळाडू कीर्ती आझाद यांनी खास पत्रकार परिषद आयोजित करुन जेटलींच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत डीडीसीएमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा पाढा ‘विकीलिक्स’चा आधार घेऊन वाचला. त्यांनी हा पाढा वाचताना भले जेटली यांचा स्पष्ट नामोल्लेख केला नसला तरी त्यांनी जेटलींच्याच दिशेने अंगुलीनिर्देश केला हे उघड आहे. आझाद यांच्या पत्रकार परिषदेनंतर साहजिकच ‘आप’ आणि काँग्रेस पक्षाने जेटलींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या मागणीचे स्वर अंतराळात कायम असतानाच काही क्रिकेट खेळाडूंनी समोर येऊन जेटलींना स्वच्छतेचे प्रमाणपत्रही बहाल केले. सार्वजनिक संस्थांमध्ये आर्थिक अपहाराची जी एक विशिष्ट कार्यप्रणाली सर्वत्र आढळून येते तीच दिल्ली क्रिकेट संघटनेतही आढळून येत असल्याचे आझाद यांनी जाहीर केलेल्या कागदपत्रांवरुन दिसून येते. आता हा अपहार नेमका जेटलींनी केला की आणखी कोणी याचा उलगडा केजरीवाल यांनी ताबडतोबीने नियुक्त केलेल्या चौकशी आयोगाचा अहवाल जाहीर होईल तेव्हांच होऊ शकेल. पण कोणत्याही संघटनेचा वा संस्थेचा अध्यक्ष ज्या न्यायाने चांगल्या कामाच्या श्रेयाचा धनी होत असतो त्याच न्यायाने कुकर्मांची नैतिक जबाबदारीही त्याला स्वीकारावीच लागते. कार्यबाहुल्यामुळे जेटलींना डीडीसीएच्या दैनंदिन कामकाजात लक्ष घालायला वेळच मिळत नव्हता असे सांगून हात झटकता येणार नाहीत. जर वेळ मिळत नव्हता तर त्यांनी पद स्वत:पाशी ठेवण्याचे कारण नव्हते. पण देशातील बहुतेक सत्ताकारण्यांना क्रिकेट किंवा तत्सम क्रीडा संघटना आपल्या दिमतीला हवीशा वाटत असतात आणि अशा संघटनांनादेखील राजकारण्यांविषयी ओढ वाटत असते. ज्या न्यायाने सोनिया आणि राहूल गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी न्यायालयात स्वत:चे निर्दोषत्व सिद्ध करण्याची संधी प्राप्त असल्याचे जेटली आणि प्रभृती सांगत असतात त्याच न्यायाने तशी संधी जेटली यांनादेखील उपलब्ध होणारच आहे. केजरीवाल यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दिवाणी आणि फौजदारी खटला दाखल करण्याने किंवा व्यंकय्या नायडू यांनी कीर्ती आझाद यांच्याविरुद्ध पक्षशिस्तीच्या भंगाची कारवाई करण्याने मूळ मुद्याची उकल होऊ शकणार नाही. त्यासाठी नैतिकतेचा स्वीकार करुन जेटलींनी पदमुक्त होणे आणि निष्पक्षपाती चौकशीची वाट प्रशस्त करुन देणे हाच योग्य पर्याय ठरु शकतो. आझाद यांनी जसे जेटलींचे थेट नाव घेतले नाही तद्वतच आझाद यांचेही थेट नाव न घेता जेटली असे काही म्हणाले की, भाजपाचा एक खासदार मध्यंतरी काँग्रेसच्या लोकाना भेटला आणि त्याने डीडीसीए संबंधित कागदपत्रे गोळा केली. याचा अर्थ भाजपाच्या आझाद यांनी त्यांच्याच पक्षाच्या ज्येष्ठ मंत्र्यावर काँग्रेसकडून फूस घेऊन आरोप केले. असेच त्रैराशिक मांडायचे ठरविल्यास आझाद आपल्या पत्रकार परिषदेत पुन:पुन्हा मोदींविषयी त्यांच्या मनातील जो आदरभाव व्यक्त करीत होते. त्याची संगती कशी लावायची?