शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात ढगफुटी होऊनही नशीबफुटी कायम

By admin | Updated: July 22, 2016 04:44 IST

सलग चार वर्षांच्या दुष्काळानंतर मराठवाड्यातील काही गावांत यंदा पावसाने चांगलेच मनावर घेतले.

सलग चार वर्षांच्या दुष्काळानंतर मराठवाड्यातील काही गावांत यंदा पावसाने चांगलेच मनावर घेतले. लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानीत, हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर, कुरुंदा, आंबा आणि गिरगावमध्ये अक्षरश: ढगफुटी झाली. दुष्काळ कायमचा पळून गेल्याचे चित्र निर्माण झाले. पण यातील एकाही गावात सध्या मुबलक पाणी नाही. शेती-उद्योगासाठी पाणी दूरच, पिण्याच्या पाण्याचेच हाल आहेत. मग या ढगफुटीतून बदाबदा पडलेले पाणी गेले कुठे? हिंगोली जिल्ह्याने ते आंध्राला, तर लातूर जिल्ह्याने कर्नाटकला देऊन टाकले. एकीकडे हक्काचे पाणी द्या म्हणून नाशिक-नगरशी भांडत राहायचे, वेळ-पैसा खर्च करायचा आणि इकडे पदरात पडलेले पाणी समोरच्याने न मागता त्याला देऊन टाकायचे. हातचे सोडून पळत्याच्या मागे धावण्याचाच हा प्रकार. जलपरीने बदनाम केलेल्या लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानीत (ता. निलंगा) एकाच दिवशी दीड तासात तब्बल ९४ मि.मी. पाऊस झाला, तरी पाण्याची ओरड आहे. १९८० च्या सुमारास औराद शहाजानीची लोकसंख्या पाच हजारांच्या घरात होती. तेव्हांच्या मागणीनुसार तेरणा नदीवरील तगरखेडा कोल्हापुरी बंधारा आणि आताच्या उच्चस्तरीय पाटबंधाऱ्यात एक विहीर घेण्यात आली. तिथून औरादला पाणीपुरवठा व्हायचा. आज औरादची लोकसंख्या ३५ हजारांच्या घरात गेली आहे. पाणी जुन्या औरादलाही पुरेनासे झाले आहे. त्यामुळे याच नदीवर वरील बाजूस असलेल्या औराद कोल्हापुरी बंधाऱ्यात तीन बोअर घेण्यात आले. आता औराद ‘कोल्हापुरी’चे उच्चस्तरीय बंधारा करण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यास येथे पाणी अडविता येईल. दोन वर्षांपूर्वी चार कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला. कुठे घोडे अडले ते ठाऊक नाही. पाणी अडविण्यात ठिकठिकाणी असे अनेक अडसर आहेत. आधी ते दूर करायला हवेत. औरादला पाणी पुरवले जाते तो तगरखेडा बंधारा पहिल्याच पावसात ओव्हरफ्लो झाला. ०.७७ द.ल.घ.मी. ही त्याची क्षमता. यंदा टंचाई जाणवणार नाही, असे वाटले. पण केवळ तीन आठवड्यांत २४ टक्के पाणी कमी झाले. पाऊस पडला त्या दिवशी ओव्हरफ्लो झाल्यानंतरचे सर्व पाणी पुढे वाहून कर्नाटकमध्ये गेले. हिंगोली जिल्ह्यातही हेच घडले. आखाडा बाळापूरमध्ये (ता. कळमनुरी) चार तासांत १२७ मि.मी. पाऊस झाला. वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे तीन तासांत १४७ मि.मी., गिरगावमध्ये १३५ मि.मी., तर आंबामध्ये एवढ्याच वेळात १२१ मि.मी. पाऊस झाला. वसमत, हिंगोलीसह साधारण ४५ गावांना पाणी पुरवणाऱ्या सिद्धेश्वर धरणाच्या खालच्या बाजूस ढगफुटी झालेली ही सर्व गावे येतात. या धरणात सध्या १५४ द.ल.घ.मी. पाणीसाठा असून, ते अद्याप मृतसाठ्यात आहे. सध्या हिंगोलीला तीन दिवसाआड, तर वसमतला दोन दिवसाड पाणी मिळते. कुरूंदा गाव अनेक वर्षांपासून तहानलेलेच आहे. २२ गाव योजना, कालवा आणि आता पाईपलाईन करुनही इथला पाण्याचा प्रश्न मिटला नाही. आतापर्यंत वसमत तालुक्यात ३८६ मि.मी., तर कळमनुरी तालुक्यात ४१२ मि.मी. पाऊस झाला आहे. कुठे गेले हे पाणी? पैनगंगा, गोदावरी करीत आंध्र प्रदेशला जाऊन मिळाले. या पाण्याला ब्रेक लागावा म्हणून सापळी धरणाचा विचार पुढे आला. जमीन जाणार हिंगोलीची, लाभ मात्र होणार नांदेडला असे म्हणत त्याला विरोध झाला. आता काय, ना नांदेडला ना हिंगोलीला. पाणी मिळते आंध्रला. औरादला साधारण ८०० मि.मी. तर हिंगोली जिल्ह्यात ८९३ मि.मी. पाऊस पडतो आणि तिकडे राजस्थानात साधारण २०० ते ४०० मि.मी. पाऊस पडतो. तरीही तिथे टँकर लागत नाही. मग येथेच पाणीटंचाई का? याचा अर्थ नियोजनात काहीतरी चुकते आहे. पडणारे पाणी मुरवायचे व साठवायचे कसे, याची शिकवण घालून द्यायला हवी. पाण्यासाठी भांडण्यात व पैसा आणि वेळ खर्च करण्यापेक्षा हे करायला हवे. पण ‘कुठलाही राजकीय पुढारी यात पुढाकार घेणार नाही. कारण यात पैसा नाही, टक्केवारी नाही, कार्यकर्ते सांभाळता येतील, असे फंडेही नाहीत...’, जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांची ही प्रतिक्रिया प्रत्येकाने समजून घेण्याची गरज आहे. १९७२ च्या दुष्काळानंतर सरकारने राज्यात पाण्यासाठी ७० हजार कामे केली आहेत म्हणे. याचा अर्थ प्रत्येक तालुक्यात ३०० कामे झाली. कोठे आहेत ती? एक तर ही कामे फक्त कागदावरच झाली असावीत वा जी झाली त्यांना कोणी वाली नसावा. याचा अर्थ पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागावा, अशी सरकारची भूमिका कधीच नव्हती. त्यामुळे जे प्रश्न तेव्हा होते, तेच आजही आहेत. उद्या जलयुक्त कामांचेही असेच झाले तर फारसे नवल वाटायला नको. -गजानन दिवाण(उपवृत्त संपादक-लोकमत, औरंगाबाद)