शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
4
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
5
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
6
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
7
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
8
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
9
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
10
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
11
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
12
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
13
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
14
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
15
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
16
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
17
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
18
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
19
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
20
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश

सत्ता येते-जाते, साहित्यिक संस्थांवर ‘कब्जा’ हवा! मोक्याच्या जागेसाठी लागल्या राजकीय नजरा

By संदीप प्रधान | Updated: September 27, 2025 08:46 IST

आपली वैचारिक सत्ता प्रस्थापित करण्याचा मार्ग साहित्य संघापासून एशियाटिक सोसायटीपर्यंतच्या संस्थांमधून जातो, याचे भान राजकारण्यांना आले आहे!

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक,लोकमत, ठाणे

मुंबई मराठी साहित्य संघाची पंचवार्षिक निवडणूक विविध कारणांमुळे गाजली. असाहित्यिक मतदारांचे मतदान आणि एका विशिष्ट विचारधारेच्या मंडळींचे पॅनेल यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. यामुळे महाराष्ट्राच्या साहित्य, कला, सांस्कृतिक क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या वैचारिक खळबळींची चर्चा होणे स्वाभाविक आहे. 

साहित्य संघ मंदिरातील नाट्यगृहात एकेकाळी दाजी भाटवडेकर, सुहासिनी मूळगावकर यांच्यापासून अनेक दिग्गज कलाकारांचा राबता असायचा. अगदी संगीत नाटकांपासून सामाजिक नाटकांचे  प्रयोग व्हायचे. गिरगाव, दादरचा नाट्यरसिक तेव्हा साहित्य संघात वरचेवर पायधूळ झाडायचा. हा नाट्यरसिक आता ठाणे, डोंबिवली, बदलापूर, दहिसरला स्थलांतरित झाल्याने साहित्य संघातील नाट्यप्रयोगांची संख्या रोडावली. कोरोना काळात तर सारेच ठप्प झाले. आता साहित्य संघाच्या पोटाखालून मेट्रो धावू लागली आहे. गेले कित्येक महिने हे काम सुरू असल्याने येथे नाटकाच्या प्रयोगाकरिता थिएटरच्या जवळ गाडी नेणेही शक्य नव्हते.  मात्र अशाही परिस्थितीत काही समविचारी मंडळींना ही संस्था आपल्या छत्रछायेखाली यावे, असे वाटत होते. तूर्त तरी ते स्वप्न साकार झालेले नाही.

साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात अग्रेसर असलेल्या या संस्थेकडील संमेलनाचे दप्तर अलीकडेच पुण्याला सोपवले गेले आहे. आता पुण्याहून मराठवाड्यात  फिरून ते दप्तर पुन्हा मुंबईकडे यायला नऊ वर्षे लागतील. सध्या विजयी झालेली मंडळी पाच वर्षे कारभार पाहणार आहेत. म्हणजे पुन्हा साहित्य संघाकडे संमेलनाचे दप्तर येईल तेव्हा ‘व्यवस्था’ ताब्यात घ्यायला मंडळी तयार असतील. संमेलनाची अध्यक्ष निवड, त्यामध्ये होणारे ठराव, पुस्तकांचे  प्रकाशन, मुलाखती, पुरस्कार, सत्कार अशा सर्व बाबींवर आपली वैचारिक मोहोर उमटवायची तर संस्था ताब्यात हव्याच. वैचारिक सत्ता निर्माण करण्याचा तोच मार्ग नव्हे काय? 

नाट्यपरिषद एकेकाळी गिरगावातच होती. पुढे ती माटुंगा येथे यशवंत नाट्यगृहात गेली. या नाट्यगृहाचा वार्षिक देखभाल खर्च आहे दोन कोटी रुपये. मराठी नाट्यसृष्टीतील सर्वांत तगडा अभिनेता एका प्रयोगाची ‘नाइट’ १५ हजार रुपये घेतो म्हणतात. अगदी त्याला जरी परिषदेचा अध्यक्ष केले तरी तो नाट्यगृहाचा पांढरा हत्ती कायम पोसू शकत नाही. त्यामुळे साहजिकच एखाद्या धुरंधर राजकीय नेत्याला आणि त्याच्यासोबत येणारे आर्किटेक्ट व काही मंडळी यांना गोड मानून घ्यावे लागते. राजकीय नेत्यांना विश्वस्त किंवा अन्य पदांवर नियुक्त करून त्यांची करंगळी धरून चालण्याखेरीज नाट्यपरिषदेलाही पर्याय उरत नाही. नायगावचे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय हा देखील मराठी माणसाच्या अभिमानाचा एक मानबिंदू. एकेकाळी या संस्थेच्या ४८ शाखा होत्या. गेल्या काही वर्षांत शाखांची संख्या घटली. येथील पुस्तक देवाण-घेवाण कक्षात काही काळापूर्वी बाऊन्सर्स बसवल्याने संग्रहालयाचे मेंबर बिचकले होते.

ग्रंथसंग्रहालयात तर सर्वपक्षीय नेत्यांची मांदियाळी जमलेली आहे. एकेकाळी शारदा चित्रपटगृहाचे उत्पन्न हा संस्थेच्या इमारतीचा उत्पन्नाचा आधार होता. आता थिएटर डबघाईला आले. मोक्याच्या जागेवरील ही संस्था, तिचा भविष्यातील पुनर्विकास याकडे अनेक आशाळभूत राजकीय नजरा लागल्याची कुजबुज सतत कानावर येते. मुंबईत २६ नोव्हेंबर १८०४ रोजी स्थापना झालेल्या तत्कालीन लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे (विद्यमान एशियाटिक सोसायटी मुंबई) या संस्थेकडे १५ हजार दुर्मीळ ग्रंथांचा खजिना आहे. १३०० च्या घरात दुर्मीळ नकाशे आहेत. ‘डिव्हाइन कॉमेडी’ची एक अत्यंत मौल्यवान प्रत संस्थेकडे आहे; परंतु येथील कर्मचाऱ्यांच्या वेतनापासून व्यवस्थापनापर्यंत अनेक समस्यांनी संस्था घेरलेली आहे. अनेक अडचणी, समस्यांची सोडवणूक करण्याकरिता येथे चंचुप्रवेश करण्यास राजकीय मंडळी व त्यांचे उद्योगपती मित्र गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. 

सरकार येते आणि जाते; पण आपली वैचारिक सत्ता प्रस्थापित करून टिकवायची तर त्याचा मार्ग साहित्य संघ मंदिरापासून एशियाटिक सोसायटीपर्यंत असंख्य संस्था आपल्या अंगठ्याखाली ठेवण्यात आहे, याची जाणीव काही मंडळींना झालेली दिसते. देशातील संस्थांमधील डाव्या, समाजवादी, पुरोगामी विचारांची इको सिस्टीम वरचेवर खटकण्याचे कारण उजव्या विचारांना आपली इको सिस्टीम निर्माण करायची आहे. जागांचे वाढलेले दर, संस्थांपुढील आर्थिक जटील प्रश्न, पुनर्विकासाची गाजरे ही या बदलांना सुपीक जमीन झाली आहे, एवढेच!    sandeep.pradhan@lokmat.com

English
हिंदी सारांश
Web Title : Power Shifts, Literary Institutions: Political Eyes on Prime Real Estate

Web Summary : Political influence over Marathi literary institutions is increasing, driven by valuable real estate and ideological control. Organizations like Mumbai Marathi Sahitya Sangh and Asiatic Society face challenges, making them vulnerable to political maneuvering and redevelopment interests.