खिशात दमडी नसेल तरी चालेल, पत असायला हवी. मग, घरात अन्नाचा दाणा नसला तरी चारचाकी घेऊ शकता तुम्ही. यासाठी अनेक योजना घेऊन बँका तुमच्या घराशी लोळण घेऊ शकतात. साधी शिपायाची नोकरी तुम्हाला चांगली पत मिळवून देऊ शकते. शेतकऱ्यांच्या नशिबी मात्र हे सुख नाही. हजार-दोन हजारांच्या कर्जासाठी सात-बारा जमा करुनही कर्जासाठी उंबरठे झिजवावे लागतात त्या बिचाऱ्याला. बँकांना सात-बारा नव्हे तर पे-स्लीप लागते. शेतकऱ्यांनी ती आणायची कोठून?सलग चार वर्षांपासून दुष्काळ मराठवाड्याची पाठ सोडत नाही. दरवर्षी खाण्यापुरती ज्वारी तरी निघायची. यंदा तीही नाही. अनेक शेतकऱ्यांना हायब्रिड विकत घेऊन पोट भरावे लागेल. ते विकत कसे घ्यायचे, त्यासाठी पैसा कोठून आणायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न. कारण, पोट भरण्यासाठी म्हणजे भाकरीसाठी कुठलीही बँक कर्ज देत नाही. त्यातल्या त्यात शेतकऱ्यांना तर दारातही उभे केले जात नाही. शेतकऱ्यांचा हा भाकरीसाठीचा भोग आठवण्याला एक निमित्त आहे. गेल्या आठवड्यात औरंगाबादेत ‘रोटी बँके’ची स्थापना झाली. कुठलीही पत न पाहता ही बँक तुम्हाला भाजी-भाकरी देते. हारुण मुकाती इस्लामिक सेंटरचे संस्थापक युसूफ मुकाती यांनी ही बँक सुरू केली आहे. गेल्या वर्षभरापासून ते या सेंटरमार्फत महिलांना रोजगाराचे प्रशिक्षण देतात. संगणकापासून ते मेहंदीपर्यंतचे विनामूल्य प्रशिक्षण येथे दिले जाते. सर्व जाती-धर्मातील जवळपास दहा हजार महिलांना त्यांनी स्वत:च्या पायावर उभे केले आहे. स्मार्ट सिटीच्या वाटेवर असलेल्या औरंगाबाद शहरात अनेक लोकांच्या नशिबी दोन वेळची भाकरीही नाही. भिकारी भीक मागून पोट भरतील. मध्यमवर्गीयांना तीही मागता येत नाही. दोन वेळच्या भाकरीसाठीचा हा भोग युसूफभार्इंना स्वस्थ बसू देत नव्हता. उत्तर प्रदेशातल्या कुठल्या तरी शहरात ‘रोटी बँके’ची बातमी त्यांनी एका वृत्तवाहिनीवर पाहिली आणि भुकेल्या औरंगाबादकरांची पोट भरण्याची सोय झाली. शहरात एकीकडे रिकाम्या पोटी झोपणाऱ्यांची संख्या मोठी असली तरी शिल्लक अन्न वाया घालविणाऱ्यांची संख्याही कमी नाही. शिल्लक राहिलेले हे चांगले अन्न त्यांनी एका पाकिटात घालून या बँकेत आणून जमा करावे, असे आवाहन युसूफभार्इंनी केले. पाहाता-पाहाता २५० अन्नदात्यांनी नोंदणी केली. सध्या औरंगाबादेत सकाळ-संध्याकाळ अशी २५० पाकिटे दररोज जमा होतात. बँकेतील एका फ्रिजरमध्ये हे अन्न ठेवले जाते. एकावेळी ७५० पाकिटे बसतील, एवढे मोठे फ्रिज बनवून घेण्यात आले आहे. चांगलेच अन्न घेण्याची आणि देण्याची काळजी या बँकेत घेतली जाते. सकाळी ११ ते रात्री ८.३० पर्यंत ही बँक सुरू राहते. यासाठी एक कर्मचारीही नेमला आहे. रात्री आठनंतर बँकेत एकही पाकिट शिल्लक राहत नाही. त्यानंतरही रिकामे पोट घेऊन येणारे अनेक असतात. पण त्यासाठी पाकिट राहात नाही. श्रीमंत माणसाला दोन भाकरी आणि भाजीचे पाकिट जड नाही. पण ते देण्याची श्रीमंती असावी लागते. सध्या औरंगाबादेत अशी श्रीमंती केवळ २५० जणांकडेच दिसते. महिनाभरात अन्नदात्यांची ही संख्या सातशेवर जाईल, असा दावा युसूफभाई करतात. दररोज ही अडीचशे पाकिटे घेऊन जाणारे कोण? यातले केवळ २० टक्के भिकारी असतात. म्हणजे उर्वरित ८० टक्के लोक ही बँक सुरू होण्याआधी दररोज उपाशीपोटी झोपत असणार. कारण त्यांना आपला समाज भीकही मागू देत नाही. औरंगाबादेत सोय झाली. राज्यातील इतर शहरांचे काय? खेडेगावात राहणाऱ्या शेतकऱ्यांचे काय? महासत्ता, स्मार्ट सिटी, विदेशी गुंतवणूक असे मोठमोठे शब्द वापरुन आम्ही भले विकासाची हवा निर्माण करत असू. मात्र, आमची खरी लढाई आहे ती पोट भरण्याची. ही लढाई लढण्यासाठी प्रत्येक शहरात अशी बँक सुरू व्हायला हवी. ती जबाबदारी कोणाची? अर्थात, दोनवेळा पोटभर जेवण करुन ढेकर देणाऱ्या प्रत्येकाची. - गजानन दिवाण
भाकरी, भोग आणि रोटी बँक
By admin | Updated: December 22, 2015 23:35 IST