शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

सणासुदीत प्रशासनाचे हात केळी खायला जातात?

By विजय दर्डा | Updated: October 14, 2024 07:35 IST

सण-उत्सवांच्या काळात रस्त्यांवरून रुग्णवाहिकाही जाऊ शकत नाही. इतक्या बेजबाबदार अतिक्रमणांची परवानगी कोण आणि का देते?

डाॅ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

छोटे छोटे प्रादेशिक उत्सव वगळले तरीदेखील आपण भारतवासी दरवर्षी ३० पेक्षा जास्त उत्सव साजरे करतो हे कधी तुमच्या लक्षात आले आहे काय? जगातल्या कुठल्याच देशात इतके उत्सव साजरे केले जात नाहीत. हे उत्सव आपल्याला एका धाग्याने बांधून ठेवण्यात निश्चितच मोठी भूमिका बजावतात; आणि आपले जीवन सुखी समाधानी करतात. उत्सवातील उत्साह, त्यामागची आपली परंपरा आणि रीतिरिवाज रोजच्या जगण्यात रंग भरतात, हे खरेच आहे.

उत्सवाच्या रंगात रंगून जाण्याचा वारसा मलाही मिळाला आहे. मी प्रत्येक धर्माचा उत्सव पूर्ण श्रद्धेने साजरा करतो. कारण उत्सवातील सामाजिकता देश मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते असा माझा विश्वास आहे. परंतु यावर्षी माझ्या यवतमाळमध्ये जे काही अनुभवले, त्यामुळे मी अस्वस्थ आहे.  हा केवळ यवतमाळचा प्रश्न नाही, तर जिथे जिथे प्रशासनाच्या अकार्यक्षमेमुळे सर्वसामान्य माणसांना त्रास सोसावा लागतो, त्या प्रत्येक ठिकाणचा हा प्रश्न आहे. नवरात्राच्या पवित्र अशा पर्वकाळात रस्त्यांवर ज्या प्रकारे अतिक्रमण केले गेले होते, ते पाहून मला वाटले, प्रशासन काय करते आहे?  रस्त्यावर चालायला जागा नव्हती. एका रुग्णवाहिकेलाही वळून लांबच्या रस्त्याने जावे लागले हे मी पाहिले. इस्पितळात पोहोचायला झालेल्या उशिरामुळे त्या रुग्णाचे काय हाल झाले असतील याचा विचार कोणी केला का?

नवरात्रीच्या याच दिवसात मी गरब्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अहमदाबादमध्ये होतो; याच काळात मी मुंबई आणि नागपूरलाही होतो. रस्ते वाहतुकीसाठी संपूर्णपणे खुले असलेले मी पाहिले. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईची व्यवस्था मी दरवर्षी पाहत आलो. एकही रस्ता बंद होत नाही. लाखोंच्या संख्येने लोक उल्हसित होऊन रस्त्यावर उतरतात. चौपाटीवर जमतात. पोलिस त्यांच्या उत्साहात दुपटीने भर घालतात. परंतु वाहतुकीचे नियोजन अशा पद्धतीने केले जाते की कोणाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये. उत्सवांच्या काळात मुंबई आणि नागपूरमध्ये वाहतुकीची व्यवस्था ठीकठाक होऊ शकते, तर यवतमाळसारख्या छोट्या शहरात ती तशी का होऊ नये?

उत्सव उत्साहात साजरे केलेच पाहिजेत, हे माझे मत आहे. गुजरातमध्ये सुरू झालेला अंबेची आराधना करणारा गरबा दांडिया आता संपूर्ण देशात खेळला जातो. जाती-धर्माची रिंगणे तोडून लोक दांडिया रास खेळायला जातात. सगळीकडे भक्तीचा अथांग सागर नजरेस पडतो. धर्म आणि जातीचा कुठलाच भेदभाव नाही. गरब्याच्या मंडपात उभा भारत एका धाग्याने बांधलेला दिसतो हा शुभसंकेत होय. हे सगळे आयोजित करताना कुठल्याही रस्त्यावर कोणाला त्रास होऊ नये याची काळजी घ्यायला हवी की नको? कोणाला त्रास व्हावा असे वागायला आपल्या देवीदेवता आपल्याला शिकवत नाहीत. 

यवतमाळमध्ये मी जे पाहिले आणि अन्यत्र लोकांना जो अनुभव येत आहे तो चिंतेचा विषय होय.  न्यायालयांनी पुढाकार घेऊन या विषयावर खटला दाखल करून घेतला पाहिजे. ज्यांनी नियम धाब्यावर बसवण्याचा खोडसाळपणा केला असेल, त्यांच्यावरच नव्हे तर मुख्यत्वेकरून प्रशासनावर खटला दाखल केला पाहिजे. त्यांनी परवानगी दिली कशी? लोकांना त्रास होतो आहे, हे दिसत असताना प्रशासनाने कोणतीच कारवाई का केली नाही? याचा अर्थ प्रशासनावर काही दबाव होता, असा घ्यावा काय? 

माझा प्रश्न गजाननाला आहे, अंबामातेला आहे, न्यायदेवतेलाही आहे - आम्ही आपली आराधना करतो, उपवास करतो; परंतु लोकांना त्रास होऊ नये हे आमच्या लक्षात कसे येत नाही?  आपण जिची भक्ती करतो, त्या देवतेला तरी आपल्यामुळे कमीपणा येऊ नये, हेही समजेनासे झाले आहे का? 

हा सगळा आपल्या व्यवस्थेने माजवलेल्या अराजकाच्या व्यवहाराचा परिणाम आहे. या उत्सवी वातावरणात प्रत्येक ठिकाणी मोठमोठी होर्डिंग्ज लटकावलेली दिसतात. जो उठतो, तो होर्डिंग लावत सुटतो, असे चित्र आहे. याबाबत न्यायालयाने दिलेले आदेश सरळसरळ धुडकावले जातात. ज्यांचे फोटो या होर्डिंगवर झळकत असतात त्यांच्यावर कारवाई का होत नाही? किंवा ज्या कंपन्या अशा प्रकारची होर्डिंग प्रायोजित करतात त्यांचा गळा का धरला जात नाही? उत्सवी गजबजाटात प्रशासनाचे हात केळी खायला जातात का?

आता दिवाळी येते आहे. उत्सवप्रियता तर आपल्या भारतीयांच्या रक्तातच असून ती आपली  ओळखही आहे. सर्व धर्मांच्या लोकांनी एकत्र येऊन उल्हसित व्हावे, खूप नाचावे, गावे, खावे, डीजे वाजवावा, फटाके फोडावेत परंतु फटाक्यांनी किंवा डीजेमुळे कुणाचे कान फुटणार नाहीत, याची काळजी मात्र जरूर घ्यावी.

माझा हा स्तंभ वाचून राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांसारखे वरिष्ठ अधिकारी या गंभीर  मुद्द्याकडे लक्ष देतील अशी मला अपेक्षा आहे. 

टॅग्स :Policeपोलिसhospitalहॉस्पिटल