शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

संपादकीय - लज्जास्पद, लांच्छनास्पद; मणीपूर घटनेचा देशभर संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 12:06 IST

मणिपूरमध्ये गत तीन महिन्यांपासून जे काही घडत आहे, ते देशाला संपूर्ण जगात मान खाली घालायला लावणारे आहे

ज्या देशाने कालपरवा चंद्राच्या संशोधनासाठी यान रवाना केले, जो देश येत्या पाच वर्षांत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून आहे, जो देश स्वातंत्र्याच्या शताब्दीत पदार्पण करताना विकसित देशांच्या रांगेत स्थान पटकाविण्याची अभिलाषा बाळगून आहे, त्या देशात असहाय्य महिलांना नग्नावस्थेत फिरविले जावे आणि त्या घटनेचे चित्रीकरण करून ते समाजमाध्यमांमध्ये प्रसारित केले जावे, यापेक्षा अधिक मोठी लज्जास्पद, लांच्छनास्पद गोष्ट दुसरी कोणतीच असू शकत नाही कळस हा की, मणिपूरमधील ही घटना मे महिन्यात घडली होती आणि आतापर्यंत पोलिसांना त्याचा थांगपत्ताही नव्हता! कदाचित असेलही, पण त्यांना अपराध्यांना पाठीशी घालायचे असेल. 

मणिपूरमध्ये गत तीन महिन्यांपासून जे काही घडत आहे, ते देशाला संपूर्ण जगात मान खाली घालायला लावणारे आहे आणि महिलांना नग्नावस्थेत फिरविण्याच्या घटनेने तर कळस गाठला गेला आहे. भारतीय संस्कृतीत नारीशक्तीची उपासना केली जाते, असे आपण मोठ्या अभिमानाने सांगत असतो. या देशात एका महिलेच्या अपमानावरून महाभारत घडले. परस्त्रीचा, ती परधर्मातील शत्रू पक्षातील असली, तरी आदर, सन्मान करायचा असतो, असा आदर्श घालून देणारा छत्रपती शिवरायांसारखा राजा याच देशात मध्ययुगात होऊन गेला आणि आज आधुनिक काळात मात्र या देशात महिलांना नग्नावस्थेत फिरविले जाते, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जातात! आम्ही प्रगतीच्या वाटेवर आहोत की अधोगतीच्या? विविधतेत एकतेची परंपरा सांगणाऱ्या आमच्या देशात हा जो किळसवाणा प्रकार घडला आहे, तो आमच्या सामूहिक विवेकाला मुळापासून हादरवणारा आहे. आज मणिपूर जळत असताना त्या राज्यात असा प्रकार घडला म्हणून त्याची जोरदार चर्चा होत आहे; पण उर्वरित देशाचे काय? 

देशाच्या कानाकोपऱ्यात महिलांवर अत्याचार झाला नाही, असा एकही दिवस उजाडत नाही. कोणत्याही दिवशी, देशातील कोणत्याही भागातील, कोणत्याही वर्तमानपत्रावर नजर टाका: छेडछाड, विनयभंग, बलात्काराची बातमी दिसणार नाही, असे होऊच शकत नाही। स्त्रीलाही भावना असतात. आवडनिवड असते, नकार देण्याचा अधिकार असतो, हे नरपिशाच्चांच्या गावीच नसते त्यांच्या दृष्टीने स्त्री म्हणजे केवळ उपभोग्य वस्तू! समाजमाध्यमांतून वाचा फुटल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मणिपूरमधील घटनेची दखल घेऊन राज्य व केंद्र सरकारला कडक भाषेत तंबी दिली आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दोषीविरुद्ध कारवाईसाठी केंद्र व राज्य सरकारला मुदत दिली आहे आणि त्या मुदतीत कारवाई न झाल्यास आम्हाला कारवाई करावी लागेल, असा स्पष्ट इशाराही दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ होण्यापूर्वी या विषयावर भाष्य केले आणि तीव्र दुःख व संताप व्यक्त केला. मणिपूरमध्ये त्या दुर्दैवी महिलांसोबत जे काही घडले ते संपूर्ण देशाला मान खाली घालायला लावणारे आणि अक्षम्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतानाच, एकाही दोषीला सोडणार नसल्याचा इशारा मोदी यांनी दिला. थेट पंतप्रधान आणि सरन्यायाधीशांनीच दखल घेतल्यामुळे मणिपूरमधील ढिम्म प्रशासन आता तरी हलेल आणि संपूर्ण प्रकरणाचा निःपक्ष तपास करून प्रत्येक अपराध्याला कठोरतम शिक्षा होण्याची काळजी घेईल, अशी अपेक्षा करावी का? अर्थात ती पूर्ण झाली तरी मूळ मुद्दे आपल्या जागी कायम असतीलच. 

मणिपूरमधील हिंसाचार आणि महिलांच्या विटंबनेत आनंद शोधण्याची विकृत मानसिकता, हे मूळ मुद्दे आहेत. मणिपूरमधील अविरत हिंसाचार अत्यंत काळजीत टाकणारा आहे. चिकन नेक'चा लचका तोडून संपूर्ण ईशान्य भारत घशात घालण्यासाठी चीनसारखा बलाढ्य देश टपून बसलेला असताना, त्या भागातील कोणतेही राज्य हिंसाचारग्रस्त आणि अस्थिर असणे भारताला परवडण्यासारखे नाही, पंतप्रधान मोदींनी सत्तेत येताच ईशान्य भारताला मुख्य प्रवाहात एकरूप करण्यासाठी प्रशंसनीय पुढाकार घेतला होता आणि त्याला चांगली फळेही येऊ लागली होती. दुर्दैवाने मणिपूरमधील हिंसाचाराने त्यावर पाणी फेरले जात आहे. त्यामुळे त्या राज्यातील आगडोंब विझविणे आणि मैतेथी व कुकी समुदायांतील दुरावा कमी करणे आत्यंतिक गरजेचे आहे. दुसरा मुद्दा केवळ मणिपूरपुरता मर्यादित नसून देशव्यापी आहे. त्यासाठी संपूर्ण देशाला एकदिलाने काम करून महिलांची विटंबना करण्यास धजावणारी प्रवृत्ती ठेचावी लागेल! 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारSocial Viralसोशल व्हायरल