उन्हाळ्याच्या एप्रिल हीटच्या चटक्यांनी वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला असला तरी उन्हाळ्यात पाणी पातळी खोलवर जात आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील वन क्षेत्रांमध्ये असलेले नैसर्गिक पाणवठे देखील आता आटले असून कृत्रिम पाणवठ्यांमध्येही ठणठणाट आहे. वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये यासाठी वन विभागाचे अधिकारी सरसावले आहेत.
वनक्षेत्रातील पाणवठ्यांमध्ये पाणी नसले तर पाण्याच्या शोधात वन्य प्राणी शेतशिवारांमध्ये किंवा वस्त्यांमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही़ सध्या शेतशिवारांमध्ये पाणी आहे. अशा परिस्थितीत वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या संपर्कात येऊन गंभीर घटना घडण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. नंदुरबार जिल्ह्यात बिबट्या आणि अस्वलाच्या हल्ल्याच्या दोन घटना गेल्या वर्षी घडल्या होत्या. साक्री तालुक्यात बिबट्यांचा शेतशिवारांमध्ये वावर असल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे वन विभागाने कृत्रिम पाणवठ्यांमध्ये नियमित पाणी उपलब्ध राहील याचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे़
काही नैसर्गिक पाणवठ्यांमध्ये काही प्रमाणात पाणी आहे तर काही पाणवठे आटले आहेत. कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी नसल्याचे चित्र आहे. हे वन्य प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी वन विभागाची आहे़ त्यानुसार वन विभागाकडून पाण्याची उपलब्धता केली जात आहे. धुळे शहरानजीकच्या लळिंग कुरणातील कृत्रिम पाणवठ्यांमध्येदेखील पाणी टॅंकरद्वारे पाणी भरले जात आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लळिंग वनक्षेत्रामध्ये पाणवठ्यांमध्ये पाणी उपलब्ध करून दिले जाते़ लांडोर बंगल्याच्या परिसरात पाणवठ्यांमध्ये नियमित पाणी टाकले जाते. तसेच काही अंतरावर असलेल्या पाणवठ्यांपर्यंत पाईपलाईनद्वारे पाणी जाते. शिवाय लळिंग कुरणातील धरण आणि काही पाझर तलावांमध्ये अजुनही पाणीसाठा शिल्लक असल्याने वन्य प्राण्यांची पाण्याची सोय होत आहे. लांबच्या पाणवठ्यांमध्ये पाणी देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. वन्य जिवांसाठी पाणवठ्यांमध्ये पाणी टाकण्याच्या मोहिमेत सातत्याची गरज आहे.