बालवैज्ञानिकांचा मेळा अनुभवताना वरवर गांभीर्याचा आव आणला गेला तरी वास्तव सगळ्यांनाच माहिती असते. विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्साह कायम राहावा म्हणून मेळाव्यात आलेले पाहुणे गंभीर, विज्ञानमग्न चेहऱ्याने वैज्ञानिक प्रयोग समजून घेतात. मुले खूश होऊन जातात. नवी दिल्लीच्या भारत मंडपममध्ये केंद्र सरकारने भरविलेला ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’ जणू असा लिंबूटिंबू बालविज्ञान मेळा समजून काही विद्यापीठे व सरकारी कार्यालये सहभागी झाली की काय, असा प्रश्न पडावा.
खरेतर हे अतिशय गंभीर आयोजन होते. किमान तसे ते असावे तरी. पाच दिवसांच्या परिषदेसाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस ॲन्टानिओ गुटेरस, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युल मॅक्राॅन, ब्राझीलचे अध्यक्ष लुला डी सिल्वा यांच्यासह भुतान, श्रीलंका, सर्बिया, कझाकस्तान, क्रोएशिया वगैरे तब्बल वीस देशांचे राष्ट्र्रप्रमुख आणि ४५ देशांचे मंत्रिस्तरीय प्रतिनिधी उपस्थित राहिले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील दादा समजल्या जाणाऱ्या बड्या कंपन्यांचे सुंदर पिचाई, सॅम अल्टमन, दारिओ अमोदेई, डेमिस हसाबिस वगैरे सीईओ, टेक्नोक्रॅट आले. भारत सरकार व भारतीय कंपन्यांसोबत त्यांनी एआयचे वर्तमान व भविष्याविषयी चर्चा केली. अनेक करारही झाले. गुंतवणुकीचे निर्णय झाले. सुंदर पिचाई यांनी गुगलचा खजिना भारतासाठी खुला केला. वेगवान कनेक्टिव्हिटीसाठी भारत-अमेरिकेदरम्यान समुद्राखाली हजारो किलोमीटरचा नवा केबल मार्ग उभारला जाणार आहे.
सरकारी कर्मचारी व विद्यार्थ्यांना एआय प्रशिक्षण दिले जाईल. गुगलने रिलायन्स जिओसोबत नवे ‘क्लाउड क्लस्टर्स’ घोषित केले. सॅम अल्टमन यांनी मुंबई व बंगळुरू येथे ‘ओपनएआय’ची कार्यालये उघडण्याची घोषणा केली. संपूर्ण जग आणि मानवी इतिहासाला कलाटणी देण्याची क्षमता असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात भारताचा सक्रिय सहभाग या परिषदेने अधोरेखित केला. जगातील निम्म्या देशांच्या सहभागाच्या रुपाने जागतिक नेतृत्व करण्याच्या दिशेने भारताचे हे महत्त्वाचे पाऊल ठरेल. भारतात ती क्षमता नक्की असल्याचे सगळ्या पाहुण्यांनी सांगितले. ही परिषद केवळ तंत्रज्ञानाची चर्चा नव्हती. अब्जावधी डाॅलर्सच्या व्यवहाराचे हे निमित्तही ठरले. परंतु, भव्य स्वप्ने सोबत घेऊन केलेले हे आयोजन चर्चेत राहिले ते वेगळ्या अप्रिय कारणांनी. पहिला दिवस आयोजनातील गोंधळाचा होता. नोंदणी व इतर व्यवस्था वाईट होती. मोठमोठ्या रांगा लागल्या. पिण्यासाठी पाणीही नव्हते. नंतर पंतप्रधान येणार आणि प्रदर्शनात फेरफटका मारणार म्हणून भारत मंडपम तब्बल सहा तास सुरक्षा यंत्रणेच्या ताब्यात होता. या यंत्रणेने स्टाॅल्सवरील सामान तिथेच ठेवून तंत्रज्ञ व इतरांना बाहेर काढले. काही किमती उपकरणे चोरीला गेल्याच्या तक्रारी झाल्या. दुसरा दिवस खासगी ‘गलगोटियाज युनिव्हर्सिटी’च्या नावाने गाजला. सरकारचे प्रेमपात्र असलेल्या या विद्यापीठाने चीनने तयार केलेला एक रोबोट कुत्रा प्रदर्शनात मांडला.
दूरचित्रवाहिन्यांशी बोलताना विद्यापीठाच्या प्रवक्त्या प्रा. नेहा सिंह यांनी ओरायन नावाचा तो रोबोट कुत्रा भारतीय विद्यार्थ्यांनी बनविल्याचे, मालकाला अभिवादन करताना तो मागच्या पायांवर कसा उभा राहतो वगैरे वर्णन केले. प्रत्यक्षात, गो२ नावाचा तो राेबोट चिनी माल असून, बाजारात सहज उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाने भारत सरकारची नामुष्की झाली. विद्यापीठाने सांगितलेले सगळे खरे समजून त्या कुत्र्याचे जाहीर लाड करणारे माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह सर्वांवर तोंड लपविण्याची वेळ आली. थेट केंद्रीय सचिवांना खुलासा करावा लागला. ‘गलगोटियाज’ची प्रदर्शनातून हकालपट्टी झाली. असो! इतका गहजब झाला म्हणून आपण भारतीय सुधारूच, असे नाही. कुत्र्याचे शेपूट जसे वाकडेच राहते तसे आपण आहोत. कोणतेही नवे तंत्रज्ञान, नवी गोष्ट आली की, आपण उत्सवी मानसिकतेत जातो.
त्या तंत्रज्ञानाच्या मूलभूत बाबी वगैरे न पाहता मेंढरांसारखे एकाच गोष्टींच्या मागे धावतो. संगणक नको म्हणून बैलगाड्यांचा मोर्चा संसदेवर नेणारे आपण आहोत. नंतर त्याच संगणकाने विद्वान भारतीयांची एक पिढी पोसली, संपन्नता पदरात टाकली. आताही एआयसाठी आवश्यक विश्वासार्ह डेटाबद्दल चकार शब्द न काढता उठताबसता घोकंपट्टी सुरू आहे. ‘एआय’ इव्हेंट सुरू आहेत. अशा उत्सवांपासून दूर राहून वर्षांनुवर्षे मान खाली घालून संशोधन करणारे चीनसारखे देश खूप पुढे निघून गेले आणि तिथे तयार झालेला एआय कुत्रा नाचवून आपण आनंद लुटत आहोत. आपण धन्य आहोत !
Web Summary : India's AI summit, marred by chaos and a fake Chinese robot dog presented as Indian-made, exposed organizational flaws and superficial adoption of technology despite global participation and investment promises.
Web Summary : भारत का एआई शिखर सम्मेलन, अराजकता और एक नकली चीनी रोबोट कुत्ते के कारण शर्मसार हुआ, जिसने वैश्विक भागीदारी और निवेश के वादों के बावजूद संगठनात्मक खामियों और प्रौद्योगिकी को सतही रूप से अपनाने को उजागर किया।