शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

संपादकीय: अंगावर चिंध्या, डोईवर मुकुट... खरंतर मराठीच्या डोक्यावर मुकुट नव्हताच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 08:30 IST

भाषेची गंगा अशी घातल्या पाण्याने वाहात नाही. मुलांच्या संस्कारक्षम वयात, शाळा-विद्यालयांच्या स्तरावर, लोकसंस्कृतीच्या विविध रूपांमध्ये, रोजच्या लोकव्यवहारात वापर हा भाषेचा खरा आरसा असतो.

मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर परवा दिल्लीतील उ‌द्घाटन समारंभात म्हणाल्या की, 'आईच्या तोंडून पहिली ओवी बाळाने ऐकली तेव्हा मराठी भाषेचा जन्म झाला असेल.' हे ऐकून विज्ञान भवनात उपस्थितांचे चेहरे खुलले. टिपेच्या आवाजातील गवळणीची लडिवाळ लकेर कानावरून गेल्यासारखे वाटले. टाळ्यांचा कडकडाट झाला. ताराक्का आजीने बटव्यातील खडीसाखर हातावर ठेवल्यासारखे वाटले. पण, घरोघरी आता ना आजी-आजोबा राहिलेत, ना ते खारीक-खोबरे, ना खडीसाखर. नर्सरी-केजी, स्कूलमध्ये शिकणारी नातवंडे आजी-आजोबांजवळ नाहीत. आई-बापाचा नोकरीधंदा व स्वप्नांच्या पाठलागाने मुलांना आजी-आजोबांच्या रूपाने आपली समृद्ध, संपन्न, ऐतिहासिक मातृभाषा व तिच्याभोवती गुंफलेल्या संस्कृतीपासून दूर नेले आहे. एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे सोपवला जाणारा सांस्कृतिक संचिताचा प्रवाह संथावला आहे. त्याला गती देण्यासाठी मग सारस्वतांचा मेळा होतो, भाषा संवर्धनाच्या धीरगंभीर सरकारी घोषणा होतात, सरकारी कार्यालयांमध्ये मराठीची, दुकानांवर मराठी पाट्यांची सक्ती होते. एकूणच मराठीचे गोमटे करण्याचा आव आणला जातो. पण, हा सारा भास आहे.

भाषेची गंगा अशी घातल्या पाण्याने वाहात नाही. मुलांच्या संस्कारक्षम वयात, शाळा-विद्यालयांच्या स्तरावर, लोकसंस्कृतीच्या विविध रूपांमध्ये, रोजच्या लोकव्यवहारात वापर हा भाषेचा खरा आरसा असतो. या आरशाचा पारा सध्या निखळतो आहे. शाळांची अवस्था गंभीर आहे. शिक्षक हा सर्वाधिक उपेक्षित घटक बनला आहे. कमी पटसंख्येच्या शाळांविषयी ठोस धोरण नाही. शाळा बंद करण्याचे फर्मान अधूनमधून हटकून निघते. थोडा विरोध झाला की ते स्थगित होते. चिमुकल्या खांद्यांवर मराठीचे भविष्य पेलणाऱ्या बिच्चाऱ्या मुलांच्या शिक्षणावर सतत टांगती तलवार राहते. पायाच पोकळ राहतो व नंतर डगमगतो. सरकार मात्र कमकुवत पायावरील इमले सजवण्यात व्यस्त असते. संमेलने हा त्या सजावटीचा आवडता मार्ग आहे. कारण, तिथे सर्वांनाच मिरवता येते. त्यासाठी निधीची खैरात होते. असा निधी वाचन संस्कृतीच्या वाट्याला मात्र येत नाही. वाचनालये कळकटलेली राहतात. वाचनाची गोडी लावणारे मार्ग खडतर असतात. दुसरीकडे मराठी माणूसही भाषेबाबत उदासीन असतो. मोठ्या शहरांमध्ये दोन मराठी माणसेही एकमेकांशी हिंदी-इंग्रजीत बोलतात. खेड्यापाड्यात मराठी बोलली जाते. पण, ती प्रमाण मराठी नव्हे तर बोली असते आणि आपल्या व्यवस्थेने बोलीभाषा अजूनही उंबऱ्याच्या बाहेरच ठेवल्या आहेत.

कुसुमाग्रज म्हणाले होते, 'डोईवर सोनेरी मुकुट, परंतु अंगावर चिंध्या लेवून मराठी भाषा मंत्रालयासमोर कटोरा घेऊन उभी आहे.' तेव्हा खरंतर मराठीच्या डोक्यावर मुकुट नव्हता. कुसुमाग्रजांची ती कविकल्पना होती. कारण त्यांचे मातृभाषेवर जिवापाड प्रेम होते. आता अभिजात दर्जाच्या रूपाने मराठीच्या डोक्यावर खरा मुकुट चढवला गेला असला, तरी उपेक्षेच्या चिंध्या मात्र कायम आहेत. हिंदीचे अतिक्रमण व इंग्रजीचा पगडा आधी होताच. आता जग एक विशाल खेडे बनले आहे. स्थलांतर, प्रवास, विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती, व्यापार-उदीम व अर्थकारण आदी रूपाने चायनीज मँडरिन, स्पॅनिश आदी भाषांची अतिक्रमणे वाढली आहेत. असा भाषांचा संगम वाईटच असतो, असे नाही. त्यातील लाभही मोठे, तसे धोकेही. मराठीतून वैद्यक किंवा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा अतिरेकी आग्रह धरताना प्रचलित परिभाषांपासून विद्यार्थी वंचित राहू नयेत, त्यांच्यात न्यूनगंड यायला नको, याचे भान ठेवायला हवे. कारण, भाषा जवळ आल्या की आदानप्रदान होते. आपल्या भाषेत नवे शब्द येतात, स्थिरावतात. आपले काही शब्द अन्य भाषांमध्ये जातात आणि सगळ्याच भाषा अधिक समृद्ध बनतात. अशी समृद्ध भाषा म्हणजे मंदिराची उभारणी असते. मंदिराचा कळस लक्षवेधी असला, तरी महत्त्वाचा असतो तो पाया. पाया खचला तर कळसाचे अस्तित्व धोक्यात येते. त्याला बेगडी स्वरूप येते. भाषा ही संस्कृतीची वाहक असते. ती अशी बेगडी बनली की, तिच्यातील गोडवा, गांभीर्य, खोली-उंची, विविधता व गुणवत्ता कमी होते. समाजातील सुसंस्कृतपणा आणि चारचौघात बोलण्या-वागण्यातील शालिनता कमी होते. तोंडात ओवीऐवजी शिवी येते. मराठी भाषा गौरवदिनी याच चिंताजनक अवनतीच्या वळणावर सध्या मराठी उभी आहे.

टॅग्स :marathiमराठीakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ