शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय - संसदेतील अधिवेशनात निलंबनाचे सत्र !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 10:28 IST

केंद्रीय तपास यंत्रणांचे अनेकांवर छापे पडत आहेत. अनेकांना अटक होत आहे.

समाजमनात उपस्थित होणारे आणि चर्चिले जाणारे विषय संसदेच्या पटलावर मांडून चर्चा घडवून आणण्याचा मूलभूत अधिकार विरोधी पक्षांच्या सदस्यांना असतो. आता सुरू असलेल्या संसद  अधिवेशनात विरोधकांनी महागाई, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, अत्यावश्यक अन्नपदार्थावर लावलेला जीएसटी, गुजरातमधील विषारी दारूचे बळी आदी विषयांवर चर्चा करण्याचा आग्रह धरला आहे. याशिवाय लष्करात जवानांच्या भरतीसाठी लागू करण्यात आलेल्या अग्निपथ योजनेवरदेखील चर्चा झाली पाहिजे, अशी विरोधकांची मागणी आहे. वास्तविक विरोधकांच्या मागण्या अवाजवी नाहीत. गेले वर्षभर महागाईचा निर्देशांक वाढतच राहिला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर  वाढतच आहेत. जीएसटीचा हा कळीचा मुद्दा आहे. यावर संसदेच्या पटलावर चर्चा नाकारण्याचे काही कारण दिसत नाही. सभागृहासमोर कामकाजात महत्त्वाचे प्रस्ताव असतील तर एकवेळ चर्चा कधी करायची, याची वेळ ठरविता येऊ शकते. संसदीय कामकाजाच्या नियमानुसार नोटीस देऊन लोकांच्या मूलभूत प्रश्नांवर विरोधक चर्चेची मागणी करत असतील, तर ती सरसकट फेटाळून लावून गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्यात काही अर्थ नाही. सध्या याच विषयावर जनतेत चर्चा चालू आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांचे अनेकांवर छापे पडत आहेत. अनेकांना अटक होत आहे. अशावेळी चर्चा टाळण्याचे काय कारण? महागाईमागच्या कारणांना अर्थशास्त्रीय भाषेत उत्तर देता येऊ शकते.  स्वयंपाकाच्या गॅसची किंमत वाढली आहे. सरकारने हळूहळू अनुदान बंद करण्याकडे वाटचाल चालू ठेवली आहे. प्रत्येक घराशी संबंध येणाऱ्या विषयावर तरी सरकारची नीती काय आहे, याचे उत्तर जनतेला मिळायला नको का? अग्निपथ योजनेवर देशाच्या अनेक भागांत युवकांनी हिंसक निदर्शने केली. जाळपोळ केली. असंख्य युवकांना अटक करण्यात आली. तरीदेखील सरकारने लष्कराच्या अधिकाऱ्यांना प्रसार माध्यमांसमोर आणून बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण देशातील युवकांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर चर्चाही करण्याची सरकारची तयारी नसेल तर संसदेचे अधिवेशन चालू ठेवण्यात काय अर्थ आहे? विरोधकांची मागणी फेटाळून  सरकार रेटून कामकाज करीत असेल तर त्या कामकाजाचे मूल्य तरी काय उरले? सरकारला प्रश्न विचारून चर्चेची  मागणी करीत सभापती किंवा अध्यक्षांच्या समोरील हौदात जाणाऱ्या विरोधी सदस्यांना धडाधड निलंबित करण्यात येत आहे. अशा पद्धतीने विरोधकांचा आवाज दाबून टाकणे ही कसली रीत? देशाला भेडसावणाऱ्या महत्त्वाच्या विषयावर संसदेच्या दोन्ही सभागृहांत धीरगंभीर चर्चा व्हायलाच हवी.

विरोधकांची मागणी मान्य किंवा अमान्य करण्याचा सरकारला पूर्ण अधिकार आहे. विरोधकांनी केलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर देण्याचा अधिकार या चर्चेत वापरून सरकारला आपली भूमिका स्पष्ट करता येते. रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार तसेच राजकीय संबंधावर गंभीर परिणाम झाले आहेत. युक्रेनने भारताशी राजनैतिक संबंध तोडून टाकले आहेत. भारतीय दूतावास बंद करायला भाग पाडले आहे. युरोपमध्ये हाहाकार माजवीत असलेल्या उष्णतेच्या लाटेने हवामान बदलाचे संकट किती निकट आले आहे, याची धोक्याची घंटा वाजवली आहे. या साऱ्या घटनांशी भारताचा काहीच संबंध नाही का? जरूर आहे. कधी नव्हे ते भारताची अन्नसुरक्षा धोक्यात येते की काय, अशी शंका घेण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताच्या शेजारील श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आदी देशांमधील परिस्थिती स्फोटक बनली आहे. तो त्या देशांच्या अंतर्गत प्रश्न असला तरी भारतीय उपखंडावर त्याचा परिणाम जरूर होणार आहे. त्या सर्वांची गंभीर नोंद घेत विरोधकांनी मांडलेल्या किंवा आग्रह धरलेल्या विषयावर सरकारने चर्चा घडवून आणली पाहिजे. येत्या १५ ऑगस्ट रोजी भारत अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. याच विषयावर दोन दिवसांचे स्वतंत्र कामकाजही निश्चित करून भारताच्या वाटचालीचा वेध, सद्य:स्थिती आणि भविष्यातील आव्हानांचा गांभीर्यपूर्वक विचार करायला हरकत नाही. संसदेच्या कामकाजाकडे गांभीर्याने पाहायचे नाही, असे सत्तारूढ पक्षानेच ठरविले तर संसदीय कामकाज निरर्थक ठरू शकते. विरोधकांची मागणी राजकीय आहे, असे सध्याची परिस्थिती पाहता वाटत नाही. ती जरी असली तरी सरकारला त्यावर कडाडून हल्ला चढविण्याचा अधिकार आहे. तो कोणी नाकारू शकत नाही. त्याऐवजी विरोधकांच्या निलंबनाचे सत्र  चालविणे अयोग्य आहे.

टॅग्स :ParliamentसंसदIndiaभारतMember of parliamentखासदार