शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

जनाची नाही तर मनाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2024 07:28 IST

या घटनेची चर्चा केवळ समाजमाध्यमांमध्ये सुरू होती. 

देशाच्या कानाकोपऱ्यातून महिलांवरील अत्याचाराच्या घटना दररोज कानावर पडतच असतात; पण जेव्हा देशाच्या राजधानीत, राज्यसभेची सदस्य असलेल्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षाला चक्क मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मारहाण होते, तेव्हा त्या प्रकरणाचे गांभीर्य किती तरी पटीने वाढते. दुर्दैवाने प्रत्येकच गोष्टीकडे राजकारणाच्या चष्म्यातून बघण्याची राजकारण्यांना एवढी सवय झाली आहे, की या गंभीर प्रकरणाचे गांभीर्यच हरवून गेल्यासारखे दिसत आहे. या घटनेची चर्चा केवळ समाजमाध्यमांमध्ये सुरू होती. 

तुरळक बातम्या उमटल्या, तोवर त्याकडे गांभीर्याने न बघणे एकदाचे समजण्यासारखे होते; पण स्वाती मालीवाल यांनी घडलेल्या घटनेची पोलिसांकडे रीतसर तक्रार केल्यानंतरही, त्यातील गांभीर्य लक्षात न घेता, त्याकडे केवळ राजकीय उट्टे फेडण्याच्या नजरेनेच बघितले जात असेल, तर राजकारण्यांचे आणखी किती नैतिक अध:पतन व्हायचे बाकी आहे, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. स्वाती मालीवाल १३ मे रोजी सकाळी ९:०० वाजता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटायला त्यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. तिथे मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विभव कुमार यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली, शिवीगाळ केली आणि तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर चक्क मारहाणही केली, असा मालीवाल यांचा आरोप आहे. 

राजधानीतील राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे, की मद्य घोटाळा प्रकरणात अंतरिम जामिनावर सुटका झाल्यामुळे आनंदलेल्या केजरीवाल यांना, सर्वोच्च न्यायालयात त्यांची बाजू मांडणारे वकील अभिषेक मनू सिंघवी यांना राज्यसभेत धाडायचे आहे आणि त्यासाठी मालीवाल यांना राज्यसभेचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. आम आदमी पक्षाचा पंजाबमधील एक राज्यसभा सदस्य राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात जाण्याच्या तयारीत असून, त्याची जागा रिक्त झाल्यावर मालीवाल यांना पुन्हा राज्यसभेत पाठविले जाईल, असे त्यांना सांगण्यात आले होते. 

गेल्या जानेवारीतच राज्यसभा सदस्य बनलेल्या मालीवाल त्यासाठी तयार नाहीत आणि त्यासंदर्भात केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी म्हणूनच त्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या, असेही सांगण्यात येत आहे. खरेखोटे केजरीवाल, मालीवाल आणि त्यांच्या पक्षाच्या अंतस्थ गोटातील लोकांनाच माहीत. पण, मालीवाल यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलेली विभव कुमार यांच्या तोंडची वाक्ये विचारात घेतल्यास, दिल्लीच्या राजकीय वर्तुळातील चर्चेत काही ना काही तथ्य असावे, असे वाटू लागते. ते खरे निघाल्यास, शुद्ध नैतिक आचरणाच्या गप्पा मारणाऱ्या आपमधील मंडळींचे पायही मातीचेच असल्याकडे आणखी एक अंगुलीनिर्देश होईल. 

दिल्लीतील कथित मद्य घोटाळा हे भाजपने रचलेले कुभांड असल्याचा आरोप करणारे केजरीवाल आणि त्यांचे सहकारी आता स्वपक्षाच्याच ज्येष्ठ नेत्याने केलेल्या आरोपावर काय स्पष्टीकरण देणार आहेत? असा प्रकार आपचे सख्य नसलेल्या एखाद्या राजकीय पक्षाची सत्ता असलेल्या राज्यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घडला असता, तर एव्हाना आपने आभाळ डोक्यावर घेतले असते. आता मात्र केजरीवाल यांच्यासह आपचा प्रत्येक नेता तोंडात मिठाची गुळणी धरून बसला आहे. एवढेच नव्हे, तर आप घटक पक्ष असलेल्या ‘इंडिया’ आघाडीत सहभागी एकाही पक्षाचा एकही नेता त्यावर बोलायला तयार नाही. अपवाद केवळ काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचा! समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव बोलले, ते जणू काही त्यांची असंवेदनशीलता दाखवून देण्यासाठीच! 

भारतीय राजकारण्यांच्या संवेदनशीलतेचे गणित काही वेगळेच आहे. एखाद्या प्रकरणात विरोधी पक्ष अडचणीत येत असल्यास ते अतिसंवेदनशील होतात; अन्यथा असंवेदनशील वक्तव्ये करण्याचा त्यांना जणू काही परवानाच मिळालेला असतो! महिला कुस्तीगिरांच्या आंदोलनामुळे भाजप अडचणीत येत असल्याने विरोधी पक्ष महिला सुरक्षेचा झेंडा तातडीने आपल्या खांद्यावर घेतात. पण, मालीवाल प्रकरणात सहकारी पक्ष अडचणीत दिसतो, तेव्हा मात्र सोयीस्कर चुप्पी साधतात. 

दुसऱ्या बाजूला महिला कुस्तीपटू, मणिपूरमधील महिला अत्याचार, प्रज्वल रेवण्णा लैंगिक शोषणप्रकरणी तोंडातून अवाक्षर न काढणारी भाजपची मंडळी, मालीवाल प्रकरणात राजकीय लाभ दिसू लागताच, चुरूचुरू बोलू लागते! राजकारण्यांना त्यांच्या सोयीच्या मुद्द्यांचा सातत्याने शोध घ्यावाच लागतो. पण, ते करताना किमान मानवी संवेदनांचे, नैतिक मूल्यांचे भान राखणे अपेक्षित असते. जनाची नाही, तर किमान मनाची तरी लाज बाळगून राजकारण्यांनी काही मुद्दे, काही विषय तरी राजकारणाच्या परिघाबाहेर ठेवलेच पाहिजे.

 

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टी