धुळे- शहरातून मुंबई आग्रा आणि धुळे ते सोलापूर महामार्ग व्हाया चाळीसगाव जातो. त्यामुळे चाळीसगाव चौफुलीवर सतत वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी साेडविण्यासाठी चौफुलीवर उड्डाणपुल तयार करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती आमदार डॉ. फारूख शाह यांनी पाहणीप्रसंगी दिली.
चाळीसगाव चौफुलीवर सिग्नल यंत्रणा बंद असल्याने दिवसभर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अनेकवेळा वाद निर्माण होतात. त्यामुळे परिसरात जबरी लूट, अपघात यासारखे विविध गुन्ह्याच्या घटना घडतात. त्यामुळे शहराची प्रतिमा मलीन होत आहे. या बाबतच्या अनेक तक्रारी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे आणि व्यवस्थापक संजय गुरव यांना शहराचे आमदार फारुक शाह यांनी पत्राद्वारे केल्या आहेत. चाळीसगाव चौफुली येथे उड्डाणपूल होण्याची मागणी केली होती. त्यानुसार भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने या ठिकाणी उड्डाणपूल होणार असल्याचे आश्वासन पत्राव्दारे दिले आहे.