शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

Editorial: संपादकीय: ज्याचे करावे बरे...; भारत नेहमी हाच अनुभव का घेतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 12:14 IST

पाकिस्तानचे जाऊ द्या; पण दुर्दैवाने, भूतानचा अपवाद वगळता, उर्वरित शेजारीही संधी मिळाली की भारतावर वार करण्यास मागेपुढे बघत नाहीत.

श्रीलंकेत अवघ्या पाच आठवड्यात दुसऱ्यांदा आणीबाणीची घोषणा झाली आहे. तसा तो देश गत तीन वर्षांपासून आर्थिक आणीबाणीचा सामना करीत होताच ! पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून विकासाच्या अपरिमित संधी उपलब्ध असलेल्या श्रीलंकेवर आज अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. तसा तो देश दुर्दैवीच !

जवळपास दीडशे वर्षे ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात घालवल्यावर श्रीलंकेला १९४८ मध्ये स्वातंत्र्य मिळाले खरे; पण अवघ्या ३५ वर्षांनीच तब्बल २७ वर्षे लांबलेल्या भीषण गृहयुद्धास सामोरे जावे लागले. त्यामधून सावरण्यास प्रारंभ होत नाही तोच अवघ्या एक दशकाच्या आत, अर्थव्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाला. श्रीलंकेवर आज अब्जावधी डॉलर्सचे कर्ज आहे. महागाई गगनाच्याही पलीकडे पोहोचली आहे. विदेशी चलन गंगाजळीत ठणठणाट आहे. भरीस भर म्हणून कोरोना महासाथीच्या परिणामी आर्थिक गाड्याचे चाक रुतून बसले आहे. त्यावर सरकारी गैरव्यवस्थापनाने कळस चढविला आहे. श्रीलंकेचे हे जे हाल सुरू आहेत, त्याला परिस्थितीपेक्षाही भ्रष्ट, स्वार्थी, अपरिपक्व, दूरदृष्टीचा अभाव असलेले राजकीय नेतृत्वच जास्त कारणीभूत आहे. त्याचे चटके मात्र निरपराध नागरिकांना सोसावे लागत आहेत. त्यामुळे जनता रस्त्यांवर उतरून आंदोलन करीत आहे. सध्या तरी आंदोलन बव्हंशी शांततामय मार्गाने सुरू आहे; मात्र जनतेत राष्ट्राध्यक्ष गोताबया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे या बंधूंबद्दल प्रचंड रोष आहे. इतर राजकीय नेत्यांना त्याची जाणीव झाल्याने त्यांनी राजपक्षे परिवाराच्या बुडत्या जहाजावरून पटापट उड्या घेतल्या आहेत. त्यामुळे २०२० मधील संसदीय निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळविलेला राजपक्षे बंधूंचा पक्ष अल्पमतात आला आहे. परिणामी आर्थिक संकटाच्या जोडीलाच राजकीय संकटही उभे ठाकले आहे.

श्रीलंकेला एकमेव भारताचा शेजार लाभला आहे. त्यामुळे कोणत्याही संकटाच्या स्थितीत तो देश भारताकडे मदतीच्या अपेक्षेने बघत असतो. आताही श्रीलंकेला भारताकडून भरीव मदतीची अपेक्षा आहे आणि भारतानेही आपल्या या चिमुकल्या शेजारी देशाला नाराज केलेले नाही. यावर्षी जानेवारीपासून एप्रिलपर्यंत भारताने श्रीलंकेला तब्बल २.४ अब्ज डॉलर्सची मदत केली आहे आणि यापुढेही वेळोवेळी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याबद्दल श्रीलंकन सरकारने भारताचे आभार मानले असले तरी, या मदतीमुळे श्रीलंकन जनतेत मात्र काहीशी नाराजी आहे. वस्तुतः भारताने केलेल्या मदतीमुळेच आज श्रीलंकेत चढ्या भावाने आणि अल्प प्रमाणात का होईना, पेट्रोल, डिझेल आणि अन्नधान्य उपलब्ध आहे. त्याबद्दल श्रीलंकन जनतेने भारताचे आभार मानायला हवे. भारतीय प्रसारमाध्यमांशी बोलताना श्रीलंकन नागरिक भारताबद्दल कृतज्ञता व्यक्त करतातही; पण श्रीलंकन प्रसारमाध्यमांमधील वृत्तांकनावर नजर टाकल्यास त्यांची नाराजीही लक्षात येते. त्यांच्या नाराजीचे कारण हे आहे की भारताने केलेल्या मदतीमुळे परिस्थिती निवळेल आणि त्यामुळे राजपक्षे बंधूंचा रोष कमी होऊन त्यांना राजकीय जीवदान मिळू शकेल, असे त्यांना वाटते! `ज्याचे करावे बरे, तो म्हणतो माझेच खरे!’ असा हा अनुभव भारताला जवळपास सर्वच शेजारी देशांच्या बाबतीत वारंवार येतो. भारत काही अमेरिका वा युरोपियन देशांप्रमाणे विकसित, श्रीमंत देश नाही. तरीदेखील भारत वेळोवेळी सर्वच शेजारी देशांना शक्य ती सर्व प्रकारची मदत करीत असतो. अगदी पाकिस्तानलाही नैसर्गिक आपत्तींच्या वेळी भारताने भरघोस मदत केली आहे.

पाकिस्तानचे जाऊ द्या; पण दुर्दैवाने, भूतानचा अपवाद वगळता, उर्वरित शेजारीही संधी मिळाली की भारतावर वार करण्यास मागेपुढे बघत नाहीत. अगदी चिमुकला मालदिवही त्या बाबतीत मागे नाही. संकट कोसळले की मदतीसाठी भारताकडे आशाळभूत नजरेने बघायचे आणि गरज सरताच चीनच्या कच्छपी लागून भारताच्या हितांना बाधा पोहोचवायची, असे वर्तन हे सगळे शेजारी देश करीत असतात. आज भारताकडून मदतीची आस लावून बसलेले राजपक्षे बंधू अवघ्या काही दिवसांपूर्वी चीनच्या बळावर भारताच्या कुरापती काढत होते, भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक असलेले प्रकल्प चीनी कंपन्यांना बहाल करीत होते. नेपाळचेही तेच सुरू आहे. मालदीव आणि बांगलादेशच्या यापूर्वीच्या सरकारांनीही भारताशी उघड वैर घेतले होते. या पार्श्वभूमीवर, भारताने शेजारी देशांना संकटांच्या वेळी मदत अवश्य करावी; पण ते भविष्यात `गरज सरो, वैद्य मरो’ अशी भूमिका स्वीकारणार नाहीत, असे बदलही आपल्या परराष्ट्र व्यवहार धोरणात करावेत !

टॅग्स :Sri Lankaश्रीलंका