शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
2
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
3
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
4
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
5
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
6
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
7
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
8
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
9
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
10
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
11
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
12
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
13
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
14
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
15
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
16
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
17
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
18
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

जनाची नाही तर मनाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2024 07:28 IST

या घटनेची चर्चा केवळ समाजमाध्यमांमध्ये सुरू होती. 

देशाच्या कानाकोपऱ्यातून महिलांवरील अत्याचाराच्या घटना दररोज कानावर पडतच असतात; पण जेव्हा देशाच्या राजधानीत, राज्यसभेची सदस्य असलेल्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षाला चक्क मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मारहाण होते, तेव्हा त्या प्रकरणाचे गांभीर्य किती तरी पटीने वाढते. दुर्दैवाने प्रत्येकच गोष्टीकडे राजकारणाच्या चष्म्यातून बघण्याची राजकारण्यांना एवढी सवय झाली आहे, की या गंभीर प्रकरणाचे गांभीर्यच हरवून गेल्यासारखे दिसत आहे. या घटनेची चर्चा केवळ समाजमाध्यमांमध्ये सुरू होती. 

तुरळक बातम्या उमटल्या, तोवर त्याकडे गांभीर्याने न बघणे एकदाचे समजण्यासारखे होते; पण स्वाती मालीवाल यांनी घडलेल्या घटनेची पोलिसांकडे रीतसर तक्रार केल्यानंतरही, त्यातील गांभीर्य लक्षात न घेता, त्याकडे केवळ राजकीय उट्टे फेडण्याच्या नजरेनेच बघितले जात असेल, तर राजकारण्यांचे आणखी किती नैतिक अध:पतन व्हायचे बाकी आहे, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. स्वाती मालीवाल १३ मे रोजी सकाळी ९:०० वाजता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटायला त्यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. तिथे मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विभव कुमार यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली, शिवीगाळ केली आणि तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर चक्क मारहाणही केली, असा मालीवाल यांचा आरोप आहे. 

राजधानीतील राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे, की मद्य घोटाळा प्रकरणात अंतरिम जामिनावर सुटका झाल्यामुळे आनंदलेल्या केजरीवाल यांना, सर्वोच्च न्यायालयात त्यांची बाजू मांडणारे वकील अभिषेक मनू सिंघवी यांना राज्यसभेत धाडायचे आहे आणि त्यासाठी मालीवाल यांना राज्यसभेचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. आम आदमी पक्षाचा पंजाबमधील एक राज्यसभा सदस्य राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात जाण्याच्या तयारीत असून, त्याची जागा रिक्त झाल्यावर मालीवाल यांना पुन्हा राज्यसभेत पाठविले जाईल, असे त्यांना सांगण्यात आले होते. 

गेल्या जानेवारीतच राज्यसभा सदस्य बनलेल्या मालीवाल त्यासाठी तयार नाहीत आणि त्यासंदर्भात केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी म्हणूनच त्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या, असेही सांगण्यात येत आहे. खरेखोटे केजरीवाल, मालीवाल आणि त्यांच्या पक्षाच्या अंतस्थ गोटातील लोकांनाच माहीत. पण, मालीवाल यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलेली विभव कुमार यांच्या तोंडची वाक्ये विचारात घेतल्यास, दिल्लीच्या राजकीय वर्तुळातील चर्चेत काही ना काही तथ्य असावे, असे वाटू लागते. ते खरे निघाल्यास, शुद्ध नैतिक आचरणाच्या गप्पा मारणाऱ्या आपमधील मंडळींचे पायही मातीचेच असल्याकडे आणखी एक अंगुलीनिर्देश होईल. 

दिल्लीतील कथित मद्य घोटाळा हे भाजपने रचलेले कुभांड असल्याचा आरोप करणारे केजरीवाल आणि त्यांचे सहकारी आता स्वपक्षाच्याच ज्येष्ठ नेत्याने केलेल्या आरोपावर काय स्पष्टीकरण देणार आहेत? असा प्रकार आपचे सख्य नसलेल्या एखाद्या राजकीय पक्षाची सत्ता असलेल्या राज्यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घडला असता, तर एव्हाना आपने आभाळ डोक्यावर घेतले असते. आता मात्र केजरीवाल यांच्यासह आपचा प्रत्येक नेता तोंडात मिठाची गुळणी धरून बसला आहे. एवढेच नव्हे, तर आप घटक पक्ष असलेल्या ‘इंडिया’ आघाडीत सहभागी एकाही पक्षाचा एकही नेता त्यावर बोलायला तयार नाही. अपवाद केवळ काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचा! समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव बोलले, ते जणू काही त्यांची असंवेदनशीलता दाखवून देण्यासाठीच! 

भारतीय राजकारण्यांच्या संवेदनशीलतेचे गणित काही वेगळेच आहे. एखाद्या प्रकरणात विरोधी पक्ष अडचणीत येत असल्यास ते अतिसंवेदनशील होतात; अन्यथा असंवेदनशील वक्तव्ये करण्याचा त्यांना जणू काही परवानाच मिळालेला असतो! महिला कुस्तीगिरांच्या आंदोलनामुळे भाजप अडचणीत येत असल्याने विरोधी पक्ष महिला सुरक्षेचा झेंडा तातडीने आपल्या खांद्यावर घेतात. पण, मालीवाल प्रकरणात सहकारी पक्ष अडचणीत दिसतो, तेव्हा मात्र सोयीस्कर चुप्पी साधतात. 

दुसऱ्या बाजूला महिला कुस्तीपटू, मणिपूरमधील महिला अत्याचार, प्रज्वल रेवण्णा लैंगिक शोषणप्रकरणी तोंडातून अवाक्षर न काढणारी भाजपची मंडळी, मालीवाल प्रकरणात राजकीय लाभ दिसू लागताच, चुरूचुरू बोलू लागते! राजकारण्यांना त्यांच्या सोयीच्या मुद्द्यांचा सातत्याने शोध घ्यावाच लागतो. पण, ते करताना किमान मानवी संवेदनांचे, नैतिक मूल्यांचे भान राखणे अपेक्षित असते. जनाची नाही, तर किमान मनाची तरी लाज बाळगून राजकारण्यांनी काही मुद्दे, काही विषय तरी राजकारणाच्या परिघाबाहेर ठेवलेच पाहिजे.

 

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टी