म्यानमारमधील लष्करी उठावाला दोन महिने पूर्ण होत असताना एक दिलासादायक बातमी आली आहे. नोबेलविजेत्या लोकशाहीवादी नेत्या आंग सान सू की यांना अखेर व्हिडिओच्या माध्यमातून भेटण्याची परवानगी त्यांच्या वकिलांना देण्यात आली. सशस्त्र जवानांच्या पहाऱ्यात असल्या तरी त्या सुखरूप असल्याचे, प्रकृती ठीक असल्याचे वकिलांना जाणवले. तरीही १ फेब्रुवारीला श्रीमती आंग सान सू की यांना पदच्युत करून सत्ता हस्तगत करणारे, लोकशाहीवादी निदर्शकांवर रोज गोळ्या चालविणारे लष्करप्रमुख मिन आंग लाइंग सहजासहजी सत्ता सोडण्याची शक्यता नाही. शनिवारी, सशस्त्र सेनादिनी शंभरावर निदर्शकांची हत्या झाली. दोन महिन्यांत पाचशेंचा मृत्यू झाला. लोकनियुक्त सरकार उलथविल्याचा, दडपशाही व हिंसाचाराचा जगभरातून निषेध सुरू आहे. संयुक्त राष्ट्रसंघाची आपात्कालीन बैठक होत आहे. अमेरिकेने दूतावासाचे काही कर्मचारी परत बोलावले आहेत. म्यानमारचा सर्वांत मोठा देणगीदार जपाननेही आर्थिक मदत थांबवली आहे.चीन व भारत या आशियातील दोन प्रबळ देशांची विशेषत: भारताची भूमिका अधिक महत्त्वाची आहे. कारण, पूर्वाश्रमीचा ब्रह्मदेश, आजचा म्यानमार हा जवळपास शंभर वर्षे ब्रिटिश वसाहतीचा भाग, ब्रिटिश इंडियाचा हिस्सा होता. त्यामुळेच ब्रिटिशांविरुद्ध लढणाऱ्या तिथल्या थिबा राजाला रत्नागिरीत स्थानबद्ध करण्यात आले होते, तर लोकमान्य टिळकांना मंडालेच्या तुरुंगात डांबले गेले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेस अधिवेशनाला बर्माचे प्रतिनिधी यायचे. इतकेच कशाला शमशाद बेगमच्या आवाजातील, मेरे पिया गये रंगून, किया है वहां से टेलिफून, या पतंगा चित्रपटातील गाण्याच्या रूपाने आपल्या बॉलीवूडलाही ब्रह्मदेशाने मोहिनी घातली होती. लष्करी उठाव किंवा राजधानी नायपिडॉवर कब्जा या ताज्या घटनांआधीच गेले काही वर्षे वांशिक - धार्मिक संघर्ष, त्यातून राेहिंग्या मुस्लिमांचे दमन, त्यांचे भीतीने शेजारच्या देशांमध्ये आश्रयाला जाणे, त्या मुद्द्यावर आंग सान सू की यांच्यावर त्यांच्यासारखीच नोबेल पुरस्काराने सन्मानित मलाला युसुफझईपासून मान्यवरांचे टीकास्त्र आदी कारणांनी म्यानमार भारतात चर्चेच्या केंद्रस्थानी होताच. नंतरचा हा लष्करी उठाव, लोकशाहीवादी निदर्शकांच्या हत्या या सगळ्या भानगडींमध्ये म्यानमारमध्ये प्रचंड राजकीय अस्थिरता आली हे खरेच. पण, त्याहून अधिक महत्त्वाचा मुद्दा आहे तो निर्वासितांच्या लोढ्यांमुळे शेजारच्या देशांमध्ये उद्भवलेल्या संकटाचा.
अग्रलेख - म्यानमारच्या रक्तपाताचा धडा आणि भारतासमोरील आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 04:52 IST