शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

विवाहसंस्थेतील पुरुषी दादागिरी ते समानतेची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 06:36 IST

लैंगिकतेशी जोडलेले मानसशास्त्र हा त्यांच्या लेखनाचा मुख्य विषय असूनही त्यांनी त्या काळात समलिंगी संबंध, तृतीयपंथीयांचे प्रश्न यासारखे अनेक विषय हाताळले.

- डॉ. अनघा शैलेश राणे । इतिहासाच्या अभ्यासकविवाहसंस्थेतील व्यक्तीसह समाजाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची चिकित्सा करणाऱ्या रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या आजच्या जयंतीनिमित्त पुन्हा चर्चेत येतोय तो विवाहसंस्थेचा, त्यातील स्त्रीच्या स्वातंत्र्याचा मुद्दा. सध्या समाजात मोकळेपणा असला, तरी स्त्री-पुरुष संबंधांवर खुलेपणाने चर्चा होत नाही, पण त्या काळी सनातन्यांचा विरोध पत्करून ‘समाजस्वास्थ्य’सारखे नियतकालिक चालवण्याचे धाडस त्यांनी २६ वर्षांहून अधिक काळ केले. कर्वे केवळ स्त्री स्वातंत्र्यवादी नव्हते, तर व्यक्तिस्वातंत्र्यवादी होते. कुटुंबव्यवस्थेतील विवाहित स्त्रीची घुसमट त्यांना मान्य नव्हती.

ते लिहितात, ‘स्त्री-पुरुष संबंध हा दोन माणसांचा खासगी व्यवहार आहे आणि तो चव्हाट्यावर आणण्याचे काहीच कारण नाही. पण विवाहसंस्थेमुळे तो चव्हाट्यावर येतो.’ मनाविरुद्ध, विषम विवाहात त्या काळी स्त्रियांचा होणारा कोंडमारा समाजस्वास्थ्यामधील खासगी पत्रव्यवहारातून, शारदेच्या पत्रातून त्यांना जाणवे. म्हणूनच त्यांनी ‘आजची विवाहसंस्था म्हणजे उंदरांचा सापळा आहे, त्यात शिरणे सोपे पण बाहेर पडणे अवघड आहे,’ असे परखड भाष्य केले होते. विवाहसंस्था नाकारण्याऐवजी त्यातील दोष, पुरुषांची दादागिरी दूर करून समानतेच्या नात्यावर त्याचा स्वीकार व्हावा, हा आग्रह त्यांनी धरला.

कर्वे विवाहसंस्थेवर हल्ला करीत असले तरीही मुलांच्या पालनपोषणासाठी कुटुंबाची गरज त्यांनी मान्य केली होती. आदर्श विवाह पद्धतीत कर्वेना व्यक्तिस्वातंत्र्य अपेक्षित होते. त्यांच्या मते कोणत्याही दोन व्यक्तीस एकत्र बांधून ठेवण्याचा समाजाला हक्क नाही. कोणत्याही स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध एखाद्या मनुष्याशी मग तो तिचा नवरा का असेना शरीरसंबंध ठेवायला लावणे म्हणजे तिला शरीरविक्रय करणाºया महिलेपेक्षाही कमी लेखणे. कारण शरीरविक्रय करणाºया महिलेला त्याबाबत स्वातंत्र्य असते. परंतु विवाहाने परस्परांवर किंवा निदान परस्परांच्या शरीराच्या काही भागांवर मालकी हक्क उत्पन्न होतो, हेही त्यांनी अमान्य केले.

अतिरिक्त संततीमुळे कुटुंबाचे, राष्ट्राचे नुकसान होतेच, शिवाय स्त्रीच्या शरीराची न भरून येणारी हानी होते, यावर ते परखड भूमिका घेत. ज्या काळी मुले ही परमेश्वराची देणगी समजली जाई, त्या काळी सनातन्याचा प्रखर विरोध सहन करत अनेक आर्थिक आणि सामाजिक समस्यांना तोंड देत कर्वे यांनी संततिनियमनाचे कार्य केले. पत्नी मालतीबार्इंसमवेत त्यांनी राइट एजन्सीच्या माध्यमातून संततिनियमनाची साधने अल्पदरात विकली. त्यांचा वापर शिकवला. संततीबाबत कोणत्याही धर्माचा पगडा त्यांना मान्य नव्हता. त्या काळातील कुटुंबातील भांडणाच्या कारणांचा वेध घेताना त्यांनी गरिबी व मुलांचा मारा, हे कलहाचे कारण असल्यावर बोट ठेवले. यासाठी त्यांनी अनेक परदेशी साहित्यही अनुवादित करून प्रसिद्ध केले. त्यासाठी साधी-सोपी भाषा वापरली. अनेक नव्या शब्दांची रचना केली. त्यामुळेच त्यांचे लेखन कधी नीरस, कंटाळवाणे झाले नाही. एखादे नियतकालिक प्रसिद्ध केल्यावर त्याच्या वर्गणीचा हिशेब देण्याची शिस्त त्यांनी पाळली. तत्कालीन अनेक सामाजिक प्रश्नांचा ऊहापोह त्यांनी केला.

लैंगिकतेशी जोडलेले मानसशास्त्र हा त्यांच्या लेखनाचा मुख्य विषय असूनही त्यांनी त्या काळात समलिंगी संबंध, तृतीयपंथीयांचे प्रश्न यासारखे अनेक विषय हाताळले. सुशिक्षित स्त्री जेव्हा आर्थिक आत्मनिर्भर बनेल, तेव्हाच लैंगिक व्यवहार बदलतील, ही त्यांची भूमिका आताच्या काळात अनेकांना पटते, यातच त्यांच्या विचारांचे द्रष्टेपण सामावलेले आहे.