शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

...तोपर्यंत तरी अपराध्यांना धाक वाटेल, अशा यंत्रणांशिवाय पर्याय नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 08:51 IST

उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन्ही राज्यांमधील पोलिसांचा त्यासंदर्भातील पूर्वेतिहास फारसा चांगला नाही. किंबहुना त्या दोन्ही राज्यांमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त असण्यामागे ते एक प्रमुख कारण आहे

बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यात मंगळवारी दोन मोटारसायकलींवरील चारजणांनी तब्बल ३० किलोमीटरपर्यंत अंदाधुंद गोळीबार करीत दहाजणांना जखमी केले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. बिहारमधील त्या घटनेला दोन दिवस होत नाहीत तोच, उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी जिल्ह्यातील एका गावात, अपराध्यांनी दोन दलित अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या केली आणि मृतदेह झाडाला लटकवले! काही महिन्यांपूर्वी त्याच लखीमपूर खीरी जिल्ह्यातील एका गावात, बेफाम वेगातील गाडीखाली चिरडून चार शेतकरी आणि एका पत्रकाराला जिवाला मुकावे लागले होते! लखीमपूर खीरी जिल्ह्यातील ताज्या घटनेत, अंगणात आईसोबत घरकाम करीत असलेल्या दोन मुलींना मोटारसायकलवरून आलेले तिघेजण बळजबरीने घेऊन गेले, त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला, त्यानंतर गळा आवळून त्यांची हत्या केली आणि आत्महत्येचा बनाव करण्यासाठी त्यांचे मृतदेह झाडाला लटकवले! शवविच्छेदन अहवालातून सामूहिक बलात्कार आणि गळा आवळून हत्या झाल्याची पुष्टी झाली आहे.

इयत्ता सातवी आणि दहावीच्या विद्यार्थिनी असलेल्या मुलींना अपराधी कसे घेऊन गेले, याबाबत मुलींचे पालक आणि पोलिसांचे म्हणणे भिन्न आहे. मुलींना बळजबरीने नेण्यात आल्याचा पालकांचा आरोप आहे, तर मुलींचे अपराध्यांशी आधीपासूनच संबंध होते व त्या मर्जीने त्यांच्यासोबत गेल्या होत्या; मात्र मुलींनी विवाहासाठी दबाव आणल्यामुळे पुढील घटनाक्रम घडला, असे पोलीस सांगत आहेत. पोलिसांच्या कथनात तथ्य असल्याचे घडीभर मानले तरी, त्यामुळे पुढील घटनाक्रम समर्थनीय कसा ठरवता येईल? मुळात मुली अल्पवयीन होत्या. त्यामुळे शरीरसंबंधांसाठी त्यांच्या सहमतीला कायद्यान्वये काहीच अर्थ नाही! दुसरी गोष्ट म्हणजे समजा मुलींनी विवाहासाठी गळ घातलीही असेल; पण म्हणून काय त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करून त्यांची हत्या करायची? त्यातच आता ज्या सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे, त्यापैकी चौघांच्या कुटुंबीयांनी ते घटनास्थळी नव्हतेच, असा दावा केला आहे. जर आमच्या मुलांनी असे काही कृत्य केले असतेच, तर ते घटनास्थळावरून फरार झाले असते, घरी कशाला आले असते, असा युक्तिवाद ते करीत आहेत.

थोडक्यात काय तर या अत्यंत नृशंस अपराधाबाबत आता तीन वेगवेगळे पैलू समोर येत आहेत. एक पीडितांच्या कुटुंबाचा, दुसरा आरोपींच्या कुटुंबांचा, तर तिसरा पोलिसांचा! त्यामुळे नेमके काय घडले हे कळायला सध्या तरी काहीच मार्ग नाही. पोलीस तपासात नेमके कोणते पुरावे समोर येतात, हे स्पष्ट झाल्यावरच प्रत्यक्षात काय घडले, यासंदर्भात ठामपणे भाष्य करता येईल. त्यासाठी अर्थातच पोलिसांना नि:पक्षपणे तपास करण्याचे कर्तव्य पार पाडावे लागेल. उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन्ही राज्यांमधील पोलिसांचा त्यासंदर्भातील पूर्वेतिहास फारसा चांगला नाही. किंबहुना त्या दोन्ही राज्यांमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त असण्यामागे ते एक प्रमुख कारण आहे. अर्थात, दोन्ही राज्यांमध्ये पोलिसांना काम करताना पुरेशी मोकळीक मिळत नाही, हेदेखील खरेच आहे. कारणे काहीही असली तरी त्या दोन्ही राज्यांची कायदा आणि सुव्यवस्था या आघाडीवरील कामगिरी पूर्वापार चिंताजनक अशीच राहिली आहे आणि अजूनही त्यामध्ये फारशी सुधारणा झाली नसल्याचेच बेगुसराय आणि लखीमपूर खीरीतील घटनांवरून अधोरेखित होते. दोन्ही राज्यांमध्ये आता विरोधकांनी त्या घटनांचे राजकीय भांडवल करणे सुरू केले आहे.

कायदा व सुव्यवस्था राखणे ही राज्य सरकारची जबाबदारी असली तरी, कायदा व सुव्यवस्थेला नख लावणाऱ्या प्रत्येकच घटनेसाठी त्या राज्याच्या मुख्यमंत्री अथवा गृहमंत्र्याला कसे जबाबदार धरता येईल? कायदा व सुव्यवस्थेच्या आघाडीवरील अपयशासाठी ते नक्कीच जबाबदार असतात; मात्र राज्यात घडलेला प्रत्येक अपराध जणू काही त्यांच्याच प्रेरणेने घडला, असे कसे म्हणता येईल? गंमत म्हणजे राजकीय पक्षांची सदनातील बाके बदलली, की त्यांच्या भूमिकाही बदलतात. निकोप लोकशाहीसाठी हे योग्य नव्हे! अपराधमुक्त समाजाची निर्मिती हेच राजकीय पक्षांचे उद्दिष्ट असायला हवे, मग ते सत्ताधारी बाकांवर असो वा विरोधी बाकांवर! दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करणारा, इतरांचे अधिकार व हक्क यांची कदर करणारा, नकार पचविण्याची क्षमता राखणारा समाज निर्माण करणे, हाच असे अपराध रोखण्यासाठीचा खरा उपाय आहे! अर्थात जोपर्यंत त्यात यश येत नाही, तोपर्यंत तरी अपराध्यांना धाक वाटेल, अशा यंत्रणांशिवाय पर्याय नाही!