शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

सांगा कसं जगायचं? ऋतुचक्राचे उग्र रूप अन् महागाईने गाठलेले शिखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2023 08:32 IST

वर्षागणिक विस्कळीत होत चाललेल्या ऋतुचक्राने आता त्याचे उग्र रूप दाखवायला सुरुवात केली आहे. दोन महिन्यांपूर्वी महागाई आटोक्यात येईल, असे ...

वर्षागणिक विस्कळीत होत चाललेल्या ऋतुचक्राने आता त्याचे उग्र रूप दाखवायला सुरुवात केली आहे. दोन महिन्यांपूर्वी महागाई आटोक्यात येईल, असे वाटत असतानाच जुलैमध्ये मात्र महागाईने शिखर गाठले. देशाच्या खाद्यान्न निर्देशांकात ४.८७ वरून तब्बल ७.४४ टक्के इतकी वाढ झाली आहे. याचा साधा अर्थ असा की, आपल्या दैनंदिन खाण्या- पिण्याच्या गोष्टी जवळपास महिनाभरात तीन टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत अन्न-धान्याच्या, भाजीपाल्याच्या व फळफळावळीच्या किमतीमध्ये यावर्षी ३७ टक्क्यांनी तर डाळींच्या किमतीमध्ये १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

हे असे होण्याचे मुख्य कारण म्हणजे वातावरणात होणारा बदल. ऋतुचक्र आता बेभरवशाचे झाले आहे. याचा थेट परिणाम कृषी उत्पन्नावर होताना दिसत आहे. अर्थात निसर्गापुढे आपल्या मर्यादा असल्या तरी अर्थशास्त्राच्या पातळीवर यावर काही तोडगा काढणे शक्य आहे का, याचादेखील गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात चलनवाढीने डोके वर काढले होते. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप करत तब्बल सहा वेळा रेपो दरात वाढ केली. 

गेल्या दोनवेळी सादर झालेल्या पतधोरणामध्ये व्याजदरात वाढ झाली नाही. त्यावेळी चलनवाढ आटोक्यात येत असल्याचा दावा रिझर्व्ह बँकेने केला होता. मात्र, आता खाद्यान्न व महागाई निर्देशांकाची प्रसिद्ध झालेली आकडेवारी लक्षात घेता चलनवाढ खरोखर आटोक्यात येत आहे का, रिझर्व्ह बँकेने महागाई नियंत्रणात आणण्याचे जे लक्ष्य निश्चित केले आहे व त्या अनुषंगाने जी पावले उचचली आहेत, त्याचा खरोखर फायदा होत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सातत्याने वाढलेल्या व्याजदरामुळे चलनवाढीला नियंत्रण मिळत असल्याचा दावा होत असला तरी याचा थेट परिणाम हा गृहकर्जापासून विविध कर्ज महागल्यामुळे अनेकांनी घर खरेदीचा निर्णय बासनात गुंडाळल्याचे दिसते. 

तर दुसरीकडे ज्यांची कर्ज आहेत त्यांच्या मासिक हप्त्यामध्ये वाढ झाल्यामुळे त्यांचाही खिसा हलका होत आहे. त्यात आता महागाईच्या विळख्याने त्यांचे जगणे असह्य झाले आहे. एकीकडे व्याजदरातील वाढ आणि दुसरीकडे इंधनाच्या किमतीत न होणारी कपात हादेखील कळीचा मुद्दा ठरला आहे. भारतासारख्या देशात महागाईचा थेट संबंध हा कच्च्या तेलाच्या किमतीशी निगडित आहे. कच्चा तेलाच्या माध्यमातून पेट्रोल व डिझेलची निर्मिती होते. मालवाहतुकीचे अर्थकारण १०० टक्के डिझेलच्या किमतीशी निगडित आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या तरी आपल्याकडे इंधनदर कमी झालेले नाहीत. 

जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत, त्या अनुषंगाने किंवा त्यापेक्षा कित्येक पटींनी अधिक आपल्याकडे इंधनाच्या किमती महागल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही महत्त्वाच्या इंधनांनी शंभरीचा आकडा पार केलेला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती घटत आहेत तर त्या अनुषंगाने भारतीय बाजारातही त्यात कपात होणे गरजेचे आहे. इंधनाच्या किमतीमध्ये कपात झाली तर याचा थेट परिणाम हा मालवाहतुकीचे दर कमी होण्यात होईल. त्याची परिणती त्यांच्याद्वारे वाहतूक होणाऱ्या भाजीपाल्यांच्या किमती कमी होण्याच्या रूपाने होईल व पर्यायाने लोकांच्या खिशातील चार पैसे वाचतील. निरोगी आयुष्य राखण्यासाठी सकस आणि चौरस आहार महत्त्वाचा. मात्र, आता खाण्या पिण्याच्या किमती महिन्याचे बजेट कोलमडू पाहात आहेत. अनेकांच्या ताटातून भाज्यांचे प्रमाण कमी झाले आहे. प्रोटीनचा उत्तम स्रोत समजल्या जाणाऱ्या डाळी महागल्या आहेत. 

कडधान्यांची स्थितीही वेगळी नाही. फळांच्या किमती तर आ वासून पाहात आहेत. त्यामुळे अनेकांच्या घरात फळांची खरेदीही कमी झाल्याचे दिसते. निरोगी आयुष्यासाठी जे अन्नघटक पोटात जाणे गरजेचे आहे त्याचे प्रमाण कमी झाले तर अर्थातच त्याचा फटका लोकांच्या आरोग्याला बसेल. विस्कळीत झालेल्या ऋतुचक्रामुळे महागाई वाढली ही कारणमीमांसा सरकारी पातळीवर होत असली तरी त्यातून मार्ग काढणे ही सरकारचीच जबाबदारी आहे. ऋतुचक्र सातत्याने बदलत आहे तर त्याचाही सखोल अभ्यास व्हायला हवा. त्या अनुषंगाने आपल्या व्यवस्थेत आवश्यक ते बदल करायला हवेत. आपण हे आव्हान समजून घेत त्यावर तोडगा काढला नाही तर भविष्यात मार्ग काढण्याचीही वेळ निघून जाईल. त्यामुळे निसर्गाच्या हाका सावधपणे ऐकण्याची वेळ आली आहे.

 

टॅग्स :Inflationमहागाई