विंडोवाले अंकल जरा अंदर जाओ ना. मै लटक रहा हूं, गिर जाऊंगा. आगेवाले चाचा थोडे अंदर जाने की कोशिश करो ना मै लटक रहा हूं, गिर जाऊंगा... अशी आर्जवं सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या लोकलमध्ये दरवाजात फुटबोर्डवर जेमतेम एक पाऊल ठेवून आणि दरवाजावरील खाचेत बोटं कशीबशी अडकवून प्रवास माणसं करीत असतात. माणूस जेव्हा टोळ्या करून राहत होता तेव्हा ‘जो सक्षम आहे तोच टिकेल’ हा नियम होता. रेल्वे प्रवासातही तोच टोळी काळातील ‘सर्व्हायव्हल ऑफ दी फिटेस्ट’ हाच नियम गर्दीच्या वेळी लागू होतो. सोमवार आठवड्याचा पहिला दिवस. मे महिन्यातील सुट्या संपवून चाकरमानी पुन्हा कामावर रुजू झाल्याने लोकलला तुफान गर्दी होत आहे. पाठीला वजनदार लॅपटॉपसह जेवणाच्या डब्यांच्या बॅगा लावून प्रवासी लोकलमध्ये कसेबसे घुसले. मात्र, त्यांच्या पाठीवरील बँगा डब्याच्या बाहेर होत्या.
मुंब्रा स्थानकापाशी एका विशिष्ट ठिकाणी दोन विरुद्ध दिशेला जाणाऱ्या भरधाव लोकल एकमेकांच्या अगदी नजीक आल्या आणि पाठीवरील बॅगचा धक्का एकमेकांना लागून पटापट १३ प्रवासी दोन्ही लोकलमधून खाली कोसळले. त्यापैकी चारजण जागीच मरण पावले. रेल्वे अपघातात दररोज पाच ते दहा प्रवासी मरण पावतात. मात्र, एकाच दुर्घटनेत चार प्रवासी मरण पावल्याने दिवसभर टीव्हीच्या पडद्यावर आणि सोशल मीडियावर हीच बातमी लक्ष वेधून घेणारी ठरली. रेल्वेतील अपघातांची ही समस्या गेल्या काही वर्षांत कर्जत व कसारा मार्गावरील वेगवेगळ्या शहरांत वाढलेली लोकसंख्या व पर्यायाने प्रवासीसंख्या यामुळे निर्माण झालेली आहे. ज्या प्रमाणात प्रवासीसंख्या वाढली त्या तुलनेत लोकल फेऱ्या वाढलेल्या नाहीत. ठाणे व त्यापुढील स्थानकातून दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या विचारात घेतली तरी लोकलच्या गर्दीचे मूळ कारण उमजेल.
ठाणे स्थानकातून दररोज सात लाख प्रवासी प्रवेश करतात. कळवा अडीच लाख, मुंब्रा दोन लाख, दिवा दीड लाख, डोंबिवली तीन लाख, कोपर ५० हजार, ठाकुर्ली एक लाख, कल्याण दोन लाख, बदलापूर दीड लाख, अंबरनाथ एक लाख, टिटवाळा ते आसनगाव दोन लाख. सर्वसामान्य लोकलच्या फेऱ्या वाढलेल्या नसताना रेल्वेने वातानुकूलित लोकल सुरू केल्या. या लोकलचे तिकीट अधिक आहे. त्यामुळे दोन लोकलच्या मध्ये एक एसी लोकल गेली तर चार गाड्यांची गर्दी होते. दररोज वेगवेगळ्या कारणामुळे लोकलची वाहतूक किमान १५ ते २० मिनिटे उशिरा होते. अगोदर वाहतूक कोंडीतून कसेबसे रेल्वेस्थानक गाठायचे, मग लोकलची प्रतीक्षा करायची, कसेबसे लोकलला लटकून प्रवास करायचा, पुन्हा कार्यालय गाठण्याकरिता बस किंवा शेअर टॅक्सीची रांग लावायची या चक्रव्यूहात मुंबईकर पिचला आहे. लेडिज स्पेशल लोकलच्या केवळ चार फेऱ्या वर्षानुवर्षे सुरू असून, त्यात वाढ केलेली नाही. रेल्वे कायद्यानुसार प्रत्येक प्रवासी गाडीच्या प्रत्येक डब्याची कमाल प्रवासी क्षमता किती असेल हे ठरविण्याचे बंधन आहे. प्रवाशांची कमाल क्षमता निश्चित करण्यामागे ‘सुरक्षित प्रवास’ हाच हेतू आहे. प्रवासी गाडीच्या प्रत्येक डब्याची अशी सरकारने ठरवून दिलेली कमाल प्रवासी क्षमता त्या डब्यात ठळकपणे लिहिलेली असते. रेल्वे कायद्यानुसार संपूर्ण देशासाठी एक मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्त व प्रत्येक विभागीय रेल्वेसाठी एकेक रेल्वे सुरक्षा आयुक्त नेमलेला असतो. रेल्वेची वाहतूक सुरक्षितपणे केली जाईल, याची खात्री करणे व अपघात झाल्यास चौकशी करून त्याची जबाबदारी निश्चित करणे हे या सुरक्षा आयुक्तांचे काम असते. मुख्य आयुक्तांनी दरवर्षी आपल्या कामाचा अहवाल द्यायचा असतो व सरकारने तो संसदेत सादर करायचा असतो. सुरक्षा आयुक्तांच्या अहवालात गाड्यांमधील कमाल प्रवासी संख्येच्या सर्रास अनुभवाला येणाऱ्या उल्लंघनाचा कधी साधा उल्लेखही नसतो. आपणच ठरवून दिलेल्या या मर्यादेचे रेल्वेकडून पालन होते की नाही, हेही हे आयुक्त कधी पाहत नाहीत. प्रवाशांची सुरक्षितता आणि जीव धोक्यात येईल अशी कोणतीही कृती हेतूपुरस्सर करणाऱ्या व्यक्तीवर खटला भरून त्यास पाच वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा करण्याची तरतूद रेल्वे कायद्यात आहे. हे कलम रेल्वेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही लागू होते. खरे तर रेल्वेतून पडून होणाऱ्या प्रवाशाच्या प्रत्येक मृत्यूबद्दल महाव्यवस्थापकांना अशी शिक्षा होऊ शकते. ज्या दिवशी अशी शिक्षा होईल त्या दिवशी रेल्वेचा कारभार नक्की सुधारेल.