माहिती तंत्रज्ञानाच्या युगाने जगण्याच्या सर्वच क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल घडवले. उदारीकरण आणि खुलेपणाच्या घोषणांनी सीमारेषा विरघळल्या, जागतिक बाजारपेठ एकसंध झाली आणि अर्थकारणासह समाजकारण, राजकारणाच्या व्याख्याही बदलल्या. नव्या संधी निर्माण झाल्या; पण त्याचवेळी नव्या अस्थिरताही वाढल्या. मंदी असो वा कोरोनासारखी महामारी, जागतिक परस्पर संबंध इतके घट्ट झाले की, एका ठिकाणी निर्माण झालेला धक्का जगभर जाणवू लागला. खुलेपणाच्या घोषणांसोबतच मक्तेदारीची नवी रूपेही उदयाला आली. भारतीय अर्थव्यवस्थेच्या परिवर्तनात आयटी क्षेत्राने निर्णायक भूमिका बजावली. या क्षेत्रामुळे भारताला जागतिक पातळीवर संधी मिळाल्या; मात्र त्याचवेळी जागतिक चढ-उतारांचा परिणामही अधिक तीव्रतेने जाणवू लागला. आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नव्या पर्वाची नांदी होत असताना, त्याचा परिणाम अर्थकारणावर होणे स्वाभाविक आहे. दीर्घकालीन परिणाम अजून स्पष्ट व्हायचे असले, तरी तात्कालिक परिणाम बाजारात दिसू लागले आहेत. शेअर बाजारातील अलीकडील घडामोडी त्याचे संकेत देतात.
विकसित भारत’चे ध्येय आता अगदी जवळ; पंतप्रधान मोदींनी सांगितला ३० वर्षांचा रोडमॅप
सेन्सेक्स सातशेहून अधिक अंकांनी घसरला आणि निफ्टी २५,६०० च्या खाली आला. आघाडीच्या आयटी कंपन्यांच्या शेअर्समधील घसरणीमुळे निर्देशांकांवर दबाव निर्माण झाला. सलग दुसऱ्या सत्रात बाजार घसरला आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विक्रीमुळे वातावरण अधिकच नकारात्मक झाले. अमेरिकेतील तंत्रज्ञान शेअर्समधील अस्थिरता आणि एआयमुळे उद्योगरचनेत होणाऱ्या संभाव्य बदलांचा गुंतवणूकदारांकडून नव्याने विचार सुरू असल्याने आयटी क्षेत्र सध्या विक्रीच्या केंद्रस्थानी आहे. अमेरिकन बाजारातील एआय-केंद्रित शेअर्समधील घसरण अपेक्षित होती; मात्र तिची वेळ आणि प्रमाण अनिश्चित होते. ‘नॅस्डॅक’मधील सुमारे दोन टक्क्यांची घसरण हे कोसळणे नसले, तरी हा कल टिकला तर जागतिक तंत्रज्ञान बाजारावर दबाव वाढू शकतो. भारताच्या दृष्टीने मात्र दीर्घकालीन चित्र वेगळे असू शकते. गेल्यावर्षीची जागतिक तेजी प्रामुख्याने एआयमुळे होती आणि या क्षेत्रात मागे असल्याने भारत पूर्णपणे त्यात सहभागी झाला नव्हता. त्यामुळे जागतिक एआय व्यापारात मंदी आली, तर भांडवलाचा काही प्रवाह भारताकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या मात्र भारतीय बाजाराला बसलेला धक्का मुख्यतः आयटी शेअर्समधील मोठ्या विक्रीमुळे आहे, कारण आयटी हे देशातील दुसरे सर्वात मोठे नफ्याचे क्षेत्र आहे. ‘अँथ्रोपिक शॉक’चा या क्षेत्रावर नेमका परिणाम काय होईल, हे अजून स्पष्ट व्हायचे आहे. त्यामुळे घाईघाईने विक्री करण्यापेक्षा परिस्थिती स्थिर होईपर्यंत संयम ठेवावा, असा सल्ला अभ्यासक देत आहेत. उलट, सध्याची अस्थिरता धोरणात्मक गुंतवणुकीसाठी संधी ठरू शकते. मजबूत तिमाही निकाल आणि स्थिर वाढीची क्षमता असलेले काही ग्रोथ शेअर्स टप्प्याटप्प्याने खरेदी करता येऊ शकतात. ऑटो क्षेत्र तुलनेने स्थिर राहण्याची शक्यता असल्याने त्यात घसरण झाली, तर ती खरेदीची संधी मानली जाऊ शकते. हा पेच नेहमीचा नाही; तो संरचनात्मक स्वरूपाचा असू शकतो. भारतीय आयटी कंपन्या जागतिक स्तरावर प्रभावशाली झाल्याने ‘डिसरप्शन’चा धोका वाढला आहे. एआयचा प्रभाव केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नसून दीर्घकालीन आहे. नवीन उत्पन्नाचे स्रोत अजून लहान असल्याने पारंपरिक व्यवसायातील संभाव्य घट भरून निघेलच असे नाही. त्यामुळे सावधगिरी आवश्यक आहे. तरीही भीतीचे चित्र पूर्ण सत्य नाही. आयटी उद्योगाने Y2K पासून ब्लॉकचेनपर्यंत अनेक तांत्रिक लाटांना तोंड देत स्वतःला वारंवार नव्याने घडवले आहे. बदलाशी जुळवून घेण्याची त्याची क्षमता सिद्ध झाली आहे, म्हणूनच सध्याचा धक्का हा केवळ संकट नसून, संक्रमणाचा टप्पा असू शकतो. कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्वात खोल परिणाम केवळ कंपन्यांच्या नफ्यावर नव्हे, तर रोजगाराच्या स्वरूपावर होणार आहे.
आयटी क्षेत्राने भारतात लाखो मध्यमवर्गीयांना स्थैर्य दिले; परंतु एआयमुळे पारंपरिक कोडिंग, टेस्टिंग, सपोर्ट यांसारख्या भूमिकांची मागणी कमी होण्याची शक्यता आहे, तर उच्च कौशल्याधारित, संशोधनप्रधान आणि डोमेन-विशेषज्ञ भूमिकांची गरज वाढेल. म्हणजेच, संकट नोकऱ्यांच्या संख्येचे नसून कौशल्यांच्या स्वरूपाचे आहे. ज्या कंपन्या आणि कर्मचारी या संक्रमणाशी जुळवून घेतील, त्यांच्यासाठी एआय संधी ठरेल; अन्यथा तो अस्थिरतेचा धक्का ठरू शकतो. एआयच्या या वळणावर आयटी क्षेत्रासाठी प्रश्न अस्तित्वाचा नाही, तर तो नव्या जन्माचा आहे! आणि इतिहास सांगतो की, या समायोजनातच त्याची खरी ताकद दडलेली आहे. एआयच्या या वळणावर आयटी क्षेत्रासाठी ही केवळ कसोटी नाही, तर पुनर्जन्माची संधीही ठरू शकते.
Web Summary : Global fluctuations, intensified by AI, impact Indian IT. Market volatility signals transition. Adaptability is key for survival and growth. Reskilling is crucial.
Web Summary : वैश्विक उतार-चढ़ाव, एआई से तीव्र, भारतीय आईटी को प्रभावित करते हैं। बाजार की अस्थिरता बदलाव का संकेत देती है। अनुकूलन क्षमता ही विकास की कुंजी है। कौशल आवश्यक है।