शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

Editorial: जी-२० : बोलाचाच भात...; मुख्य प्रश्नांवर भ्रमनिरास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 09:04 IST

या परिषदेच्या निमित्ताने भारत मात्र पुन्हा एकदा जागतिक मंचावर आपला प्रभाव पाडण्यात यशस्वी झाला. जागतिक तापमानवाढीस आळा घालण्यासाठी शाश्वत उपभोग व उत्पादन हे कळीचे मुद्दे असल्याचे जी-२० गटाने प्रथमच मान्य केले आहे. हा भारताच्या भूमिकेचा मोठा विजय आहे.

`ग्रुप ऑफ ट्वेंटी’ म्हणजेच जी-२० गटाच्या सोळाव्या शिखर परिषदेचे रविवारी रोममध्ये सूप वाजले. कोविडचा संसर्ग बऱ्यापैकी ओसरल्यामुळे या वर्षीची परिषद जागतिक नेत्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पार पडली. प्रभावशाली देशांच्या नेत्यांना दोन वर्षांच्या कालखंडानंतर समोरासमोर बसून संवाद साधता येणार असल्यामुळे, तापमानवाढ, जागतिक अर्थव्यवस्थेवर कोविडमुळे पडलेला प्रतिकूल प्रभाव, कोविड लसीकरण, अफगाणिस्तानातील संकट, तसेच इतर जागतिक समस्यांवर ठोस घोषणा होतील, अशी अपेक्षा बाळगणाऱ्यांचा मात्र भ्रमनिरासच झाला.

चर्चा सर्वच विषयांवर झाली; पण ठोस फलनिष्पत्ती काहीच नाही! विशेषतः जागतिक तापमानवाढ रोखण्याच्या मुद्यावर परिषदेत जी कथित एकवाक्यता झाली, ती पुरेशी नसल्याचा सूर जगभरातून उमटत आहे. संयुक्त राष्ट्रांचे सचिव अन्तोनिओ गुटेरस यांनीही त्यांची निराशा व्यक्त केली आहे. जी-२० शिखर परिषदेत सहभागी झालेले सर्वच जागतिक नेते आता ब्रिटनमधील ग्लासगो शहरात आयोजित सीओपी २६ या हवामान बदलांवरील परिषदेत सहभागी होणार आहेत. जागतिक तापमानवाढ आणि त्यावरील उपाययोजना या विषयावर प्रामुख्याने ग्लासगोमध्ये वाटाघाटी अपेक्षित असल्या तरी, रोममध्ये या विषयावर जी काही चर्चा झाली, त्यावरून जागतिक नेते या विषयासंदर्भात फार गंभीर असल्याचे दिसले नाही. त्यामुळे ग्लासगो परिषदेतूनही फार काही सध्या होण्याची अपेक्षा नाही. जागतिक तापमानवाढीस कारणीभूत ठरणाऱ्या वायूंच्या उत्सर्जनात लक्षणीय कपात आणि कोळशाचा वापर कमी करीत नेणे, या दोन प्रमुख मुद्यांवर जी-२० नेत्यांचे एकमत होऊ शकले नाही. विशेषतः कोळशाचा वापर कमी करण्याच्या आग्रहास भारत आणि चीनने ठाम विरोध केला. या मुद्यावर भारत व चीनची भूमिका सारखी दिसली असली तरी, हवामानविषयक उद्दिष्टे साध्य करण्याच्या भारताच्या मार्गात आण्विक पुरवठादार देशांचा गट म्हणजेच एनएसजीमधील भारताच्या प्रवेशास विरोध हा प्रमुख अडथळा असल्याचे ठामपणे सांगून भारताने चीनवर अप्रत्यक्ष शरसंधानही केले; कारण एकट्या चीनच्या विरोधामुळेच भारताचा एनएसजीमधील प्रवेश लांबला आहे.

जागतिक तापमानवाढ दीड अंश सेल्सिअसवर रोखण्यासंदर्भात ठोस बांधिलकी व्यक्त न करणे, हे रोम शिखर परिषदेचे सर्वात मोठे अपयश संबोधले पाहिजे. या मुद्यावर विकसित आणि विकसनशील देश एकमेकांच्या विरोधात असून, जोपर्यंत दोन्ही बाजूंनी देशहिताच्या तुलनेत जागतिक हितास प्राधान्य देण्याची भूमिका घेतली जात नाही, तोपर्यंत या मुद्यावर एकवाक्यता होणे अशक्यप्राय आहे.  कोविडोत्तर जगातील आव्हानांच्या मुकाबल्यासाठी जो प्रतिसाद जी-२० मध्ये सहभागी देशांकडून उर्वरित जगाला अपेक्षित होता, तो देण्यातही जी-२० गटाचे नेते अपयशी ठरले. विशेषतः कोविड लसीकरणाच्या मुद्यावर जी-२० गटाने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. जोपर्यंत जगातील प्रत्येक देशात कोविड लसीकरणास गती येणार नाही, तोपर्यंत कोणताही देश कोविडपासून सुरक्षित राहू शकत नाही, हे जी-२० देशांनी समजून घेण्याची गरज आहे. जागतिकीकरणाच्या या कालखंडात एखाद्या देशाने शंभर टक्के लसीकरण साध्य केले तरी ते पुरेसे ठरणार नाही; कारण जगाच्या कोणत्या कोपऱ्यातून त्या देशात कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा शिरकाव होईल, हे कुणीही सांगू शकत नाही. संपूर्ण जगाचे लसीकरण हाच त्यावरील उपाय आहे आणि त्यासाठी आघाडीच्या देशांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे; कारण बहुतांश देशांकडे ना त्यासाठीचे ज्ञान व तंत्रज्ञान आहे, ना आवश्यक ती संसाधने व पैसा! दुर्दैवाने या मुद्यावरही रोममधून उत्साहवर्धक बातमी मिळाली नाही. त्यामुळे बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी, असेच रोम जी-२० शिखर परिषदेचे वर्णन करावे लागेल.

या परिषदेच्या निमित्ताने भारत मात्र पुन्हा एकदा जागतिक मंचावर आपला प्रभाव पाडण्यात यशस्वी झाला. जागतिक तापमानवाढीस आळा घालण्यासाठी शाश्वत उपभोग व उत्पादन हे कळीचे मुद्दे असल्याचे जी-२० गटाने प्रथमच मान्य केले आहे. हा भारताच्या भूमिकेचा मोठा विजय आहे. अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासंदर्भात जी-२० देशांकडून आश्वासन मिळविण्यातही भारत यशस्वी झाला आहे. हेदेखील भारताचे मोठे यश आहे. त्याशिवाय जी-२० गटाच्या इतिहासात प्रथमच भारताला शिखर परिषदेच्या यजमान पदाचा बहुमान प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे रोम जी-२० परिषद भारताच्या दृष्टीने यशस्वी, पण जगाच्या दृष्टीने अपुरी, असे म्हटल्यास वावगे ठरू नये!