शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

संपादकीय: वो सुबह जरूर आएगी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2020 06:32 IST

कोरोनाने व्यक्ती ते समष्टी असा जगण्याचा सगळा पट बदलून टाकला. दैनंदिनी, खाणेपिणे, आहार-विहार, सवयी, उपजीविका, इतकेच कशाला मानवी नातेसंबंध, कुटुंब, समाज वगैरेचा फेरविचार करायला लावला, हे अधिक महत्त्वाचे.

कोविड नावाच्या श्वास गुदमरून जीव घेणारा महाभयंकर विषाणू आढळल्याच्या, लागण झालेला पहिली व्यक्ती निष्पन्न झाल्याच्या घटनेला परवा, मंगळवारी एक वर्ष पूर्ण झाले. चीनमधील वुहान शहरात बाधित आढळलेली हुबेई प्रांतातील ती ५५ वर्षांची व्यक्ती ‘पेशंट झिरो’ असल्याचा दावा काहींना मान्य नाही हे खरे. पण, गेले वर्षभर पृथ्वीच्या पाठीवर प्रत्येकाने भीतीच्या छायेखाली एकेक दिवस वर्षासारखा कंठला असल्याने नोव्हेंबर की डिसेंबर महत्त्वाचे नाहीच. देश-प्रदेश, जात-धर्म, भाषा-संस्कृती असा कशाकशाचा भेदाभेद न मानणाऱ्या विषाणूच्या संक्रमणाने बेफिकीर होऊन हवेत उडणाऱ्या माणसांना एका झटक्यात जमिनीवर आणले.

व्यक्ती ते समष्टी असा जगण्याचा सगळा पट बदलून टाकला. दैनंदिनी, खाणेपिणे, आहार-विहार, सवयी, उपजीविका, इतकेच कशाला मानवी नातेसंबंध, कुटुंब, समाज वगैरेचा फेरविचार करायला लावला, हे अधिक महत्त्वाचे. चीनमधून निघालेला हा विषाणू साधारणपणे मार्चपर्यंत हळूहळू जगाच्या कानाकोपऱ्यात गेला. युरोप, अमेरिकेच्यासारख्या महासत्तांना त्याने झुकायला लावले. भारतासारख्या खंडप्राय, प्रचंड लोकसंख्येच्या देशाला त्याने धडा शिकवला. असह्य वेदना दिल्या. आजही त्यातून अनेकजण सावरलेले नाहीत. कोट्यवधी स्थलांतरित मजूर, बायाबापड्या व चिमुकल्यांची जीवघेणी पायपीट देशाने अनुभवली. कोट्यवधींच्या पोटापाण्याची साधने संकटात आली. उद्योग, व्यवसायाची घडी विस्कटली. अर्थव्यवस्थेला प्रचंड धक्का बसला. ती रुळावर आणण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न केल्यानंतर दसरा-दिवाळीच्या काळात काही चांगल्या गोष्टी घडताना दिसल्या तरी अजून खूप अंतर कापायचे आहे.

या वर्षभरात कोरोना विषाणू दंतकथा बनला. लॉकडाऊन, कन्टेन्मेंट, आयसोलेशन वगैरे शब्द परवलीचे बनले. आधी सांगितले गेले, चीनमधल्या वेट मार्केटमधून खरेदी केलेल्या वटवाघुळ किंवा अन्य कोणत्या तरी वन्यप्राण्यापासून हा विषाणू माणसाच्या शरीरात पोहोचला. नंतर त्यात जगाचे राजकारण आले. चीननेच हा विषाणू प्रयोगशाळेत मुद्दामच तयार केल्याचा आरोप झाला. आंतरराष्ट्रीय न्यायालयात चीनविरुद्ध खटला चालविण्याची भाषा वापरली गेली. अंतिमत: काही सिद्ध झालेले नाही. कदाचित देशोदेशींच्या सत्ताधाऱ्यांनी महामारीचा फैलाव रोखण्यातील अपयश लपविण्यासाठी ते केले असावे. अर्थात, राजकारणीच नव्हे तर रक्ताच्या नात्यातल्यांसह नानाविध स्वभावाचे लोक कसे वागले याचे चांगले-वाईट अनेक अनुभव प्रत्येकाच्याच गाठीशी असल्याने, ‘हे कोविड, तुझे रंग हजार’ म्हणायची वेळ आली.  

ही विषाणूविरोधातील लढाई अजून संपलेली नाही. त्यावर विजय मिळविण्याचा ध्यास मानवी समुदायाने घेतला आहेच. इस्रायली लेखक युवाल नोआ हरारी यांनी त्यांच्या होमो डिअस पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, भूक, युद्ध व रोगराई या तीन शत्रूंवर मिळवलेल्या विजयाचा मोठा वारसा मानवजातीला आहे आणि त्याचा मार्ग विज्ञानावरील विश्वासातूनच जातो. कोणी कितीही भाकडकथा सांगितल्या तरी महामारीवर मात करण्याचा मार्ग विज्ञानच असल्याचे प्रत्येकाला मनोमन कळून चुकले आहे. थोडक्यात यानिमित्ताने विज्ञानाची महती मानवी मनांवर ठसवली गेली. तरीही धोका कायम आहे. किंबहुना तो अधिक वाढला आहे. युरोपमध्ये दुसरी लाट भयावह स्थितीत पोहोचली आहे. अमेरिकेतही स्थिती गंभीर आहे. इकडे दिल्लीत तिसऱ्या लाटेचा प्रकोप सुरू आहे. विषाणूची भीती पाठीवर टाकून हातावर पोट असणारे लोक पुन्हा कामावर परतले आहेत. अनलॉक किंवा ‘मिशन बिगिन अगेन’ नावाने एकेक सार्वजनिक व्यवस्था खुली केली जात आहे. देवालये उघडली आहेत व ज्ञानालये उघडण्याची तयारी सुरू आहे. पण, हे करताना कमालीची दक्षता बाळगण्याची गरज आहे. एकमेकांपासून पुरेसे अंतर, मास्क व सॅनिटायझर हेच सध्या तरी या सावधगिरीचे उपाय आहेत.  कारण, संक्रमणाची ही आवर्तने सुरूच राहतील. डेंग्यू, स्वाइन फ्लू यांसारख्या विषाणूंप्रमाणे कोरोनासोबतही जगण्याची मानसिक तयारी सगळ्यांनी केली आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीसाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. महिनाभरात ती आली तरी सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी बरेच महिने लागतील. सध्या संसर्गाने अंधारलेल्या क्षितिजावर सूर्योदयापूर्वीचे झुंजुमुंजु झाले, इतकेच म्हणता येईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या