शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

शंकांच्या समाधानातूनच असंतोष होईल दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 02:58 IST

लोकशाहीत विरोधाचा हक्क, पण हिंसाचार व बलप्रयोग निषिद्ध

विजय दर्डा

देशाला विश्वासात घेतले नाही, समजावून सांगितले नाही व विश्वासाचे वातावरण तयार केले नाही तर काय होते ते सध्या आपण पाहत आहोत. सुधारित नागरिकत्व कायद्यावरून संशयाचे वातावरण तयार झाले. पाहता पाहता संपूर्ण देशात आगडोंब उसळला. देशाच्या अनेक भागांत हिंसक आंदोलन सुरू आहे. ही आग आणखी किती पसरेल हे सांगणे कठीण आहे. पोलीस व निदर्शकांतील संघर्षात अनेकांनी जीव गमावले आहेत.

मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो ती ही की, प्रत्येक समस्येवर महात्मा गांधींच्या विचारांच्या मार्गाने तोडगा निघायला हवा, असे मला ठामपणे वाटते. कोणत्याही स्वरूपाच्या हिंसाचाराला माझा विरोध आहे. लोकशाहीने आपल्याला आपले म्हणणे मांडण्याचा, विरोध करण्याचा व शांततापूर्ण मार्गाने निषेध-निदर्शने करण्याचा हक्क दिला आहे. परंतु या निषेध-निदर्शनांमध्ये हिंसाचाराला बिलकूल थारा असता कामा नये. त्यामुळे बस जाळणारे, दगडफेक करणारे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणारे; तसेच पोलिसांनी एखाद्या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विनाअनुमती घुसून लायब्ररीत विद्यार्थ्यांवर लाठीमार करणे व अश्रुधूर सोडणे हाही माझ्या लेखी गुन्हाच आहे.दुसरीकडे आपल्यापुढे मुंबईचे उदाहरण आहे. मुंबईतही मोठी निदर्शने झाली, पण पोलिसांनी परिस्थिती संयमाने व खुबीने हाताळली. निदर्शनांत हजारो लोक होते, पण कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याबद्दल मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे व सहपोलीस आयुक्त विनय चौबे यांचे नक्कीच कौतुक करायला हवे.

मुळात विरोधाच्या या ज्वाळा भडकल्याच का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. मला असे वाटते की, हा सुधारित नागरिकत्व कायदा म्हणजे नेमके काय आहे व ‘एनआरसी’ ही काय भानगड आहे याची नक्की माहिती समाजातील सुशिक्षित वर्गातही फारच थोड्या लोकांना असेल. जेव्हा योग्य माहिती नसते तेव्हा लोक सांगोवांगी गोष्टींवर विश्वास ठेवतात व रस्त्यावर उतरतात. म्हणूनच हा संशय दूर करण्याची जबाबदारी सरकारची आहे. या सुधारित कायद्याला विरोध होईल, याची सरकारला आधीपासून कल्पना असणार. त्यामुळे यासाठी सरकारने पूर्वतयारी करायला हवी होती. विरोधी पक्षांनाही सोबत घ्यायला हवे होते. सरकार हे सर्व अजूनही करू शकते, असे मला वाटते. भारतातील मुस्लिमांनी चिंतित होण्याची गरज नाही आणि २०१४ नंतर एनआरसीवर कोणतीही चर्चा झालेली नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितले याचा मला आनंद आहे.

विरोधक लोकांना चिथावणी देत आहेत, असा आरोप करून भागणार नाही. निषेध, निदर्शने, आंदोलनांत राजकीय पक्ष असणारच. कधी भाजप, कधी काँग्रेस, कधी डावे पक्ष तर कधी प्रादेशिक पक्ष विविध प्रश्नांवर आंदोलने करतात. लोकशाहीत हे स्वाभाविकही आहे. बोलणे, लिहिणे व एखाद्या गोष्टीची दुसरी बाजू लोकांपुढे मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. निषेध-निदर्शनांकडे याच दृष्टीने पाहत सत्ताधाऱ्यांनी संयम राखायला हवा. अफगाणिस्तानात अल्पसंख्य हिंदूंवर अत्याचार होतात हे आपल्याला उघडपणे सांगावे लागावे हीच मोठी विडंबना आहे. अफगाणिस्तान हे आपले ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ आहे. दरवर्षी आपण तेथे तीन अब्ज डॉलर खर्च करतो. एकीकडे त्या देशाला मित्र म्हणायचे व दुसरीकडे असे आरोप करून दुखवायचे, हे नक्कीच मुत्सद्दीपणाचे नाही. बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए.के. अब्दुल मोमेन व गृहमंत्री असदु्ज्जमा खान यांनी अशाच आरोपांमुळे भारताचा नियोजित दौरा रद्द करावा आणि आमचे नागरिक तुमच्या देशात असतील तर त्यांना आमच्याकडे परत पाठवा, असे उपरोधाने सांगणे भारताला शोभणारे नाही.

अयोध्येत राम मंदिर, अनुच्छेद ३७० रद्द करणे, तिहेरी तलाक रद्द करणे, समान नागरी कायदा, सर्व घुसखोरांना देशाबाहेर हाकलणे, लोकसंख्येवर नियंत्रण हे सर्व मुद्दे भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात होते. त्यातून त्यांना भरघोस मते मिळाली. पण सरकारने वादग्रस्त मुद्यांपेक्षा आधी जनतेच्या सुख-दु:खाची काळजी करायला हवी. देशाची आर्थिक स्थिती सुधारण्याची, पंतप्रधानांचे ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न साकार होण्यासाठी उद्योगांना सावरण्याची गरज आहे. रोजगार-प्रत्येक हाताला काम मिळेल व प्रत्येकाला पोटभर अन्न देण्यास अग्रक्रम हवा. काँग्रेसने त्यांच्या शासनकाळात अन्नसुरक्षा, शिक्षणहक्क व माहिती अधिकारासाठी कायदे केले तसे या सरकारने उत्तरदायित्व कायदा करावा. त्यातून प्रत्येक सरकारी विभागाची, अधिकाºयाची जबाबदारी निश्चित होईल व कामे लवकर मार्गी लागतील.भारतात ८० टक्के हिंदूंसोबत २० टक्के अन्य धर्मांचे अल्पसंख्य समाजही आहेत, हे विसरून चालणार नाही. हिंदू संख्येने जास्त असले तरी राज्यघटनेने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. घटनाकारांत सर्व वर्गांचे व सर्व विचारधारांचे लोक होते. ते सर्व विद्वान होते. त्यांनी विचारमंथनातून जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना आपल्याला दिली. काहीही झाले तरी या राज्यघटनेचे रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.

(लेखक लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आहेत)